Tuesday, 23 February 2021

ज्वालादेवी..हिमाचल

 माझी सहल "हिमाचल" 

मनोकामना पूर्ण करणारी "ज्वालादेवी"

संदीप राक्षे ✍🏻


गेली कित्येक वर्ष ज्वालादेवीला जाण्याची इच्छा होती, अनेक दिवसांचे स्वप्न होते ते स्वप्न फेब्रुवारी २०२१ मधे पुर्णत्वास आले होते. सिमला ते ज्वालादेवी हे अंतर १७३ किलोमीटर होते. सलग दोन दिवसांची धरती आणि आकाशाच्या मध्यभागाची, धवल निसर्गाची सहल संपवून, आम्ही सपाट भाग असणा-या कांगडा जिल्ह्य़ात जमीनीवर पोहचलो होतो. ज्वालादेवीला जाताना रस्त्यात अर्कीचा खाजगी किल्ला आहे. तो पण  आम्ही पाहिला, शाही पाहुणे आल्याने आम्हाला तो किल्ला दूरूनच पहावा लागला. त्या किल्ल्यात बाॅलिवूडच्या अनेक चित्रपटांची शूटिंग झाली आहे असे तेथील सुरक्षा रक्षकाने सांगितले. बाहेरूनच त्या किल्याचा आनंद घेऊन आम्ही ज्वाला देवीचा रस्ता धरला. ज्वालादेवीची आख्यायिका खूप वर्षांच्यापासून माझ्या मनावर कोरलेली होती. प्रवास करताना आणि आज साक्षात मातेच्या दर्शनाला जाताना ती कथा मन पटलावर पुन्हा आठवू लागली. गाडीचे सारथ्य संजय जाधव हे करीत असल्याने निसर्गाचा आनंद घेत या कथेचा उलगडा करीतच प्रवास आनंदात सुरू होता. शिवपुराणात कथेनुसार माता सतीचे पिता दक्ष यांनी महायज्ञाचे आयोजन केले होते. त्या महायज्ञाला देव देवता ऋषीं मुनींना आमंत्रित करण्यात आले होते. फक्त भगवान शंकरांना निमंत्रण दिले नव्हते, त्यामुळे माता सती म्हणजे पार्वती देवींना राग आला होता. कारण विचारण्यासाठी त्या रागानेच आपल्या पित्याकडे आल्या, भगवान भोलेनाथांनी पार्वतीमातेला न जाण्यासाठी बरीच विनवणी केली तरी सती मातेने त्यांचेही ऐकले नाही. पित्याला जाब विचारीत असतानाच पित्याकडूनच सती मातेला अपमानित व्हावं लागलं, मातेला खूप राग आला आणि त्यांनी यज्ञातच उडी मारून आपले प्राण दिले, यज्ञात भस्म होताच त्यातून एक ज्योतीपूंज तयार झाले व ते ज्योतीपूंज आकाशात जात असताना कसेटी पर्वतावर ते ज्योतीपूंज पडले, तेव्हापासून कांगडा जिल्हय़ातील कसेटी गावातील पर्वतावर ती ज्योती अजूनही तेवत आहे. कालांतराने या दिव्यत्वाचे ज्वालादेवी असे नामकरण झाले तसेच एक्कावन्न शक्तीपीठांच्यात ज्वालादेवी शक्तीपीठ म्हणून गणले जाऊ लागले. ही मनात चालणारी कथा संपली ती ढाब्यावर गाडी थांबल्यावर कारण पेटपूजा ही महत्वाची होती. गाडीतही भक्ती गीतांचे फोल्डर सुरू असल्याने वातावरणही भक्तिमय झाले होते. जेवण उरकले, पुन्हा प्रवास सुरू झाला मध्यरात्री दिडच्या सुमारास आम्ही. कसेटी गावात पोहचलो, मारूती तायनाथ यांनी फोनवरूनच एक धर्मशाळा मुक्कामासाठी बुकिंग करून ठेवली होती. पडल्या पडल्या शांत झोप लागली. पहाटेच उठलो साक्षात ज्योतावाली मातेच्या दरबारात पोहचल्याचा आनंद होताच. प्रात:विधी उरकला, मस्त ताजेतवाने होऊन मंदिराचा रस्ता धरला. मनातल्या मनात मला येत असलेले कनकधारा स्त्रोत्र सुरू होते...


