Tuesday, 23 February 2021

धवल हिमाचल

 माझी सहल "हिमाचल"

संदीप राक्षे✍🏻


हिमाचल म्हणजे बर्फाळ प्रदेशाचे राज्य, शिवशंकरांची सासुरवाडी अशी ही देवभुमी, अशा या धवल निसर्ग यात्रेसाठी आम्ही पंचकुला, पिंजौर, कालका, जबली ही गाव मागे टाकीत पंजाबची सीमारेषा संपून हिमाचल प्रदेशच्या हद्दीत प्रवेश केला. हिमाचल प्रदेश सुरू झाला, हे कळले आम्हाला डोंगराच्या कडेला एकावर एक घरांचा थर पाहिल्यावर, कधी एकावर एक घरांचा थर तर कधी पाईन्स या झाडांचे जंगल असा प्रवास करीत आम्ही हिमाचल मधील सोलन या शहरात पोहचलो. फ्रेश होण्यासाठी व पाय मोकळे करण्यासाठी सोलन शहराच्या अलिकडेच थांबलो. तिथे काही स्थानिक व्यक्ती उभ्या होत्या, त्यांच्या कडून काही माहिती मिळेल जेणेकरून पुढचा प्रवास सुखकर होईल.. आम्ही सर्वजण फ्रेश झालो, इन्होव्हा गाडीत बसून बसून जड झालेले पाय मोकळे केले. त्या व्यक्तींच्या जवळ गेलो नमस्कार घातला. ते जरा आश्चर्य चकित झाले, त्यांनी पटकन ओळखले, महाराष्ट्र से हो ? आम्ही हो म्हणालो ते कुतूहलाने इकडे तिकडे पाहू लागले. हे चौघेच लक्झरी बस तर कुठे दिसेना मग आम्हीच सांगितले आम्ही आमचीच गाडी घेऊन आलो आहोत.. ते हैराण झाले कस शक्य आहे इतक्या दूरवरून तुम्ही गाडी घेऊन आलात त्यातला एकजण बोलला? मान गये उस्ताद, बराच वेळ गप्पा झाल्यावर कळले की हे दोघेही फाॅरेस्ट अधिकारी आहेत. त्यातल्या एकाने नाव सांगितले "मै प्रेम कुंअर हूँ" मग ते सांगू लागले, तुम्ही डिसेंबर जानेवारी या महिन्यात हिमाचलला यायला हव होतं, आता बर्फ कमी झाला आहे. कुलू मनाली मै हनिमून के लिए आनेवालोंकी भीड ज्यादा बड गयी है. तुम्हाला जर निवांत व गर्दी नसलेल्या ठिकाणी जायचे असेल तर आम्ही सांगतो, तुम्ही चायल या ठिकाणी जा, तेथून तुम्हाला सिमला जवळ पडेल, जास्त त्रास होणार नाही. त्या दोन अधिका-यांनी जो मार्ग दिला, तोच मार्ग आम्ही सर्वांनी स्विकारला व त्याच मार्गाने आम्ही निघालो. निसर्गाचे अद्वितीय रूप पहायला मिळाले ते सोलन शहरा कडून चायल इथे जात असताना. संपूर्ण चार दिवसांचा थकवा निसर्गाचे हे अद्भुत रूप पाहताना कुठल्या कुठे पळून गेला होता. दूरवर जाणारा घाट, नागमोडी वळणं, गुलाबी थंडी व आजूबाजूला पडलेला बर्फ, आयुष्यात पहिल्यांदाच साक्षात बर्फाळ प्रदेशात आलो होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ मोठ्या दगडाच्या आकाराचे बर्फ दिसत होते. गाडी थांबवून त्या बर्फाच्यावरून हात फिरवीत होतो, डोळे भरून हा निसर्गाचा चमत्कार पहात होतो. दुपारची दोनची वेळ होती तरी सकाळचे आठ वाजले असे वातावरण होते, सूर्य होता पण त्याच्या उन्हाची ताप नव्हती. ऊन असूनही बर्फ विरघळत नव्हता हे विशेष होते. जर कधी पाऊस पडला तरच हा बर्फ विरघळून जातो. म्हणजे लोहा लोहे को काटता है, ही म्हण तिथे खरी झाली. आमच्या जवळच्या बिसलरीचे पाणी त्या बर्फावर ओतून पाहिले तर खरच पूर्ण बर्फ विरघळून गेला होता. वाटेने प्रवास करताना अनेक ठिकाणी थांबून या निसर्गरम्य परिसराचे हे सुवर्णस्वरूप डोळ्यात साठवत होतो. कुठेही जरासाही सपाट भाग दिसेना जिकडे तिकडे अफाट पर्वत रांगा व त्यावर पांघरलेला बर्फ, बर्फावर सुर्याची किरणं पडली की सोन्या सारख चमकणारे रूप मंदिराच्या कळसा प्रमाणे वाटत होते. अनेक पर्वत रांगा पार करीत आम्ही साधूपूल येथे पोहचलो, साधूपूल हे हिमाचल मधील आसन नदीवरील पुलाचे नाव व याच नावाने नदीच्या किनारी हे गाव वसलेलं. गाडीतून वरती पाहिले तर असंख्य पर्वत शेषनागा प्रमाणे फणा काढून उभे असलेले, घोंगवणारा वारा जणू काही शेषनागा प्रमाणे हे पर्वत फुत्सकारात आहेत. गाडीतून उतरलो नदीकाठावर पोहचलो, पाण्यात