Saturday, 8 May 2021

नरनाळा अभयारण्य

 वन्यजीवांचे माहेरघर "नरनाळा अभयारण्य" 

संदीप राक्षे. ✍🏻


              चैत्र पाडव्याचा साडेतीन मुहूर्ताचा दिवस, माझ्यासाठी एक पर्वणीच घेऊन आला होता. नरनाळा किल्ला पाहून मी अभयारण्य पहाण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी शून्य होती. मी एकटाच पर्यटक व सोबत गाईड आणि फाॅरेस्ट शिपाई असे तिघेच जण नरनाळा अभयारण्याच्या परिसरात होतो. हीच संधी होती मनसोक्त हुंदडायची, जंगलाच्या निसर्गरम्य वातावरणात रमण्याची. पाय मोकळे करण्यासाठी थोडा गाडीच्या खाली उतरलो आणि गवतावर चालू लागलो. चालत असताना कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या कवितेच्या चार ओळी आठवल्या..


तरूवरची हसतात त्यास पाने 

हसे मूठभर ते गवतही मजेने 

वाटसरू वाट तुडवीत त्यास जात 

परी पाचोळा दिसे नित्य शांत..


असाच काहीसा भास मला येथील वातावरणात आल्यावर झाला. चैत्राची नवी पालवी फुटल्याने झाडावरची लुसलुशीत छोटी पानेही आज हसताना दिसत होती. आज वाराही मंद असल्याने पाचोळाही शांत होता. आवाज न करता. सुकलेले गवतही आनंदाने डूलत होते, बदललेल्या ऋतूंचे स्वागत करीत ताठ मानेने डोलत होते. या विचारात मग्न असतानाच सागाच्या वाळलेल्या पानांचा कर-कर आवाज येऊ लागला. मी आजुबाजूला पाहिले. तो पर्यंत गाईडने आवाज दिला, साहेब" ते पाहा सांबर. माझी नजर गाईडच्या बोटाच्या दिशेने वळली. भले मोठे मादी जातीचे सांबर उभे होते. गाईडने मला गाडीत बसण्यासाठी नजरेनेच खुणावले. मी क्षणाचाही विलंब न करता गाडीत बसलो. गाडीत बसून मी त्या सांबराचे मनसोक्त फोटो काढले. मला गाईड आणि शिपाई यांनी सक्त ताकीद दिली, या पुढे आपण गाडीतून उतरायचे नाही. कारण अशा प्राण्यांच्या मागावर हिंस्त्रप्राणी असतात. जंगल सफारीच्या सुरवातीलाच सांबराच्या दर्शनाने सुखावलो होतो. अरुंद रस्त्याने आम्ही धारगडच्या दिशेने निघालो होतो. वाटेत जाताना फुलपाखरं, विविध पक्षी न्याहाळत होतो. मोर-लांडोर तर क्षणाक्षणाला दिसत होते, पण ते आमच्या वा-यालाही थांबत नव्हते. कितीतरी वेळा फोटो काढण्यासाठी मोबाईल हातात घेतला की गायब. सतत निराशा व्हायची, पण नेत्रसुख मिळायचे हे महत्वाचे. एका कड्याच्या ठिकाणी, गाईडने गाडी उभी करायला सांगितली. गाडीतून आम्ही खाली उतरलो. कड्याच्या काठावरून गाईडने खाली पहायला सांगितले. इतका सुंदर देखावा पाहून मी थक्कच झालो. एका पाणवठ्यावर हरणांची जोडी आपल्या पाडसा समवेत पाणी पीत होती. आमची जास्त हालचाल चटकन त्यांच्या लक्षात आली. ते पाणी प्यायचे सोडून तिघेही आमच्याकडे पाहू लागले. बराच वेळ आमची नजरानजर झाली. त्यातले एक हरीण ओरडायला लागले. आम्ही आल्याचा संदेश कदाचित ते इतर प्राण्यांना देत असावेत. आम्ही गेल्याशिवाय ते पाणी पिणार नाहीत हे मलाही जाणवले. पुन्हा एकदा मन भरून त्या हरणाचे कुटुंब पाहिले आणि मागे सरलो. पुन्हा गाडीत येऊन बसलो आणि नलदमयंती तलावाच्या जवळ पोहचलो. तिथेही सांबरांच्या दहा-बारा जोड्या मस्त लुसलुशीत हिरवे गवत खाताना नजरेस पडल्या. ते मनोहारी दृष्य पाहून पुढे निघालो. जरा दाट जंगल लागले होते आणि वाट जरा अरुंदच होती, अचानक झाडीतून चार रानडुक्करांची झुंड गाडीला आपले शरीर घासून पुढे निघून गेली, खरंतर मला तो एक प्रकारचा दमदाटीचा प्रकारच वाटला. "जानेवालो जरा होशियार यहा के हम है राजकुमार" अशा तो-यात जाणारी ती झुंड दिसेनाशी होईपर्यंत गाडी बंद ठेवून पहात होतो. ते जाई पर्यंत मनात खूप भिती होती. त्यांचे सुळे दात पहातानाच माझी दातखिळी बसली होती. तशातही एकाचा फोटो मी टिपलाच. तेथून थोडे अंतर कापल्यानंतर रस्त्यावरच भले मोठे सांबर उभे होते, जोरात ब्रेक दाबून गाडी थांबवली. दहा ते पंधरा मिनिटं ते रस्त्यावरून हललेच नाही. ते आमच्याकडे पाहात आणि आम्ही त्यांच्याकडे पाहात राहिलो. बराच वेळ ते रस्ता अडवून उभे होते. काही वेळाने ते बाजूच्या झाडीत गेले आणि आमचा रस्ता मोकळा झाला. त्यानंतर गुलरघाटाकडे चला असे गाईडने सांगितले. गाडी वळवली आणि गुलरघाटाकडे निघालो. जिथे वाघांचे साम्राज्य आहे. दुपारच्या वेळेस ते तेथील तलावात भिजण्याचा आनंद घेत असतात. असे फाॅरेस्ट शिपायाने सांगितले. ते ऐकून जरा मनातून चरकलोच. गुलरघाटाच्या मुख्य गेटवर गाडी थांबवली आणि "तलावाकडे लक्ष दया" असे गाईडने सांगितले. तोपर्यंत तलावातून एक प्राणी जमिनीकडे झेपावून दिसेनासा झाला होता. खूप दूरचे अंतर असल्याने नेमके काय होते हे सांगता येणार नाही, पण नक्कीच वाघ किंवा बिबट्या असणार याची खात्री दोघांनी पण दिली. अभयारण्यात फिरताना ससा, कोल्हा, रान कोंबडा, अस्वलांच्या पायांचे ठसे पहायला मिळाले. 