अंगम हरे पुलकभूषणमाश्रयंन्ती! 

भृंगांगनेव मुकुलाभरणं तमालमं!

अंगीकृताखिलविभूतिरपांगलीला!

मांगल्यदास्तु मम मंगलदेवताया!


कोणत्याही शक्तीपीठा जवळ गेलो की हे कनकधारा स्त्रोत्र आवर्जून आठवते, पहिले हे स्त्रोत्र पाठ होते, आता यातील काही ओळीच आठवतात मग त्याच मनातल्या मनात गुणगुणतो. धर्मशाळावाल्याने देवीला जाणारा मधला मार्ग सांगितला होता. त्याच पायवाटेने मी संजय जाधव, मारूती तायनाथ, राजेश क्षीरसागर चालत होतो. पर्वताच्या पायथ्याशी हे मंदिर असल्याने थोडे चालावे लागले, मनात आनंदाला उधाण आले होते, जे स्वप्नी दिसत होते, ते आज डोळे भरून साक्षात पहाणार होतो. ज्वालादेवीच्या मंदिराच्या पाय-या सुरू झाल्या अन कंठ दाटून आला. भक्ती आणि भाव जिथे उत्पन्न होतो तिथे आपोआपच कंठ दाटून येतो. डोळ्यात आनंदाश्रूनी दाटी केली होती. क्षणाचाही विलंब न करता देवीच्या दर्शनाच्या रांगेत उभे राहीलो. हात जोडलेले, डोळे मिटलेले ज्वालादेवीच्या तेजोमय रूपात लीन होऊन गेलो. एक एक माणूस पुढे सरकत होता, तस तसे माझ्या डोळ्यांची पापणी ताणली जात होती. कारण ज्वालादेवीचे ज्योतीपुंज डोळ्यात साठवून हदयात बंदिस्त करायचे होते. कोरोनाचे संकट असल्याने दूरवरूनच माता ज्वालादेवीचे दर्शन झाले. युगेनयुगे तेजाळत असलेले हे दिव्यस्वरूप पहाताना पूर्ण लीन झालो होतो. अखंड तेजाळत असलेल्या दिव्यस्वरूप सती मातेचे मनभरून दर्शन घेतले. मंदिराच्या बाहेर आलो, कळसाचे दर्शन घेतले.. आजवर मुर्ती स्वरूपात असणा-या देवी देवतांचे दर्शन घेत होतो आज ख-या अर्थाने दिव्यस्वरूप व अद्भुतेचे दर्शन झाले होते. ज्वालादेवीचे दर्शन घेऊन गोरक्षनाथ मंदिराचे दर्शन घेतले तिथे पण असाच एक चमत्कार आहे, एक खोल खड्डा आहे त्या खड्याच्या वरती एक ज्वाला आहे ती पण सतत पेटलेली असते. त्या खड्यातील पाणी सतत उकळत असते. अशा दैवी शक्तीचे दर्शन घेऊन खाली आलो. ज्वालादेवीच्या मंदिराच्या बाजूला बादशाह अकबराने अर्पण केलेले सोन्याचे छत्र एका पेटीत ठेवलेले दिसते. त्याविषयी जरा कुतुहल होते कारण त्यावेळेसच्या मुस्लीम आक्रमकांनी भारतातील मंदिर संपूर्ण उध्वस्त केलेली आज आपल्याला संपूर्ण भारतात पहावयास मिळतात.. अशाच प्रकारे या मंदिरावर पण बादशाह अकबराने अतिक्रमण केले होते या दिव्य ज्योतीला विझविण्याचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केला. कधी संपूर्ण नदीच या ज्योतीच्या बाजूने फिरवली परंतु ही ज्वाला विझली नाही. सैनिकांच्या व्दारे तिला गाडण्याचा प्रयत्न केला तरी ती विझली नाही.. नानाप्रकारे प्रयत्न करूनही ज्वालामाता विझली नाही. तेथील मधमाशांनी मोगली सैन्यावर हल्ला चढवून सैन्याला नामोहराम केले. अखेर अकबर बादशाह ज्वालादेवीला शरण आला व त्याने हे सोन्याचे छत्र देवीला अर्पण केले. अशा अनेक कहाण्या या ज्वालादेवीशी निगडित आहेत. विज्ञानच काय पण पुर्वीच्या काळातील महासत्तेला सुद्धा गुडघे टेकायला लावणारी माता "ज्वालादेवी".. खरतर माझे खूप दिवसांचे स्वप्न पूर्ण झाले होते. ज्वालादेवीला समस्त जनांच्या कल्याणाचे दान मागितले, पुन्हा एकदा कळसाचे दर्शन घेतले, योग आलातर पुन्हा दर्शनास येईल अशी इच्छा प्रकट केली अन जड अंतःकरणाने मंदिराच्या पाय-या उतरू लागलो..


