Sunday, 15 March 2020

काठीगावची होळी, संदीप राक्षे

अनुभूती अद्भुत संस्कृती दर्शनाची, परंपरा काठीगावच्या होळीची:-  संदीप राक्षे ✍🏻

महू, सावर, पळस
आंब्याला पण मोहर.
मोरखी, बुधा, बावा
पारंपारिकतेचा बहर.
काठीगावची होळी पेटते
असतो पहाटेचा प्रहर..

महाराष्ट्र म्हटलं की अनेक परंपरांच माहेरघर, दिवाळी पासून ते गणेशोत्सवापर्य॔तचे सर्व सणवार अति उत्साहात साजरे होत असतात यातूनच बंधूता एकता निर्माण करण्याचे मोठे सामाजिक कार्य केले जाते. प्रत्येक सण हा सामाजिकतेचे प्रतिक आहे. असाच एक सण सातपुडा पर्वत रांगेत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तो म्हणजे होळी, भारतातच या उत्सवाची महती, किर्ती नव्हे तर जगभरात महती आहे. मी फक्त या काठी गावच्या होळी संबंधी ऐकून होतो, पेपर मधे वाचलेले होते. साक्षात पहाण्याचा कधीच योग आला नाही. मनात दरवर्षी प्रचंड इच्छा निर्माण व्हायची, या वर्षी जावूयात, तयारी व्हायची, पण काही ना काही दुसरेच काम निघायचे अन जाणे रद्द व्हायचे. आज नुकताच आश्रमशाळेत फेरफटका मारून नुकताच घरी आलो होतो. तितक्यात आमचे परम मित्र विनोदभाऊ चौधरी यांचा ८/३/२०२० रोजी फोन आला. त्यांनी पहिलेच विचारले उदया कुठे फिरस्तीची योजना तर नाही ना? मी नाही म्हणालो. मग ते म्हणाले जळगाव जिल्हा प्रादेशिक वाहतूक विभागाचे प्रमुख विलासराव चौधरी साहेबांनी काठीगाव, नंदुरबार येथील होळी पहायला जाण्यासाठीचे दि. ९/३/२०२० रोजी योजिले आहे. त्या मधे मी स्वःता साहेब, मालेगाव जिल्हा प्रादेशिक विभागाचे प्रमुख अतुल सुर्यवंशी साहेब, नंदुरबार जिल्हा प्रादेशिक वाहतूक विभाग प्रमुख नितीनजी सुर्यवंशी साहेब, बापूसाहेब चौरै साहेब, उदयोजक अमितजी गायकवाड, गोरे साहेब इतके जण आहोत तुम्ही येणार का? मी कसलाच न विचार करता लगेच होकार दिला. विनोद भाऊंनी सांगितले उदया दहा वाजेपर्यंत नाशिकला पोहचून जा मी नाशिकलाच आहे.
पहाटेच उठलो अन दहा वाजेपर्यंत नाशिकला पोहचलो. तेथून आम्ही सहा जण सटाणा, साक्री मार्गे नंदुरबारला सात वाजता पोहचलो. नंदुरबार येथे चहा पाणी झाला तेथून आम्ही धडगावच्या रस्त्याला लागलो. जाताना गावा गावातील होळ्या पेटल्या होत्या, संपूर्ण गावकरी गावच्या वेशीवर जमून एकत्रित होळीचा आनंद घेत होते. लहान मुल डफडी वाजवून सणांचा आनंद लुटत होती. आकाशातून पांढरा शुभ्र चांदोमामा पण होळी उत्सवाचा आनंद घेत होता. त्याच्या दयेने अंधारावर मात होऊन दूरदुरचे अगदी स्पष्ट दिसत होते. कारण पौर्णिमेचा तो चांदवा होता. खरतर चंद्र हा कल्पना शक्तीचा कारक ग्रह आहे त्यामुळे सहजच जगदिश खेबुडकरांनी लिहीलेल्या काही ओळी आठवल्या.

उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा!
दाही दिशा कशा खुलल्या, वनीवनी कुमुदिनी फुलल्या,
नववधु अधिर मनी जाहल्या, प्रणयरस हा चहुकडे वितळला स्वर्गीचा!!