                   एकदा केरळच्या जंगल सफारी साठी गेलो असताना अनुभवास आले, तिथे सफारीसाठी एका माणसाचे प्रत्येकी तीन हजार आकारले जातात.  दिवसभर फिरूनही त्या जंगलात साधी खारूताई पण दिसत नाही. त्याउलट महाराष्ट्रातील ही अभयारण्ये म्हणजे वेगवेगळ्या जातींच्या पक्षी व प्राण्यांचा मेळाच. ख-या अर्थाने आजची सफर सफल झाली होती.        

            अशावेळी निसर्गकवी राजकिशोर सुनानी, ओरिसा, यांच्या कवितेची आठवण झाली. निसर्गाला भगवान मानणारे हे कवी आपल्या कवितेत सांगतात. भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, वा म्हणजे वायू,  न म्हणजे नीर. असा हा भगवान आपणही पुजायला हवा. त्याचे रक्षण करायला हवे.


(त्यांची ही भाषांतरीत कविता)


ही माती आम्हाला देते हिरवाई, 

झाडं आणि कंद आणि फळं...

या नभातून मिळतो पाऊस आणि झऱ्यांचं पाणी...

पाणी जणू काही आईचा पान्हा

हा पान्हाच आमची भागवतो तहान..

मित्रांनो, डोंगर, झरे, जंगल आणि जमीन आमचा हा भगवान...!


संदीप राक्षे✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


रायगड एक विद्यापीठ

 *रायगड*....

*एक मोहीम*...

*शिव विद्यापीठाची*....