जगी तुझ्या लेकराला तुच सुखी ठेव!

जगी तुझा महिमा तुझी किर्ती मोठी! 

दु:खामध्ये हाक मारीता तुच रक्षणा धाव!


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१

११/०२/२०२१


धवल हिमाचल

 माझी सहल "हिमाचल"

संदीप राक्षे✍🏻


हिमाचल म्हणजे बर्फाळ प्रदेशाचे राज्य, शिवशंकरांची सासुरवाडी अशी ही देवभुमी, अशा या धवल निसर्ग यात्रेसाठी आम्ही पंचकुला, पिंजौर, कालका, जबली ही गाव मागे टाकीत पंजाबची सीमारेषा संपून हिमाचल प्रदेशच्या हद्दीत प्रवेश केला. हिमाचल प्रदेश सुरू झाला, हे कळले आम्हाला डोंगराच्या कडेला एकावर एक घरांचा थर पाहिल्यावर, कधी एकावर एक घरांचा थर तर कधी पाईन्स या झाडांचे जंगल असा प्रवास करीत आम्ही हिमाचल मधील सोलन या शहरात पोहचलो. फ्रेश होण्यासाठी व पाय मोकळे करण्यासाठी सोलन शहराच्या अलिकडेच थांबलो. तिथे काही स्थानिक व्यक्ती उभ्या होत्या, त्यांच्या कडून काही माहिती मिळेल जेणेकरून पुढचा प्रवास सुखकर होईल.. आम्ही सर्वजण फ्रेश झालो, इन्होव्हा गाडीत बसून बसून जड झालेले पाय मोकळे केले. त्या व्यक्तींच्या जवळ गेलो नमस्कार घातला. ते जरा आश्चर्य चकित झाले, त्यांनी पटकन ओळखले, महाराष्ट्र से हो ? आम्ही हो म्हणालो ते कुतूहलाने इकडे तिकडे पाहू लागले. हे चौघेच लक्झरी बस तर कुठे दिसेना मग आम्हीच सांगितले आम्ही आमचीच गाडी घेऊन आलो आहोत.. ते हैराण झाले कस शक्य आहे इतक्या दूरवरून तुम्ही गाडी घेऊन आलात त्यातला एकजण बोलला? मान गये उस्ताद, बराच वेळ गप्पा झाल्यावर कळले की हे दोघेही फाॅरेस्ट अधिकारी आहेत. त्यातल्या एकाने नाव सांगितले "मै प्रेम कुंअर हूँ" मग ते सांगू लागले, तुम्ही डिसेंबर जानेवारी या महिन्यात हिमाचलला यायला हव होतं, आता बर्फ कमी झाला आहे. कुलू मनाली मै हनिमून के लिए आनेवालोंकी भीड ज्यादा बड गयी है. तुम्हाला जर निवांत व गर्दी नसलेल्या ठिकाणी जायचे असेल तर आम्ही सांगतो, तुम्ही चायल या ठिकाणी जा, तेथून तुम्हाला सिमला जवळ पडेल, जास्त त्रास होणार नाही. त्या दोन अधिका-यांनी जो मार्ग दिला, तोच मार्ग आम्ही सर्वांनी स्विकारला व त्याच मार्गाने आम्ही निघालो. निसर्गाचे अद्वितीय रूप पहायला मिळाले ते सोलन शहरा कडून चायल इथे जात असताना. संपूर्ण चार दिवसांचा थकवा निसर्गाचे हे अद्भुत रूप पाहताना कुठल्या कुठे पळून गेला होता. दूरवर जाणारा घाट, नागमोडी वळणं, गुलाबी थंडी व आजूबाजूला पडलेला बर्फ, आयुष्यात पहिल्यांदाच साक्षात बर्फाळ प्रदेशात आलो होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ मोठ्या दगडाच्या आकाराचे बर्फ दिसत होते. गाडी थांबवून त्या बर्फाच्यावरून हात फिरवीत होतो, डोळे भरून हा निसर्गाचा चमत्कार पहात होतो. दुपारची दोनची वेळ होती तरी सकाळचे आठ वाजले असे वातावरण होते, सूर्य होता पण त्याच्या उन्हाची ताप नव्हती. ऊन असूनही बर्फ विरघळत नव्हता हे विशेष होते. जर कधी पाऊस पडला तरच हा बर्फ विरघळून जातो. म्हणजे लोहा लोहे को काटता है, ही म्हण तिथे खरी झाली. आमच्या जवळच्या बिसलरीचे पाणी त्या बर्फावर ओतून पाहिले तर खरच पूर्ण बर्फ विरघळून गेला होता. वाटेने प्रवास करताना अनेक ठिकाणी थांबून या निसर्गरम्य परिसराचे हे सुवर्णस्वरूप डोळ्यात साठवत होतो. कुठेही जरासाही सपाट भाग दिसेना जिकडे तिकडे अफाट पर्वत रांगा व त्यावर पांघरलेला बर्फ, बर्फावर सुर्याची किरणं पडली की सोन्या सारख चमकणारे रूप मंदिराच्या कळसा प्रमाणे वाटत होते. अनेक पर्वत रांगा पार करीत आम्ही साधूपूल येथे पोहचलो, साधूपूल हे हिमाचल मधील आसन नदीवरील पुलाचे नाव व याच नावाने नदीच्या किनारी हे गाव वसलेलं. गाडीतून वरती पाहिले तर असंख्य पर्वत शेषनागा प्रमाणे फणा काढून उभे असलेले, घोंगवणारा वारा जणू काही शेषनागा प्रमाणे हे पर्वत फुत्सकारात आहेत. गाडीतून उतरलो नदीकाठावर पोहचलो, पाण्यात हात भिजवला संपूर्ण हात बधीर झाला होता, इतके थंड पाणी की अजून टेंपरेचर कमी झाले तर ही नदीचं गोठून जाईल. पुन्हा पाण्यात हात घालण्याचे धाडस होईना. नदीचा रोमहर्षक परिसर पाहून आम्ही गाडीत बसलो, आता आम्हाला साडेतीन हजार फुट उंच चायल या शहराकडे जायचे होते. जाताना पर्वत रांगांच्या कुशीत अनेक महात्मे आपआपल्या मंदिरात ध्यानस्त बसलेली दिसत होती. इतकी शांती की टाचणी पडली तरी सहज आवाज येईल. कदाचित वादळापूर्वीची ही शांतता असेल. असाच प्रवास करताना दूर पर्वतावर असणारे सुंदर मंदिर आम्हाला खुणावत होते. आम्ही सर्वांनी ते पहाण्याचा निश्चय केला. त्या मंदिराकडे जाणार रस्ता शोधला..पर्वताच्या कपारीतून हा गाडी रस्ता बनविला होता. छाती धडधड करीत होती. आजूबाजूला खोल खोल दरी आणि त्यामधून आमची गाडी चाललेली सात आठ किलोमीटरचा प्रवास करून आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारात पोहचलो, बाॅर्डरवर जशी सुरक्षा असते तशी सुरक्षा या मंदिराच्या आजूबाजूला होती. आम्हाला जरा नवल वाटले. सुरक्षा रक्षकाने आम्हाला आधार कार्ड विचारले ते सर्वांनी दाखवले, वहीत त्याने नोंद केली, आमची तपासणी करून आम्हाला मंदिरात प्रवेश दिला. लाखो रू खर्च करून या मंदिराची उभारणी स्वामी अमरदेवजी महाराज यांनी केली आहे.   