चंद्रोदयानंतर सारा निसर्गच आनंदमय होतो, आणि प्रणयरसाने भारला जातो त्यात अनेक झाडं, फुल, वेली मोहरून जातात तर प्रत्येक माणसाच्या हदयात प्रेमरसाच्या अनेक लाटां उसळू लागतात. असे काही वातावरण आकाशातील त्या चंद्राकडे पाहून झाले होते, कधी कधी ढगांच्या आड तर कधी कधी डोंगराच्या आड लपून जायचा, असा हा पाठ शिवणीचा खेळ खेळत आमचा प्रवास सुरू होता. आता आमची गाडी सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी आली होती. पुढे खूप मोठा घाट मार्ग चढून आम्हाला पुढे जायचे होते. विरळ झाडीतला सातपुडा पर्वत संपूर्णता उजाड दिसत होता. चंद्राच्या उजेडात पांढरा धक्क दिसत होता. अशातच हातात धारदार हत्यार घेऊन दहा बारा जण रंगीबेरंगी कपडे परिधान करून, चेह-यावर चित्र विचित्र रंगवलेले, काहीनीं चेह-यावर मुखवटे बसवलेले होते. गाडीला आडवे झाले अन मनातल्या भितीने कहरच केला. अचानक गाडी पुढे आलेली ही तरूण मुले काहीतरी मागत होती पण लक्षात येईना. ते नुसते फाग दो, फाग दो म्हणायची इतक्यात चौधरी साहेबांनी खिशातले दहा रू काढले अन त्यांना दिले. दहा रू मिळाले अन ती आदिवासी मुल गाडी पासून दूर गेली. पुढे गेल्यावर चौधरी साहेबांनी सांगितले की हे होळीच्या सणाला पैसे मागतात त्याला फाग म्हणतात. मला जरा हे चमत्कारिक वाटले, पण प्रथा आहे हे कळल्यावर बरं वाटलं, मग आम्ही सर्वानींच सुट्टे दहा दहा रू काढले अन जो गाडीला आडवा येईल त्याला दहा रू देत गेलो. संपूर्ण पर्वत रांगेतून ढोलाचे आवाज आता घुमत होते भयाण शांततेला छेद देत होते. रात्री अकरा वाजता आम्ही धडगाव सरकारी गेस्ट हाऊसला पोहचलो तिथे आमची जेवणाची व राहण्याची सोय केलेली होती. संपूर्ण अधिकारी वर्ग सोबत असल्याने, मनसोक्त सरकारी पाहुणचार घेतला. जेवणाचा बेत मस्त आदिवासी पद्धतीने केल्या मुळे एक वेगळीच चव चाखायला मिळाली. विलासराव चौधरी साहेबांनी आमची सर्व अधिकारी वर्गाशी ओळख करून दिली अन तेथून आम्ही काठीगावाकडे निघालो. धडगावहून पुढे काठीगाव ४० किलोमीटर होते. आमच्या गाडीच्या पुढे प्रादेशिक वाहतूक विभागाची पिवळ्या दिव्याची गाडी होती, आमची गाडी मधोमध आमच्या मागे अजून स्कॉर्पिओ त्यामुळे आमचा रूबाब तर डबल वाढला होता. आपणही कुणीतरी मोठी आसामी आहोत असा मनातल्या मनात भास करून घेत सरकारी थाटात प्रवास सुरू होता. आता दोन किलोमीटर काठीगाव राहिले होते, तिथून पुढे मोठ्या गाड्यांना प्रवेश निषिध्द होता. पण आमच्या पुढे दिव्याची गाडी असल्याने आम्ही थेट काठीगावात पोहचलो. मंगळुरी व जुन्या कौलारूंची घर मस्त लाईटिंग लावून सजवलेली होती. घरात मात्र कोणीच नव्हतं सारे जण होळी उत्सवात मग्न होते. गाडया एका घराच्या समोर उभ्या केल्या अन आम्ही पण पायी उतरून चालू लागलो. असंख्य आदिवासी बंधू समुहाने सजून धजून होळीच्या ठिकाणी निघाले होते. आजूबाजूला गळ्यातल्या रंगीबेरंगी माळा, पोत, डोरले, कुडक्या पिपाण्यांची दुकानं सजली होती. अनेक दुकानांवर झुंबड उडालेली होती. जिलेबीच्या परातीच्या पराती खाली होत होत्या, पिपांण्याच्या आवाजाने तर कानठाळ्या बसत होत्या, अशातच आम्ही होळीचा मुख्य सोहळा जिथे चालतो त्या ठिकाणी पोहचलो. डोक्यावर मोरपिसांचा मुकूट व कंबरेला भल्या मोठ्या घुंगरमाळा बांधलेल्या, आदिवासींचा मोठा समुह आपल्या पारंपरिक शैलीत ढोल, पिरी, पावा, मांदल या वाद्यांच्या तालावर एक विशिष्ट ठेका धरून नाचत होता. एक पाऊल पुढे एक पाऊल मागे घेत कंबरेला हळूच झटका देत होता. त्यामुळे एक प्रकारचा लयबद्ध आवाज ऐकू येत होता त्या आवाजाने आनंदाला उधाण येवून आजूबाजूचा प्रत्येक जण त्यांच्या सोबत ठेका धरीत होता. आम्ही सर्वांनी पण त्यांच्या तालावर थोडावेळ ठेका धरला अन पुढच्या समुहाकडे गेलो, त्यांनी बांबूच्या झाडापासून मुकूट तयार करून त्याला रंगीबेरंगी कागदांनी सजवलेले होते व तो डोक्यावर परीधान केला होता. अन कंबरेला भले मोठे वाळलेल्या भोपळ्यांची माळ बांधलेली होती. ते पण ढोलाच्या तालावर नाचत होते. त्यांच्या मधोमध अस्वल, डाकीण, वाघ्या यांचे मुखवटे घातलेले अनेक आदिवासी नाचताना दिसत होते. अनेक पुरूषांनी स्त्री पात्र साकारली होती ते पण साडी चोळी घालून नाचत होते. या होळीचे वैशिष्ट्य म्हणजे यामधे कुठेही महिलां नाचताना दिसत नव्हत्या. एका टेकडीवर असंख्य महिलांचा समुह हा अविस्मरणीय सोहळा बसून पहात होत्या. वरील प्रमाणे सजलेले असंख्य समुह या होळी उत्सवात दिसत होते. आम्ही संपूर्ण गावाला फेरफटका मारला सगळीकडे तोच उत्साह भरलेला दिसत होता. एकही आदिवासी बांधव थकत नव्हता की बसत नव्हता एक सारखे त्याचे हे पारंपरिक नृत्य सुरूच होते. गावच्या मध्यभागी एका लिंबाच्या झाडाला दिडशे फूट मोठी बांबुची सरळ काठी उभी केलेले होती प्रत्येक जण येवून ती काठी उचलत होता व काहीतरी मागणं मागत होता. आम्ही पण त्या काठीचे दर्शन घेतले थोडी वर उचलली. काही वाद्यांचा समुह बाजूला बोलवून घेतला अन तिथे आम्ही सर्वांनी या पारंपरिक नृत्याचा आनंद लुटला. सगळे जण नाचून घामांत भिजून गेले होते. पहाटेचे चार कधी वाजले हे आम्हाला कळलेच नाही. मुख्य चौकात आता होळी पेटविण्याची तयारी सुरू झाली होती.