*संदीप राक्षे* ✍🏻


रायगड हे *वैश्विक* महातिर्थ आहे.

स्वातंत्र्य सैनिकांची काशी, गया, वाराणशी आहे...

महाराष्ट्राच्या संस्कृतीची ती *गंगोत्री* आहे.

पुरूषार्थ आणि पराक्रम यांचे ते *प्रेरणास्थान* आहे..

गो.नि दांडेकर.


निसर्गरम्य खेड तालुका, या  व्हाटसअप गृपवर खलिता मिळाला की, दि. ४/१/२०२० रोजी *रायगड मोहीम* राबवायची आहे. असा अध्यादेश या मोहिमचे सेनापती किशोर राक्षे, रोहीत बोरूडे, वर्षा चासकर यांनी काढललेला दिसला. त्या आदेशाला भरपूर प्रतिसाद मिळाला. अनेक मावळ्यांनी हिरिरीने सहभाग घेतला. त्यामध्ये अजित आरूडे, अशोक कोरडे, गुंडाजी जीवना, संतोष भोसले, कांचन  लांघी, सुप्रिया म्हसे, दिपाली जीवना, प्रतिक्षा शिंदे, दिगंबर शिंदे, विकी हुरसळे, सुप्रिया पिंगळे, उषा होले, बबन होले, अंकिता कहाने, सायली कहाने, गौरी राऊत, काजल दौडकर, नाजुका शेडगे, मयुर गोपाळे, पुजा सावंत, अक्षय भोगाडे, योगेंद्र आंबवणे, रविंद्र भोगाडे, रेश्मा भोसले, वैशाली भोसले, ॠषी गोरे, सुरज नालगुणे, दुर्योधन लवटे, प्रगती गोपाळे, योगेश उभे, अभिनव आरूडे, आदित्य कोरडे, शौर्य पिंगळे या सर्वांनी मोहिमेवर जाण्याचे ठरविले.           

ठरलेल्या वेळेवर सर्व मावळे जमले आणि गाडी सुसाट रायगडाच्या दिशेने मार्गस्थ झाली.

                  भल्या पहाटेच श्रीमान रायगडाच्या पायथ्याशी पोहचलो. निरव शांतता होती. कडक थंडीच्या गारठ्याने अंगात हुडहुडी भरत होती. सुर्यदेवाने संपूर्ण डोंगराईवर सुवर्ण प्रकाशाचा पदर पसरला होता. संपूर्ण  परिसर राजमाता जिजाऊ, छ. शिवराय, व छ. संभाजी महाराजांच्या नावाच्या जयजयकाराने दुमदुमून गेला होता. तो जयघोष अंगावर शहारे निर्माण करीत होता, कारण जगाच्या इतिहासात मराठ्यांचा इतिहास अद्वितीय असा आहे. मराठ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासात नवे पर्व सुरू केले होते. स्वराज्याचेच नंतरच्या काळात विशाल साम्राज्यात रुपांतर होऊन हिंदुपदपादशाही असे नाव त्यास प्राप्त झाले होते. भारतातील सर्वांत शक्तिशाली सत्ता म्हणून मराठ्यांचे साम्राज्य ओळखले जात होते. संपूर्ण जगातील सेनानायकाच्या क्रमांकात छ. शिवाजी महाराजांचे स्थान प्रथम दर्जाचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्षातून स्वराज्याचे सुराज्य घडवून रयतेला स्वातंत्र्य सुख मिळवून दिले होते. जीवाची पर्वा न करता अनेक मोहिमा फत्ते केल्या. या सर्व गोष्टींना रायगड साक्षी होता. याच रायगडावर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने इथली भूमी पवित्र झालेली आहे. इथल्या मातीत पसरलेल्या शौर्याच्या गंधानेही देह पवित्र होतो. हीच सदभावना रायगड चढताना मनाला उभारी देत होती. 