या मंदिरात राधा कृष्ण, राम सीता, शंकर पार्वती, गणपती, पंचमुखी हनुमान, अकरा मुखी हनुमान तसेच नवग्रहांच्या भव्य मुर्तींची स्थापना केलेली. पंचतारांकित असे मंदिर पाहून परमानंद झाला. आम्ही सुरक्षा रक्षकाकडे स्वामीजींना भेटण्याची इच्छा प्रकट केली. तर त्या रक्षकाने सांगितले स्वामीजी आपल्या कुटीमधे गेली महिनाभर साधना अवस्थेत आहेत. ते कोणालाही भेटत नाहीत. बोलत नाहीत, काही खात पण नाहीत. दूरूनच आम्ही त्या कुटीचे मनोभावे दर्शन घेतले. आजूबाजूला कसलीच लोकवस्ती नाही तरी हे भव्य मंदिर, ते महात्मे करीत असलेली निर्गुण साधना, उपासना वातावरणात चैतन्य निर्माण करीत होती. तसेच त्या मंदिरातील प्रत्येक मुर्तीच्या चेहर्‍यावरील सात्विक छटा पाहून सर्व इंद्रिये अंतर्मुख होऊन, चित्त स्थिर होऊन अंतरंगातील भक्तिरस वाढीस लागला होता. नुसत्या निर्जिव मुर्त्यांच्या सहवासाने अमृतापेक्षाही गोड असा अमृतरस चाखावयास मिळाला होता. खरच हिमाचल ही देवभूमी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले होते. आता चायल गावाशिवाय कुठेही थांबायचे नाही असे ठरले कारण प्रत्येक अंतरावर काही ना काही भव्य दिव्य असे दिसत होते टाईमपास होत होता, अन वेळ सहज पुढे जात होती. सायंकाळचे पाच कधी वाजले हे कळले पण नाही. पस्तीस किलोमीटरचे अंतर पार करून आम्ही चायल गावच्या पायथ्याशी पोहचलो होतो. रात्रीचे आठ वाजले होते. गडद अंधार, नागमोडी वाट आजूबाजूला चीट पाखरू पण नाही असा प्रवास सुरू होता. मस्त जुन्या गाण्यांचे फोल्डर सुरू झाले होते. घाट सुरू झाला होता. पहिल्या गियर शिवाय गाडी पण पुढे धावत नव्हती. अचानक गाडीच्या हेडलाईटचा कलर निळसर झाला. आमचे सर्वांचे लक्ष त्या निळसर लाईटकडे आकर्षित झाले. गाडी साईटला घेतली, गाडीची लाईट तशीच सुरू ठेवली. कारण हे चमत्कारापेक्षा कमी नव्हते, समोरचे दृश्य पाहून आम्ही सर्वजण थक्कच झालो होतो. एका विशिष्ट वळणावर, एका विशिष्ट रेषेत गाडीचा प्रकाश बर्फाच्छादित पहाडीवर पडला होता, पहाडीच्या वरती आकाश निळेशार दिसत होते, लाईटचा व आकाशातील निळ्या प्रकाशाचा संगम होऊन तो निळा प्रकाश पूर्ण बर्फावर पसरला होता. त्यामुळे संपूर्ण बर्फाच्छादित पहाडी निळीशार झाली होती. मनसोक्त फोटो काढले, हे विहंगम दृष्य पाहिल्यावर कवी ग्रेस यांची निळाई ही कविता सहजच आठवली..