पावित्र्याने भरते वर्षानुवर्षं
उभ्या मानवतेची होळी
संस्कृती जपत पेटते
काठीगावची होळी..

१२४६ साली या होळीची परंपरा सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे. आदिवासींचे देवता राजा पाणठा व गांडा ठाकूर यांनी सुरू केलेली ही काठी गावची होळी त्यामुळे या होळीला विशेष महत्त्व आहे. आता सूर्योदयची वेळ झाली होती. गावच्या पाटलाच्या हस्ते होळीची पुजा करण्यात आली. जो लिंबाच्या झाडाला उभा केलेला बांबू आणून होळीच्या मधोमध रोवला गेला. प्रत्येक आदिवासी बंधूनी घरातून लाकडाचा एक एक ओंडका आणलेला होता. ते सर्व ओंडके उभ्या केलेल्या बांबूच्या सभोवती रचन्यात आले. आणि गावच्या पाटलाच्या शुभहस्ते होळी पेटविण्यात आली. होळी पेटली आणि थोड्यावेळातच भला मोठा बांबू आडवा झाला. तेथे असलेल्या मान्यवरांच्या हस्ते त्या बांबुचे तुकडे करण्यात आले अन आलेल्या प्रत्येक आदिवासी बांधवाला ते वाटण्यात आले. मानवी संस्कृतीची मुल्ये जपणारी ही होळी आदिवासींच्या जीवनात महत्वाची आहे. या वर्षी कोरोना या व्हायरस मुळे बाहेर देशातील पर्यटक या होळी उत्सवासाठी उपस्थित नव्हते. महाराष्ट्रातील प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी काठी गावची होळी अनुभवावी याचि देही याचि डोळा पहावी, आपल्या या महाराष्ट्रातील अनमोल अशी संस्कृती जतन करण्याची आदिवासी बांधवांना प्रेरणा दयावी..
महाराष्ट्रामध्ये रूढी परंपरेनुसार त्या त्या भागातील सांस्कृतिक जडण घडण होत असताना इथल्या मातीतला  रांगडेपणा, लोककला संस्कृतीचे वैविध्यपूर्ण वेगळेपण पाहिले की या महाराष्ट्रात जन्माला आलो आहे याचा सार्थ अभिमान वाटतो. काठीगावचा हा नयनरम्य सोहळा पाहून सारेच जण भारावून गेलो होतो. रात्रभरच्या जागरणाने डोळ्यांच्यावर झापड येत होती. शरीर थकले होते पण मन ताजेतवाने होते अशातच काठी गावचा निरोप घेतला अन नाशिककडे प्रस्थान केले...