        रायगडाचे प्राचीन नाव रायरी असे होते. हा गड समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर म्हणजे अंदाजे २७०० फूट उंचीवर आहे. गडावर पोहोचण्यासाठी १४०० पायऱ्या चढून जावे लागते. छत्रपतींनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायगडास वेढा घालून रायगड ताब्यात घेतला. कल्याणच्या सुभेदार मुल्ला अहमद याला चारीमुंड्या चीत करून लढाईत काबीज केलेल्या खजिन्याचा गडाच्या पुनःर्उद्धाराच्या कामी लावला. रायगडाची जागा अवघड ठिकाणी असल्यामुळे तसेच ते सागरी दळणवळण व सुरक्षिततेच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे छत्रपतींनी गडाची राजधानी म्हणून निवड करून गडाची रचना हिरोजी इंदुलकरांकरवी त्या दृष्टीने करवून घेतली. गडावर राजसभा, राजनिवास, न्यायसभा, कल्याणसभा, विवेक सभा, दारु कोठारे, अंबरखाने, मंत्र्यांची निवासस्थाने, कचेऱ्या, नगरपेठ, किर्तीस्तंभ, तलाव, मंदिरे, खलबतखाना, हत्तीशाळा, अश्वशाळा, वस्त्रागार, रत्नागार, जगदीश्वर मंदीर, या सुविधांबरोबरच गडाच्या संरक्षण व्यवस्थेतील कडे तासणे, तटबंदी बांधणे, महाद्वार आणि बुरुज, चोरवाटा उभारणे यासाठी आपले कसब पणाला लावले होते.

                चित्त दरवाजाची पहिली पायरी दिसताच नतमस्तक झालो. क्षणभर डोळे मिटले. निरव शांततेत जगदंब, जगदंबचा मंत्रोच्चार कानातून मनात साठवू लागलो. आपसूकच स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांची अविस्मरणीय भुमिका साकारणारे शंतनु मोघे यांची शिवराय साकारणारी मुर्ती डोळ्यासमोर उभी राहीली. या मालिकेतील छ. संभाजींची भूमिका साकारणारे डाॅ. अमोलजी कोल्हे यांच्या सह प्रत्येक भुमिकेतील पात्रे इतिहास डोळ्यासमोर जिवंत साकारतात. या सा-यांचे आभार मानावे तितके थोडेच.

                आता आम्ही सर्वजण मुख्य दरवाजा जवळ पोहचलो. मुख्य दरवाज्याच्या बाहेरील दोन्ही बाजूस हत्ती आणि कमळाच्या सुंदर शिल्पाकृती कोरलेल्या दिसल्या. तसेच दोन्ही बाजूस भव्य बुरूज, पहारेकऱ्यांसाठी आणि संरक्षकांसाठी देवड्या आणि टकमक टोकापासून ते हिरकणी बुरूजापर्यंत भक्कम तटबंदी बांधलेली रांग दिसली. गजशाळेतून येणा-या हत्तींच्या पिण्याच्या पाणाच्या सोईकरिता मुख्य दरवाज्यापासून थोडे  वर चढून गेल्यावर हत्ती तलावाची बांधणी केलेली दिसली. हत्ती तलावापासून गंगासागर तलाव नजरेस पडला. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर आणि नद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात विसर्जित केलेली होती. त्यामुळेच या तलावाचे नाव गंगासागर असे रूढ झाले. गडावर आजही या पाण्याचा उपयोग केला जातो. संपूर्ण तलावाला वेढा घालून आम्ही शिरकाई देवीचे दर्शन घेऊन होळीच्या माळावर पोहचलो आणि शिवकालिन शिमग्याचा सण डोळ्यासमोर उभा राहिला. शिमग्याला धगधगत्या होळीतून नारळ बाहेर काढणा-या शूरवीर मावळ्याला छत्रपतींच्या हस्ते सोन्याचे कडे भेट म्हणून दिले जाई. होळीतून नारळ काढण्याच्या प्रयत्नात अनेकांना अपयश आले. शंभूराजांनी मात्र सोन्याचे कडे मिळविण्याचा मान मिळवला. हे हृदयस्पर्शी चित्र आठवताना मन भरून आले. होळीच्या माळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनास्थ मुर्तीचे मनोभावे दर्शन घेतले. फोटो काढले आणि पुढे राणीवसा, सदर, राजभवन, राजसभेच्या ठिकाणाकडे प्रस्थान केले. आत शिरताच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्याठिकाणी झाला त्या सभामंडपाच्या मध्यभागी पोहोचलो. समोरच २२० फुट लांब व १२४ फुट रूंद अशी पूर्वगामी सिंहासनाची जागा दिसत होती. ६ जून १६७४ शिवराज्याभिषेकाचा तो दिवस, बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन, साक्षात छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरूढ झालेले, शेजारी शंभूराजे आणि राजमाता जिजाऊ, सिंहासनाच्या सभोवार हातांत सुवर्णकलश घेतलेले प्रधान आठ दिशांना उभे राहिलेले, पूर्वेला मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हाती सुवर्णकलश घेऊन, दक्षिणेस सेनापती हंबीरराव मोहिते दुधाचा रौप्यकलश घेऊन, पश्चिमेस रामचंद्र नीलकंठ पंडित अमात्य दही दुधाने पूर्ण भरलेला तांब्याचा कलश घेऊन, उत्तरेस छंदोगामात्य प्रधान रघुनाथ पंडितराव मधु सुवर्णकलश घेऊन, तसेच आजूबाजूला मातीच्या कुंभात सप्तसागर आणि महानदयांचे पाणी भरून ठेवलेले, हातात छत्री धरून सचिव अण्णाजी दत्तो पंडित, पक्वान्‍नांची थाळी हाती घेतलेले सुमंत जनार्दन पंडित, न्यायाधीश बाळाजी, पंडीत मंत्री, महामंत्री, पाहुणे आसनस्थ झालेले, एकीकडे गागा भट्टांचा मंत्रोच्चार सुरू असे अगम्य सोहळ्याचे क्षणचित्र काही क्षण मनपटलावर राज्याभिषेकाच्या यज्ञकुंडातील ज्वांलांसारखे धगधगत असल्याचा भास झाला आणि मंत्रोच्चार पूर्ण होताच कवी भुषणांचे छत्रपतींचे अंगावर शहारे आणणारे गुण गौरवास्पद काव्य कानावर आले.


इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर

रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं!

पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर

ज्यौं सहस्रबाह पर राम द्विजराज हैं!!

दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर

भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं!

तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर

त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज है!!

जय भवानी जय शिवाजी!!


सभामंडपाचे प्रत्येक दालन कधी हाताने, कधी नजरेने स्पर्शून प्रत्येकाच मन भारावून गेले आणि जय भवानी जय शिवाजीचा गजर कानावर आला आणि मी भानावर आलो. सभामंडपातून बाहेर जावे असे वाटत नव्हते जड अंतःकरणाने सभामंडप सोडला. सभामंडप सोडून मागच्या बाजूने धान्याचे कोठार, खलबतखाना व टाकसाळ यांना वळसा घालून खाली उतरलो. बाजारपेठ लागली सूर्य माथ्यावरून खाली सरकू लागला होता. लांबून येणा-या व्यापा-यांच्यासाठी भोजनाची बैठक व्यवस्था याच ठिकाणी केलेली असावी असे उद्गार समुहातील कोणीतरी काढताच सर्वांनाच भुकेची जाणीव झाली आणि भोजन आटपून घेतले आणि पुढे बाजारपेठेकडे निघालो. बाजारपेठेचा विस्तार भव्य असून रुंद रस्ते, दुर्तफा दुकाने, प्रत्येक दुकानास माल साठवण्याकरीता मागे दोन खोल्या आणि खाली तळघर. सारे कसे एका दोरीत दिसत होते. दुकानांची उंची इतकी होती की घोड्यावर बसल्या बसल्या सहज माल खरेदी करता आला पाहिजे अशी रचना केलेली. बाजारपेठ पाहून झाल्यावर आम्ही सर्वजण टकमक टोकाकडे निघालो. बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरलो, जाताना मध्येच एका दारूच्या कोठाराचे अवशेष नजरेस पडले, ते पहात पहात जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता झाला. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा दिसला. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगून सर्वांना फोटोत टिपले. टकमक टोकावरती कडेलोट करणा-या गुन्हेगारांना शिक्षा जरी सुनावली तरी त्यांची अवस्था किती भयानक होत असेल हे टकमक टोक पाहिल्यावर कळले. टकमक टोकाकडून आम्ही आता जगदिश्वराचे दर्शन घेऊन मंदिराच्या मागच्या बाजूला येवून छत्रपतींच्या समाधी स्थळाकडे वळलो. महाराजांचा मृत्यू ३ एप्रिल १६८० रोजी झाला. समोरच समाधीच्या अष्टकोनी आकारातील चौथ-यावर घुमटकार बांधणी केलेल्या समाधीचा जिर्णोद्धार १९२६ साली केल्याची नोंद पाहीली. सर्वांनी आपल्या छत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेतले. कितीतरी उन, वादळे, पाऊस अशा नैसर्गिक संकटांना झुंज देऊन ही समाधी निर्धास्त पणे आजही उभी आहे. एका मानवी नितीमुल्यांची मुर्तिमंत खाण याच ठिकाणी गुप्त झाली होती. भावनाविवश झालेले मन सावरले आणि हा रायगड किल्ला ज्यांनी बांधला ते हिरोजी इंदलकरांच्या पायरीचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन आता परतीचा प्रवास जवळ आल्याची जाणीव झाली.