हात भिजवला संपूर्ण हात बधीर झाला होता, इतके थंड पाणी की अजून टेंपरेचर कमी झाले तर ही नदीचं गोठून जाईल. पुन्हा पाण्यात हात घालण्याचे धाडस होईना. नदीचा रोमहर्षक परिसर पाहून आम्ही गाडीत बसलो, आता आम्हाला साडेतीन हजार फुट उंच चायल या शहराकडे जायचे होते. जाताना पर्वत रांगांच्या कुशीत अनेक महात्मे आपआपल्या मंदिरात ध्यानस्त बसलेली दिसत होती. इतकी शांती की टाचणी पडली तरी सहज आवाज येईल. कदाचित वादळापूर्वीची ही शांतता असेल. असाच प्रवास करताना दूर पर्वतावर असणारे सुंदर मंदिर आम्हाला खुणावत होते. आम्ही सर्वांनी ते पहाण्याचा निश्चय केला. त्या मंदिराकडे जाणार रस्ता शोधला..पर्वताच्या कपारीतून हा गाडी रस्ता बनविला होता. छाती धडधड करीत होती. आजूबाजूला खोल खोल दरी आणि त्यामधून आमची गाडी चाललेली सात आठ किलोमीटरचा प्रवास करून आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारात पोहचलो, बाॅर्डरवर जशी सुरक्षा असते तशी सुरक्षा या मंदिराच्या आजूबाजूला होती. आम्हाला जरा नवल वाटले. सुरक्षा रक्षकाने आम्हाला आधार कार्ड विचारले ते सर्वांनी दाखवले, वहीत त्याने नोंद केली, आमची तपासणी करून आम्हाला मंदिरात प्रवेश दिला. लाखो रू खर्च करून या मंदिराची उभारणी स्वामी अमरदेवजी महाराज यांनी केली आहे.   या मंदिरात राधा कृष्ण, राम सीता, शंकर पार्वती, गणपती, पंचमुखी हनुमान, अकरा मुखी हनुमान तसेच नवग्रहांच्या भव्य मुर्तींची स्थापना केलेली. पंचतारांकित असे मंदिर पाहून परमानंद झाला. आम्ही सुरक्षा रक्षकाकडे स्वामीजींना भेटण्याची इच्छा प्रकट केली. तर त्या रक्षकाने सांगितले स्वामीजी आपल्या कुटीमधे गेली महिनाभर साधना अवस्थेत आहेत. ते कोणालाही भेटत नाहीत. बोलत नाहीत, काही खात पण नाहीत. दूरूनच आम्ही त्या कुटीचे मनोभावे दर्शन घेतले. आजूबाजूला कसलीच लोकवस्ती नाही तरी हे भव्य मंदिर, ते महात्मे करीत असलेली निर्गुण साधना, उपासना वातावरणात चैतन्य निर्माण करीत होती. तसेच त्या मंदिरातील प्रत्येक मुर्तीच्या चेहर्‍यावरील सात्विक छटा पाहून सर्व इंद्रिये अंतर्मुख होऊन, चित्त स्थिर होऊन अंतरंगातील भक्तिरस वाढीस लागला होता. नुसत्या निर्जिव मुर्त्यांच्या सहवासाने अमृतापेक्षाही गोड असा अमृतरस चाखावयास मिळाला होता. खरच हिमाचल ही देवभूमी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले होते. आता चायल गावाशिवाय कुठेही थांबायचे नाही असे ठरले कारण प्रत्येक अंतरावर काही ना काही भव्य दिव्य असे दिसत होते टाईमपास होत होता, अन वेळ सहज पुढे जात होती. सायंकाळचे पाच कधी वाजले हे कळले पण नाही. पस्तीस किलोमीटरचे अंतर पार करून आम्ही चायल गावच्या पायथ्याशी पोहचलो होतो. रात्रीचे आठ वाजले होते. गडद अंधार, नागमोडी वाट आजूबाजूला चीट पाखरू पण नाही असा प्रवास सुरू होता. मस्त जुन्या गाण्यांचे फोल्डर सुरू झाले होते. घाट सुरू झाला होता. पहिल्या गियर शिवाय गाडी पण पुढे धावत नव्हती. अचानक गाडीच्या हेडलाईटचा कलर निळसर झाला. आमचे सर्वांचे लक्ष त्या निळसर लाईटकडे आकर्षित झाले. गाडी साईटला घेतली, गाडीची लाईट तशीच सुरू ठेवली. कारण हे चमत्कारापेक्षा कमी नव्हते, समोरचे दृश्य पाहून आम्ही सर्वजण थक्कच झालो होतो. एका विशिष्ट वळणावर, एका विशिष्ट रेषेत गाडीचा प्रकाश बर्फाच्छादित पहाडीवर पडला होता, पहाडीच्या वरती आकाश निळेशार दिसत होते, लाईटचा व आकाशातील निळ्या प्रकाशाचा संगम होऊन तो निळा प्रकाश पूर्ण बर्फावर पसरला होता. त्यामुळे संपूर्ण बर्फाच्छादित पहाडी निळीशार झाली होती. मनसोक्त फोटो काढले, हे विहंगम दृष्य पाहिल्यावर कवी ग्रेस यांची निळाई ही कविता सहजच आठवली..