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Friday, 6 March 2020

गिरीदुर्ग अंतुर किल्ला:- संदीप राक्षे

गौताळा अभयारण्यातील, इतिहासाचे सुवर्णपान असणारा गिरीदुर्ग अंतुर किल्ला. संदीप राक्षे ✍🏻

सकाळी सकाळीच एका किल्याची पोस्ट निसर्गरम्य खेड तालुका या व्हाटसअप गृपवर औरंगाबादचे सुरज नालगुणे यांनी शेअर केली होती. त्या फोटोतला किल्ला ही नविन दिसत होता अन त्या किल्याचे नाव पण ऐकण्यातील नव्हते त्यामुळे उत्सुकता लागून राहिली. अशातच मी सुरज नालगुणे यांना फोन केला व किल्याच्या विषयी माहिती विचारली त्यांनी अतिशय सुंदर किल्याचे वर्णन सांगितले व कसे जायचे ते पण सांगितले. एकदा मनात एखादी गोष्ट भरली तर ती करायचीच हा नियमच माझा, त्यामुळे मनात चक्र फिरू लागली. विचार करता करता शनिवार उजाडला तरी अजून काहीच ठरेना मन अस्वस्थ झाले अन किल्ला काही नजरे समोरून जाईना. एखाद्याला देवभक्तीचा नाद लागतो अन तो कोणत्या ना कोणत्या तीर्थक्षेत्राला, देवाला खेट्या मारत असतो अर्थात त्यामागे मागे काही तरी स्वार्थ असतो. असेच काहीसे या गड किल्यांच्या बाबतीत माझे झाले होते. एक तरी किल्ला अनुभवावा एखादा दिवस तरी त्या गड किल्यांच्या सानिध्यात घालवावा. निसर्गाशी एकरूप व्हावं अस वाटतं अन कधी कधी वाटते या बहुचर्चित तीर्थक्षेत्रांच्या पेक्षा हेच गड किल्ले आपले तीर्थक्षेत्र आहेत. त्यामुळेच या किल्याच्या सानिध्यात जाण्यासाठी त्याला डोळे भरुन पहाण्याची उत्कंठा लागून राहीली. इतक्या दुर ते पण अभयारण्यात किल्याची काही माहिती नाही सोबत कोणी तरी असले पाहिजे म्हणून खुप विचार केला कोणाला सोबत घेऊन जावं तितक्यातच खेडचे रोहीत दादा बोरूडे यांचे नाव आठवले क्षणाचाही विलंब न लावता रोहीत दादाला फोन लावला त्यांना विचारले आपल्याला औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील व जळगाव जिल्ह्याच्या किना-यावर असणारा अंतोरी हा किल्ला पहायला जायचे आहे. रोहितदादाने लगेच जाऊ म्हणून होकार दिला. शनिवार दि २९/२/२०२० रोजी रात्री नऊ वाजता मी भोसरीहून खेडला गेलो, तेथून रोहीत बोरूडे यांना घेतले अन पाबळ मार्गे शिरूर, नगर, औरंगाबाद असे मार्गक्रमण करीत पहाटे तीन वाजता वेरूळला पोहचलो. तेथील वृंदावन रिसोर्ट मधे एक रूम घेतली, दोन तास मस्त आराम केला. सकाळी  प्रातःविधी उरकून आम्ही कन्नडच्या गौताळा अभयारण्याच्या दिशेने निघालो...

क्षितिजा राऊळी प्रकट दिसु लागे निलउषा!
करी जागे झोपी असती तया दावि सूरउषा!