जो जो या महाराष्ट्र भूमीत जन्मला,

शिवशंभूच्या विचारांचा पाईक झाला.

एकदा तरी याचि डोळा याचि देही

महातिर्थ, महाविद्यापीठ रायगड पहावा..


राजमाता जिजाऊंची महती सर्वश्रुत आहेच. त्यांच्या कीर्तीचा सुगंध अखंड भारतवर्षात तसेच संपूर्ण जगतात सदैव दरवळत आहे. तो तसाच दरवळत राहील. तेजस्वी व अफाट बुद्धीमत्ता असलेल्या जिजाऊंचे पाचाड येथील समाधी स्थळावर जाऊन दर्शन घेतले आणि निसर्गरम्य खेड तालुका आयोजित रायगड मोहिमेची सांगता करण्यात आली...

मोहीमेची जरी सांगता झाली तरी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याच पराक्रमाच्या शौर्याच्या चर्चा सुरू होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वगुणसंपन्नता, विचार आचारांचे अधिष्ठान, देदीप्यमान कार्यकर्तृत्व, ध्येयाबद्दल आसक्ती, दूरदृष्टी, समाजसंघटित ठेवण्यासाठी संघटन कौशल्य, अशा कैक रत्नांचे भांडार म्हणजे शिवरायांचे व्यक्तीमत्व. हे व्यक्तिमत्व ज्याला उमजले, समजले, उलगडले, त्याचे समाजातील स्थान कोणीच हलवू शकत नाही. त्याला हरवू शकत नाही. किती किती थोरवी वर्णावी, किती गुणगान गावं आपल्या या शिवबांचं..! आजही पाकिस्तान, अफगाणिस्तान, इंग्लंड, अमेरिका, जपान, मॉरिशससारख्या राष्ट्रांमध्ये राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात संदर्भासाठी छत्रपती शिवाजी महाराज शिकविले जातात. कुणाही राष्ट्राभिमानी माणसाला प्रभावीत करणारे असे हे आमचे महाराजे, छ. शिवरायांचे कर्तृत्व एवढे अफाट आणि उंच आहे की, त्यापर्यंत पोहोचणे अशक्यच आहे. तरीही त्यांच्या सावलीत राहून स्वतःचा उद्धार करवून घेणे सहज शक्य आहे. म्हणूनच आजच्या घडीलाच नव्हे तर येणा-या पिढय़ांनाही छ. शिवाजी महाराज कळायला हवेत. कारण छ. शिवाजी महाराज ही केवळ एक व्यक्ती नसून तो विचार आहे, सिद्धांत आहे, आणि सिद्धांत हा कधीही कालवश होत नाही. शिवाजी महाराज आजही अजरामर आहेत आणि जोपर्यंत ही पृथ्वी, हे सुर्य-चंद्र, तारे आहेत तो पर्यंत अजरामर राहतील. 


शिवरायांचे आठवावे स्वरुप!

शिवरायांचा आठवावा साक्षेप!

शिवरायांचा आठवावा प्रताप!

भूमंडळी!!


जय भवानी जय शिवाजी...


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...