असे रंग आणि ढगांच्या किनारी

निळे ऊन लागे मला साजणी!

निळे घाटमाथे निळ्या राउळांचे

निळाईत माझी भिजे पापणी!


चायल हे हिमाचल प्रदेशातील एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. सोलन जिल्ह्य़ातील हे गाव सोलन पासून ४५ किलोमीटर अंतरावर आहे. इथे काली टिब्बा, क्रिकेट मैदान व पोलो मैदान प्रसिद्ध आहे. समुद्र सपाटीपासून हे गाव तीन हजार पाचशे फूट उंचीवर आहे. रात्री आम्ही चायल मुक्काम केला. सकाळीच उरकून आम्ही काली का टिब्बा हे मंदिर पहाण्यासाठी निघालो हे मंदिर चायल गावापासून १३०० फूट उंचीवर आहे. नागमोडी रस्ताने मार्ग काढीत आम्ही मंदिरात पोहचलो, काली माता या मंदिरात पिंडीच्या स्वरूपात स्थित आहे. इथे विविध धातूंच्या पाच पिंडी आहेत. अतिशय सुबक आकाराचे हे मंदिर, मंदिराच्या बाहेरील बाजूला एक धुनी अनेक वर्षांपासून पेटलेली आहे ती कधीच विझत नाही. उंचावरून हिमाचल प्रदेशाचा प्रत्येक जिल्हा चोहोबाजूंनी दिसत आहे. जिकडे पहावे तिकडे पर्वतच पर्वत दिसत होते. हिमालयाच्या कुशीतील हे हिमाचल प्रदेश हिमालयाचाच एक भाग आहे. अतिशय सुंदर निसर्गरम्य रूप, असंख्य पर्वतांचे टोकदार सुळके, त्यावर असलेला बर्फ आणि पडलेला सूर्यप्रकाश सोनेरी स्वर्गाची आठवण करून देत होते. आता ओढ लागली होती ती पर्वतांची राणी शिमला शहर पहाण्याची, शिमला शहरातील पर्वतावरील बर्फाच्छादित चादर पहाण्याची. शिमल्याला जाताना अर्की गावात दुपारचे जेवण केले अन शिमल्याच्या दिशेने इन्होव्हा गाडीची चाकं धावू लागली. गाणी गुणगुणत, रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या, आभाळाला टेकणा-या देवदार वृक्षांचे जंगल पहात देवदार वृक्षांवर पडलेला बर्फाचा सडा पहात प्रवास सुरू होता. जस जसे शिमला शहर जवळ येत होते. तसे बर्फाचे साम्राज्य अधिक दिसत होते. रस्त्याच्या कडेला दगडाच्या आकाराचे बर्फाच्या तुकड्यावर आतापर्यंत समाधान मानीत आलो, पण आता पर्वत, झाड, घर, हाॅटेल पूर्ण बर्फाने झाकोळलेली पाहून मन अधिक आनंदीत होत होते. इतर वेळेस आग ओकणारे डोळे सुखावत होते. बर्फाचे पर्वत पाहून तर अक्षरशः थंड पडले होते. शिमला दहा किलोमीटर दूर होता, एका पहाडाला पूर्ण तारेचे कंपाऊंड केले होते, त्या पहाडावर बर्फ पडत होता, असे भासत होते शिवशंकराचा भस्मच पडतो आहे. जाव आणि हा भस्म भाळाला लावून पवित्र पावन व्हावं. थोडं पुढे गेल्यावर बर्फावर खेळण्याचा, चालण्याचा मोह आवरेना. आपल्या मुळे या सफेद संजीवनीला कुठेही डाग लागू नये याची खबरदारी घेऊन मनसोक्त बर्फातून हुंदडलो, झोपलो, बर्फ अंगावर घेतला, एकमेकांच्या अंगावर फेकला..


धवल निसर्गाची किमया 

पाहिली आज मी डोळा,

विसरलो देहभान, हरपलं मन,

काय वर्णू मी अद्भुत सुखसोहळा.


धवल निसर्गाचा आनंद घेत आम्ही शिमल्यात पोहचलो, हिमाचल प्रदेशच्या राजधानीचे हे शहर अतिशय गजबजलेलं होतो प्रचंड गर्दी, त्यातून पर्वतावर वसलेलं शहर एकमेकांच्या उरावर असलेली हाॅटेल, तेथील स्थानिकांची घर सुबक पणे सजवलेली होती, परंतु प्रत्येक घराला अंगण हे नव्हते, आपल्याकडे अंगण या विषयावर अनेक गाणी रचली गेली पण शिमला हे शहर अतिशय वेगळं होत. अंगणापासून वंचित होतं, कपारीच्या कडेला घर, बाहेर येवून पहायचं म्हटलं तर अंगणाच्या ऐवजी प्रचंड खोल दरी. वरून पडला की सरळ स्वर्गलोकचं. कुठेही सपाट जागा नसणार शहर पण अतिशय नियोजन बद्ध होते. अनेक सुखसोई युक्त अस हे शहर अनेक पर्यटकांचे आवडणारे शहर, नुकताच बर्फ पडून गेल्याने रस्त्याच्या दोन्ही कडेला बर्फाचा खच पडलेल्या त्याच सोबत अनेक टूव्हिलर, फोर व्हिलर कच-या सारख्या त्या बर्फाच्या विळख्यात अडकलेल्या होत्या. काही गाड्यातर दोनच दिवसांत सडून गेल्या होत्या. हे भयानक विद्रूप रूप पाहून आम्हाला पण खूप भिती वाटली कारण आम्ही पण गाडी घेऊन आलो होतो. जर कधी बर्फवृष्टी झाली अन गाडी जर अडकली तर भंगार मधे विकण्याशिवाय पर्यायच नव्हता.. आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळ पाहून शिमल्यातून आम्ही लगेचच पळ काढला. कारण पुढे पण आम्हाला ज्वालादेवीच्या दर्शनाला जायचे होते. माझ्या सोबत या धवल निसर्ग सहलीत संजय जाधव, मारूती तायनाथ, राजेश क्षीरसागर हे सहकारी होते..