क्षितिजावरून सुर्याचे लालबुंद बिंब हळुहळु वर सरकु लागले होते. जंगलातील सकाळ हलकेच हिरव्या रंगातून सोनेरी रंगाला परिधान करतानाचे हे नयन रम्य दृश्य दिसत होते. बहारदार निसर्ग मनाला आल्हाददायक अनुभूती देत होता. उगवत्या सूर्याच्या स्वागताची गाणी गात पक्ष्यांचे मधुर संगीत श्रवणी पडत होते. गौताळा अभयारण्यातील ती सकाळ खरच मनाला एक वेगळीच अनुभूती देत होती.
गौताळा अभयारण्यात जायचे हा विचार पण आमच्या मनात नव्हता हे क्षेत्र बोनस मधे आम्हाला मिळाले होते. मग आम्ही गौताळा अभयारण्याचा पण आनंद घ्यायचा ठरवला. वाटेत जाताना इतिहासकालीन एक वास्तू दृष्टीस पडली आम्ही आवर्जून थांबलो मंदीराच्या आकाराचे दगडात बांधकाम केलेली ही वास्तू  सीतामाईची न्हानी म्हणून प्रचलित आहे. तिथे सध्या वानरांचे वास्तव्य आहे. ती वास्तू पाहून आम्ही नागद फाट्यावर पोहचलो तिथे मॅप बाबाने अंतुर किल्ल्यावर जाण्यासाठी आम्हाला डावीकडे वळायला सांगितले आम्ही कोणताच विचार न करता घाट उतरून नागोदला पोहचलो. नास्ता केला नव्हता त्यामुळे कडाक्याची भुक लागली होती वीस किलोमीटरचे अंतर कापून आम्ही नागोदला पोहचलो तिथे हाॅटेल दिसले तिथे थांबलो. मस्त गरमागरम भजी घेतली चहा घेतला तो पर्यंत रोहीतदादा हाॅटेल वाल्याला किल्याची माहिती विचारू लागले अंतुरी किल्ला म्हणताच हाॅटेलवाल्याच्या चेह-यावर वेगळाच भाव दिसला हाॅटेलवाल्याने विचारले कुठून आलात? मग रोहीतदादाने रूट सांगितला, हाॅटेलवाला म्हणाला इकडून गेलात तर   बेलखेडा- गोपेवाडी- दस्तापूरला जाऊन गाडी तेथेच लावून तुम्हाला पायी किल्ला २७०० मीटर चढावा लागेल अडीच तासांचा पायी प्रवास अन आता तर उन वाढले आहे तुम्ही एक करा पुन्हा आले त्या मार्गाने जा. तेथून तुम्हाला डायरेक्ट किल्यावर पोहचता येईल. नास्ता उरकला अन हाॅटेलवाल्याकडून सुर्यफुलाच्या भाजलेल्या बिया घेतल्या त्या बियांच्या आतील मगज खायला खुप चविष्ट आणि शरीराला पोषक असतो. गाडी पुन्हा मागे घेतली अन सुर्यफुलाच्या बिया खात खात आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला. घाट चढत असतानाच एक भेकर गाडी समोरून गेलं बहुदा ते चुकलेलं असावं खूप भेदरलेलं वाट फुटेल तिकडे धावत होते. आम्ही मनोमन आनंदी झालो अभयारण्यात आलो आणि एका तरी प्राण्याचे दर्शन झाले अन सहजच चारोळी सुचली...

नको सैरवैर होऊ नको तू भिऊ
थकलेल्या रानातल्या रानजीवा
मानवी वस्तीतून वाचलास खरा
पण आता पोहचशील आपल्या घरा.