असे रंग आणि ढगांच्या किनारी

निळे ऊन लागे मला साजणी!

निळे घाटमाथे निळ्या राउळांचे

निळाईत माझी भिजे पापणी!


चायल हे हिमाचल प्रदेशातील एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. सोलन जिल्ह्य़ातील हे गाव सोलन पासून ४५ किलोमीटर अंतरावर आहे. इथे काली टिब्बा, क्रिकेट मैदान व पोलो मैदान प्रसिद्ध आहे. समुद्र सपाटीपासून हे गाव तीन हजार पाचशे फूट उंचीवर आहे. रात्री आम्ही चायल मुक्काम केला. सकाळीच उरकून आम्ही काली का टिब्बा हे मंदिर पहाण्यासाठी निघालो हे मंदिर चायल गावापासून १३०० फूट उंचीवर आहे. नागमोडी रस्ताने मार्ग काढीत आम्ही मंदिरात पोहचलो, काली माता या मंदिरात पिंडीच्या स्वरूपात स्थित आहे. इथे विविध धातूंच्या पाच पिंडी आहेत. अतिशय सुबक आकाराचे हे मंदिर, मंदिराच्या बाहेरील बाजूला एक धुनी अनेक वर्षांपासून पेटलेली आहे ती कधीच विझत नाही. उंचावरून हिमाचल प्रदेशाचा प्रत्येक जिल्हा चोहोबाजूंनी दिसत आहे. जिकडे पहावे तिकडे पर्वतच पर्वत दिसत होते. हिमालयाच्या कुशीतील हे हिमाचल प्रदेश हिमालयाचाच एक भाग आहे. अतिशय सुंदर निसर्गरम्य रूप, असंख्य पर्वतांचे टोकदार सुळके, त्यावर असलेला बर्फ आणि पडलेला सूर्यप्रकाश सोनेरी स्वर्गाची आठवण करून देत होते. आता ओढ लागली होती ती पर्वतांची राणी शिमला शहर पहाण्याची, शिमला शहरातील पर्वतावरील बर्फाच्छादित चादर पहाण्याची. शिमल्याला जाताना अर्की गावात दुपारचे जेवण केले अन शिमल्याच्या दिशेने इन्होव्हा गाडीची चाकं धावू लागली. गाणी गुणगुणत, रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या, आभाळाला टेकणा-या देवदार वृक्षांचे जंगल पहात देवदार वृक्षांवर पडलेला बर्फाचा सडा पहात प्रवास सुरू होता. जस जसे शिमला शहर जवळ येत होते. तसे बर्फाचे साम्राज्य अधिक दिसत होते. रस्त्याच्या कडेला दगडाच्या आकाराचे बर्फाच्या तुकड्यावर आतापर्यंत समाधान मानीत आलो, पण आता पर्वत, झाड, घर, हाॅटेल पूर्ण बर्फाने झाकोळलेली पाहून मन अधिक आनंदीत होत होते. इतर वेळेस आग ओकणारे डोळे सुखावत होते. बर्फाचे पर्वत पाहून तर अक्षरशः थंड पडले होते. शिमला दहा किलोमीटर दूर होता, एका पहाडाला पूर्ण तारेचे कंपाऊंड केले होते, त्या पहाडावर बर्फ पडत होता, असे भासत होते शिवशंकराचा भस्मच पडतो आहे. जाव आणि हा भस्म भाळाला लावून पवित्र पावन व्हावं. थोडं पुढे गेल्यावर बर्फावर खेळण्याचा, चालण्याचा मोह आवरेना. आपल्या मुळे या सफेद संजीवनीला कुठेही डाग लागू नये याची खबरदारी घेऊन मनसोक्त बर्फातून हुंदडलो, झोपलो, बर्फ अंगावर घेतला, एकमेकांच्या अंगावर फेकला..