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


Tuesday, 2 February 2021

विरूपाक्ष मंदिर

 भारताच्या सुवर्ण वैभवाच्या पाऊलखुणा..

"विरूपाक्ष मंदिर" हंम्पी कर्नाटक 

संदीप राक्षे ✍🏻


सासिवेकालु आणि कडलेकालु ही दोन गणपतीची मंदिर पाहून आम्ही कर्नाटकचे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र विरूपाक्ष मंदिर पहाण्यासाठी निघालो. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर विरूपाक्ष मंदिर आहे. विरूपाक्ष ही देवता भगवान शंकराचा अवतार मानला जातो. विरूपाक्ष म्हणजे तिरकस डोळ्यांचा देव, हे मंदिर विजयनगर (हंम्पी) च्या साम्राज्याचे मुख्य केंद्रस्थान होते. संपूर्ण विजयनगर राज्य उध्वस्त झाले परंतु हे विरूपाक्ष शिवमंदिर जस होत तसच आजही इतिहासाची साक्ष देत भक्कम पणे उभ आहे. चौदव्या शतकात पंपातीर्थ स्वामीस्थळ म्हणून जगप्रसिद्ध होते. या मंदिराचे प्रवेशद्वार १०८ फुट उंच आहे  अतिशय बारीक कोरीव नक्षीकाम अजून सुस्थितीत असून द्रविड स्थापत्याचा अद्भुत नमुना आहे. या मंदिरात अनेक गोपुरे आहेत, गोपूर म्हणजे पिरॅमिड सारख शिखर, ग्रॅनाईट आणि विटावर प्लॅस्टर ने नक्षीकाम केलेले अतिशय सुंदर दिसते. सोनेरी कळस, सोनेरी मोर पीस खोवल्या सारखी दिसतात. हे सार पाहून आम्ही मुख्य मंदिरात शिरलो. भली मोठी रांग दर्शनासाठी होती. आम्ही तिघेही रांगेत उभे राहीलो,  रांगेत जरी उभे असलो तरी नजर मंदिराच्या नक्षीकामाकडे होते. सिंह, हत्ती, घोडे, मगर अशी विविध शिल्प कोरलेली दिसत होती. प्रत्येक खांबावर प्राण्यांच्या आकाराचे शिल्प कोरलेले होते. गर्दी पुढे सरकत सरकत आम्ही गाभा-या जवळ येऊन पोहचलो. विरूपाक्ष देवाचे मनापासून दर्शन घेतले, गाभा-यातून बाहेर पडलो, शेजारीच कृष्णदेवराय राजाच्या काळातील राज्याभिषेक मंडप पाहिला. मंडपाला नक्षीकाम व अलंकाराने मढवलेले कित्येक खांब दृष्टीस पडत होते. खरतर हे वैभव पाहून आम्हाला आमचाच विसर पडला आपण आधुनिक काळातील आहोत. इतके या वास्तूपाहून मंत्रमुग्ध झालो होतो. खरतर चौदाव्या शतकातून आपण बाहेरच पडू नये असे सारखे वाटायचे, सुर्यदेव ही आपली दिनचर्या संपून मावळती कडे झुकत होते. संपूर्ण अवनीवर सव सांजेचा अंधूक प्रकाश पसरत चालला होता. आमच्या गाडीकडे जाताना पुन्हा पुन्हा या वास्तूकडे नजर जात होती. काळोखाचे साम्राज्य वाढून इथल्या वास्तू सुद्धा काळोखाच्या कचाट्यात सापडून दिसेनाशा झाल्या होत्या.. हंम्पीच्या वास्तूतले हे शेवटचे पवित्र स्थळ पाहून, आम्ही पुण्याकडे मार्गस्थ झालो..


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...