आता घाटचा रस्ता संपून आम्ही नागापूरच्या रस्त्याने पुढे जावू लागलो अगोदरच उशीर झाला होता अजून बराच दूरचा प्रवास करायचा होता दहा बारा किलोमीटर पुढे आलो असेल तेव्हा आम्हाला सीताखोरी कडे असा बोर्ड दिसला अन आपोआप ब्रेक दाबला गेला, चला एक शेवटचा पाॅईन्ट पाहूयात म्हणून दोघेही गाडी खाली उतरलो अन सीताखोरी च्या दिशेने चालू लागलो. थोडे अंतरावर चालून गेलो तर भली मोठी दरी दिसली तिला पाहून तर डोळे गरगर फिरू लागले. त्या दरीच्या एका कडेला सशा सारखे कान असलेल्या आकाराची एक सरळ कातळ पाहून आश्चर्य वाटले, इतके वर्ष होऊनही ही कातळ सरळ उभी कशी काय? हा मनात प्रश्न पडला. कारण तिला अनेक ठिकाणी भगदाड पडलेली होते अनेक तडे, चिरा पडल्या होत्या, तरी ती कातळ प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होती. खरच निसर्गाचे हे चमत्कारीक रूप डोळ्यात साठवून पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो आलो. आता अभयारण्याचा भाग संपून शेतीपट्टा सुरू झाला होता. उन्हाळ्यात हिरवीगार शेती पाहून मनाला गारवा मिळत होता. मका गहू अशा अनेक पिकांनी शेती बहरली होती ती पहात पहात नागापूरला पोहचलो एक अरूंद कच्चा रस्ता अन तेथून पुढे सहा किलोमीटरवर अंतुरी किल्ला होता. अतिशय खडकाळ रस्ता त्यात आमच्या कडे नाजूक फोरव्हिलर ती म्हणजे होंडा अमेझ, बिचा-याच्या चाशीवर अनेक दगडधोंडे आदळत होते कधी कधी इंजिनला पण घासत होते. वेग मंदावला होता. दहा वीस च्या स्पीडने गाडी सुरू होती. एका शेताजवळ बटाट्याच्या आकाराचे पीक काढताना काही माणसं दिसली कारण दूरून बटाटा तर दिसत नव्हता. परंतू काय आहे पहावे म्हणून जवळ जावून पाहिले तर आठ दहा एकरात आल्याचे पीक काढण्याचे काम सुरू होते. आयुष्यात पहिल्यांदाच आल्याचे पीक काढताना पहात होतो. तेथील शेतक-याला थोडी आल्या विषयी माहिती विचारली व कधी लागवड केली होती हे पण विचारले?, त्यांनी सांगितले मागच्या जून मधे लागवड केली होती. आता फेब्रुवारी सुरू आहे तब्बल नऊ महिन्यानंतर हे पीक काढायला आले होते. संपूर्ण गौताळा परिसरात आल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ते पीक काढल्यावर गुजरात, राजस्थान, मुंबई, पुण्याला विक्रीसाठी जाते. असे शेतकरी सांगत असतानाच त्यांने दोन्ही हातात मावतील इतके आले माझ्या हातावर ठेवले, इतका अमुल्य वानवळा मिळाला होता. शेतक-याचे आभार मानले अन पुढे निघालो. कच्चा रस्ता पुढे जास्तच खराब होता. दूर पर्यंत एकही माणूस दिसत नव्हता. पुढे गेल्यावर एक छोटे तळे व ओपन चौथा-यावर हनुमंतरायाचे मंदिर होते ते पाहून किल्ला दिसतो का हे बारीक न्याहाळू लागलो पण किल्याचा काही माघमूसही दिसेना, पुढे चलण्याशिवाय पर्याय नव्हता माळरान जाऊन जंगल सुरू झाले होते अन या विराण आणि वन्यजीव असणा-या जंगलात फक्त हम दो शेर होतो.
इतका रोड खराब असूनही गाडी कशी तरी किल्या पर्यंत घेऊन आलो होतो. कारण जंगलात व किल्याच्या आजूबाजूला जंगली प्राणी व पाखरांच्या शिवाय कोणीच नव्हते काहीतरी संरक्षण असावे म्हणून गाडी किल्यापर्य॔त घेऊन आलो होतो. भोसरी पासून हा किल्ला ३१७ किलोमीटरवर होता, औरंगाबाद पासून ९० किलोमीटरवर व कन्नड पासून ३० किलोमीटर होता.