धवल निसर्गाची किमया 

पाहिली आज मी डोळा,

विसरलो देहभान, हरपलं मन,

काय वर्णू मी अद्भुत सुखसोहळा.


धवल निसर्गाचा आनंद घेत आम्ही शिमल्यात पोहचलो, हिमाचल प्रदेशच्या राजधानीचे हे शहर अतिशय गजबजलेलं होतो प्रचंड गर्दी, त्यातून पर्वतावर वसलेलं शहर एकमेकांच्या उरावर असलेली हाॅटेल, तेथील स्थानिकांची घर सुबक पणे सजवलेली होती, परंतु प्रत्येक घराला अंगण हे नव्हते, आपल्याकडे अंगण या विषयावर अनेक गाणी रचली गेली पण शिमला हे शहर अतिशय वेगळं होत. अंगणापासून वंचित होतं, कपारीच्या कडेला घर, बाहेर येवून पहायचं म्हटलं तर अंगणाच्या ऐवजी प्रचंड खोल दरी. वरून पडला की सरळ स्वर्गलोकचं. कुठेही सपाट जागा नसणार शहर पण अतिशय नियोजन बद्ध होते. अनेक सुखसोई युक्त अस हे शहर अनेक पर्यटकांचे आवडणारे शहर, नुकताच बर्फ पडून गेल्याने रस्त्याच्या दोन्ही कडेला बर्फाचा खच पडलेल्या त्याच सोबत अनेक टूव्हिलर, फोर व्हिलर कच-या सारख्या त्या बर्फाच्या विळख्यात अडकलेल्या होत्या. काही गाड्यातर दोनच दिवसांत सडून गेल्या होत्या. हे भयानक विद्रूप रूप पाहून आम्हाला पण खूप भिती वाटली कारण आम्ही पण गाडी घेऊन आलो होतो. जर कधी बर्फवृष्टी झाली अन गाडी जर अडकली तर भंगार मधे विकण्याशिवाय पर्यायच नव्हता.. आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळ पाहून शिमल्यातून आम्ही लगेचच पळ काढला. कारण पुढे पण आम्हाला ज्वालादेवीच्या दर्शनाला जायचे होते. माझ्या सोबत या धवल निसर्ग सहलीत संजय जाधव, मारूती तायनाथ, राजेश क्षीरसागर हे सहकारी होते..


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


3 comments:

  1. खूपच सुंदर लेखन

    ReplyDelete
  2. सुंदर प्रवासाचं सुंदर वर्णन

    ReplyDelete
  3. सुंदर प्रवासाचं शब्दांकन ही सुंदर

    ReplyDelete

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...