किल्याजवळ आलो खरा पण रस्ता सापडेना मग मी अन रोहीत बोरूडे किल्याच्या मोठ्या बुरूंजा कडून निघालो पुढे आलो तर किल्याच्या आणि जमिनीच्या मधे कातळ खोदून खुप मोठा खंदक खोदला होता. इथून उतरून जायचे का? हा प्रश्न मनात आला अन काळजाची धडधड वाढली. अशातच रोहितदादा हळूहळू त्या खंदकात उतरायला लागले. पण त्यांना पण जमेना निम्या पर्यंत गेलेले पुन्हा वरती पण येता येईना त्यांचे हे हाल पाहून माझे धाडस होईना मी बराच वेळ तसाच उभा राहिलो. तोपर्यंत रोहितदादा पूर्ण खंदकात उतरले पण पुर्ण घामाघूम झाले होते पुढे काय त्यांना पण प्रश्न पडला होता. ते खूप वेळ मला आवाज देत होते पण मला त्यांचा आवाज ऐकू येईना त्यामुळे रोहितदादा खुपच घाबरले होते. मी पण उंचावर एकटाच राहिलो होतो काही करावे सुचेना. तेवढ्यात रोहित दादांचा आवाज आला सर खुपच सोपा रस्ता दिसतो आहे तुम्ही तिकडून या; फक्त जरा चालावे लागेल. मी हो म्हणालो. जिथे गाडी लावली होती तिथे मी एकटाच परत आलो. अन रस्त्याची शोधा शोध केली, पहातो तर काय एक दगडी रस्ता सरळ किल्याच्या मुख्य दरवाजाकडे जात होता. मग मी त्या रस्त्याने निघालो, आजूबाजूला घनदाट जंगल, पाणगळी मुळे दूरचे पण सहज दिसत होते. बहिरी ससाण्याच्या ऐवजी आकाशात व झाडांझुडूपांच्यावर चिट पाखरू पण दिसेना. भयान शांतता त्यामुळे नको त्या विचांराची गर्दी मनात दाटू लागली. दगडी रस्त्यावर झाडांची पाणगळ झाल्याने पूर्ण रस्ता पानांनी झाकोळून  गेला होता. मधेच कुठून तरी सळसळ ऐकू यायची, पाणगळीतल्या त्या सळसळीने तर छातीत धस्स होत होते, आपोआप हदयाचे ठोके वाढत होते.
तोपर्यंत रोहितदादा संपूर्ण खंदक उतरून माझ्याच रस्त्याला येवून थांबले होते ते सुद्धा खुप घाबरलेले दिसत होते ते मला म्हणाले मी खुप वेळा तुम्हाला आवाज दिला पण तुमच्या पर्यंत आवाज पोहचतच नव्हता. दोघांची पण एकत्र भेट झाल्याने एकमेकांना धीर आला होता. समोरच कपारीच्या अगदी कडेला अंतुरी किल्याचा दक्षिणमुखी महादरवाजा दिसत होता. अजूनही  सुस्थितीत होता अलिकडेच त्याला भव्य असा लाकडी दरवाजा बसविण्यात आल्याने मुख्य दरवाचा अतिशय सुंदर दिसत होता. बाहेरच पहारेक-यांच्या उभे रहाण्याच्या ठिकाणावर शरभशिल्प दिसत होते. छोट्या दरवाजातून आम्ही किल्यात शिरलो. दोन्ही बाजूला उंच तटबंदी होती. तट व दरवाज्यावर जाण्यासाठी पाय-या बांधल्या होत्या.  पुढे पहिल्या दरवाज्याच्या नव्वद अंशाच्या कोनातच दुसरा मुख्य पुर्वाभिमुख दरवाजा होता. दरवाजाच्या वरील दोन्ही बाजूंचे बुरूंज चौकोनी आकारात बांधलेले होते. दरवाजाच्या आतील बाजूस घुमट व कमानी दिसत होत्या त्यावर कोरीव शिल्प व कमळपुष्प कोरलेली होती. जणू काही गडाची मुख्य कचेरी असावी. पुढे आम्ही तिस-या दक्षिणमुखी दरवाज्या जवळ पोहचलो त्या भल्या मोठ्या दरवाजाच्या कमानीवर निजामशाह यांच्या काळातील मलिक अंबर यांचा या किल्याच्या बांधकामाविषयी पार्शियन भाषेत शिलालेख होता. तिसरा दरवाजा पार करून आम्ही किल्यावर पोहचलो हा किल्ला  समुद्र सपाटी पासून २७५७ फूट उंचीवर असून ३२ एकरात हा किल्ला पसरला आहे. बत्तीस एकराच्या चोहोबाजुंनी तटबंदीने हा किल्ला वेढलेला आहे. चोहोबाजुंनी खोल द-या आणि मधोमध हा किल्ला अंडाकृती आहे. १७ व्या शतकातील हा किल्ला यादवकाळात बांधला होता. अनेक साम्राज्य या किल्यावर राज्य करून गेली होती. अल्लाद्दीन खिलजी व मराठ्यांच्या मधे घनघोर असे युद्ध याच किल्यावर झालेले आहे. फोटो काढीत काढीत आम्ही किल्यावरील तलावा जवळ येवून पोहचलो, हिरव्या पाण्याने तुडूंब भरलेल्या तलावात असंख्य जलपर्णी दिसत होत्या. तलावाच्या उजव्या बाजूला मज्जिद तर डाव्या बाजूला अतिशय सुंदर राजवाड्याचे अवशेष दिसत होते. लोहचुंबकाने लोखंडाला खेचावे तसे मला या अंतूर किल्याने खिळवून ठेवले होते. मला हा तलाव व तेथील बाजूचे बांधकाम पाहून चिखलद-यातील गवळी राजाने बांधलेल्या गाविलगडाची आठवण झाली होती. गडावरील अंबरखाना, धान्यकोठारे, शस्त्रागार अनेक मोठ्या इमारती पाहून मी आणि रोहित दादा मोठ्या टेहळणी बुरूंजा कडे निघालो. इतका मोठा किल्ला पण आमच्या दोघांच्या शिवाय या किल्यावर तिसरे कोणीच नव्हते, अन जरी असले तरी लपून बसलेले जंगली जनावरं असणार असे मनोमनी वाटत होते. तीन कमांनीच्या दरवाजातून टेहळणी बुरूंजाच्या आवारात एक पिराचा दर्गाह होता. मी त्या दर्ग्यात जावून दर्शन घेतले बाहेर आलो तितक्यात एक विचित्र आवाज तिथे येवू लागला बिबट्याच्या लहान पिलांचा हा आवाज असावा किंवा एखादया पक्ष्यांचा आवाज असावा असा तर्क आम्ही दोघांनी पण लावला. खुप वेळच्या आवाजाने आमची मात्र पाचावर धारण बसली होती. क्षणभरातच आम्ही तो बुरूंज सोडला, आता अशी मनात भीती बसली की कधी किल्यातून बाहेर पडतो असे झाले होते. मी आणि रोहितदादा एकमेकांना धीर देत होतो काहीच झाले नाही अशा आविर्भावात होतो. पण दोघांची मनातली अवस्था खुप भितीदायक बनली होती. किल्याच्या पश्चिम बाजूस काही लेण्या दिसल्या तिथे जाण्याचे पण धाडस होईना. पाऊलांची गती वाढलेली होती. एका टेकडावरील धान्याच्या अंधा-या कोठारात डोकावले तर तिथे पण वेगळाच आवाज ऐकू आला, आता मात्र धीर सुटत चालला होता. पण किल्यावर इतक्या सुंदर वास्तू होत्या त्या पाहिल्या शिवाय पाऊल पुढे सरकेना. वास्तू जरी सुंदर होती तरी किल्यावर येणा-या महाभागांनी पत्रावळ्या, दारूच्या बाटल्या, बिसलरी बाटल्यांनी अन प्लॅस्टिकच्या इतर वस्तूंचा जागोजागी खच पडलेला दिसत होता. प्रत्येक ऐतिहासिक वास्तूच्या दगडांच्यावर फलताड प्रेमींनी नाव कोरून वास्तूला दुषीत केलेले दिसत होते. महाराष्ट्राचे गड किल्ले हे तिर्थक्षेत्रापेक्षाही श्रेष्ठ आहेत हे जरी प्रत्येकाला समजले तरी त्याचे पावित्र्य राखले जाईल अन्यथा अशाच या ऐतिहासिक वास्तू नष्ट होतील यात शंकाच नाही. आपल्या या वैभवशाली महाराष्ट्राच्या गड किल्यांचे, पवित्र पावन स्थळांचे रक्षण करण्याचे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. आज अनेक आक्रमण निमूटपणे सहन करतो, शरीर पोलादा सारखे बनवू शकतो, कोणताही ऋतू यांच्यावर कसलाच परिणाम करीत नाही, वेदनेचे नाव ही उरत नाही तो योगी त्याच प्रमाणे हा अंतुर किल्ला मला एखाद्या योगी सारखा वाटला..

या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची,
दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची,
पहाड़ डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची,
जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदा शिरी,
रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी!

कुसुमाग्रजांच्या या काव्यपंक्तीना आठवतच अंतुर किल्ल्याचे दर्शन घेतले अन जड अंतःकरणाने निरोप दिला. तशी या किल्याची फारशी माहिती उपलब्ध नाही, किंवा येथे कुठल्याही प्रकारचे गाईड किंवा मार्गदर्शिका नसल्यामुळे किल्याची माहिती नसूनही चुकीचा विषय मांडणे मनाला पटत नाही. जितकी माहिती मला मिळाली मी स्वतः पाहिली तीच माहिती मी या लेखात नमूद केलेली आहे. माझी महाराष्ट्रातील तमाम गड किल्ले प्रेमींना विनंती आहे एकदा तरी या अंतुर किल्ल्याला नक्कीच भेट दया ...

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...