Tuesday, 23 February 2021

ज्वालादेवी..हिमाचल

 माझी सहल "हिमाचल" 

मनोकामना पूर्ण करणारी "ज्वालादेवी"

संदीप राक्षे ✍🏻


गेली कित्येक वर्ष ज्वालादेवीला जाण्याची इच्छा होती, अनेक दिवसांचे स्वप्न होते ते स्वप्न फेब्रुवारी २०२१ मधे पुर्णत्वास आले होते. सिमला ते ज्वालादेवी हे अंतर १७३ किलोमीटर होते. सलग दोन दिवसांची धरती आणि आकाशाच्या मध्यभागाची, धवल निसर्गाची सहल संपवून, आम्ही सपाट भाग असणा-या कांगडा जिल्ह्य़ात जमीनीवर पोहचलो होतो. ज्वालादेवीला जाताना रस्त्यात अर्कीचा खाजगी किल्ला आहे. तो पण  आम्ही पाहिला, शाही पाहुणे आल्याने आम्हाला तो किल्ला दूरूनच पहावा लागला. त्या किल्ल्यात बाॅलिवूडच्या अनेक चित्रपटांची शूटिंग झाली आहे असे तेथील सुरक्षा रक्षकाने सांगितले. बाहेरूनच त्या किल्याचा आनंद घेऊन आम्ही ज्वाला देवीचा रस्ता धरला. ज्वालादेवीची आख्यायिका खूप वर्षांच्यापासून माझ्या मनावर कोरलेली होती. प्रवास करताना आणि आज साक्षात मातेच्या दर्शनाला जाताना ती कथा मन पटलावर पुन्हा आठवू लागली. गाडीचे सारथ्य संजय जाधव हे करीत असल्याने निसर्गाचा आनंद घेत या कथेचा उलगडा करीतच प्रवास आनंदात सुरू होता. शिवपुराणात कथेनुसार माता सतीचे पिता दक्ष यांनी महायज्ञाचे आयोजन केले होते. त्या महायज्ञाला देव देवता ऋषीं मुनींना आमंत्रित करण्यात आले होते. फक्त भगवान शंकरांना निमंत्रण दिले नव्हते, त्यामुळे माता सती म्हणजे पार्वती देवींना राग आला होता. कारण विचारण्यासाठी त्या रागानेच आपल्या पित्याकडे आल्या, भगवान भोलेनाथांनी पार्वतीमातेला न जाण्यासाठी बरीच विनवणी केली तरी सती मातेने त्यांचेही ऐकले नाही. पित्याला जाब विचारीत असतानाच पित्याकडूनच सती मातेला अपमानित व्हावं लागलं, मातेला खूप राग आला आणि त्यांनी यज्ञातच उडी मारून आपले प्राण दिले, यज्ञात भस्म होताच त्यातून एक ज्योतीपूंज तयार झाले व ते ज्योतीपूंज आकाशात जात असताना कसेटी पर्वतावर ते ज्योतीपूंज पडले, तेव्हापासून कांगडा जिल्हय़ातील कसेटी गावातील पर्वतावर ती ज्योती अजूनही तेवत आहे. कालांतराने या दिव्यत्वाचे ज्वालादेवी असे नामकरण झाले तसेच एक्कावन्न शक्तीपीठांच्यात ज्वालादेवी शक्तीपीठ म्हणून गणले जाऊ लागले. ही मनात चालणारी कथा संपली ती ढाब्यावर गाडी थांबल्यावर कारण पेटपूजा ही महत्वाची होती. गाडीतही भक्ती गीतांचे फोल्डर सुरू असल्याने वातावरणही भक्तिमय झाले होते. जेवण उरकले, पुन्हा प्रवास सुरू झाला मध्यरात्री दिडच्या सुमारास आम्ही. कसेटी गावात पोहचलो, मारूती तायनाथ यांनी फोनवरूनच एक धर्मशाळा मुक्कामासाठी बुकिंग करून ठेवली होती. पडल्या पडल्या शांत झोप लागली. पहाटेच उठलो साक्षात ज्योतावाली मातेच्या दरबारात पोहचल्याचा आनंद होताच. प्रात:विधी उरकला, मस्त ताजेतवाने होऊन मंदिराचा रस्ता धरला. मनातल्या मनात मला येत असलेले कनकधारा स्त्रोत्र सुरू होते...


अंगम हरे पुलकभूषणमाश्रयंन्ती! 

भृंगांगनेव मुकुलाभरणं तमालमं!

अंगीकृताखिलविभूतिरपांगलीला!

मांगल्यदास्तु मम मंगलदेवताया!


कोणत्याही शक्तीपीठा जवळ गेलो की हे कनकधारा स्त्रोत्र आवर्जून आठवते, पहिले हे स्त्रोत्र पाठ होते, आता यातील काही ओळीच आठवतात मग त्याच मनातल्या मनात गुणगुणतो. धर्मशाळावाल्याने देवीला जाणारा मधला मार्ग सांगितला होता. त्याच पायवाटेने मी संजय जाधव, मारूती तायनाथ, राजेश क्षीरसागर चालत होतो. पर्वताच्या पायथ्याशी हे मंदिर असल्याने थोडे चालावे लागले, मनात आनंदाला उधाण आले होते, जे स्वप्नी दिसत होते, ते आज डोळे भरून साक्षात पहाणार होतो. ज्वालादेवीच्या मंदिराच्या पाय-या सुरू झाल्या अन कंठ दाटून आला. भक्ती आणि भाव जिथे उत्पन्न होतो तिथे आपोआपच कंठ दाटून येतो. डोळ्यात आनंदाश्रूनी दाटी केली होती. क्षणाचाही विलंब न करता देवीच्या दर्शनाच्या रांगेत उभे राहीलो. हात जोडलेले, डोळे मिटलेले ज्वालादेवीच्या तेजोमय रूपात लीन होऊन गेलो. एक एक माणूस पुढे सरकत होता, तस तसे माझ्या डोळ्यांची पापणी ताणली जात होती. कारण ज्वालादेवीचे ज्योतीपुंज डोळ्यात साठवून हदयात बंदिस्त करायचे होते. कोरोनाचे संकट असल्याने दूरवरूनच माता ज्वालादेवीचे दर्शन झाले. युगेनयुगे तेजाळत असलेले हे दिव्यस्वरूप पहाताना पूर्ण लीन झालो होतो. अखंड तेजाळत असलेल्या दिव्यस्वरूप सती मातेचे मनभरून दर्शन घेतले. मंदिराच्या बाहेर आलो, कळसाचे दर्शन घेतले.. आजवर मुर्ती स्वरूपात असणा-या देवी देवतांचे दर्शन घेत होतो आज ख-या अर्थाने दिव्यस्वरूप व अद्भुतेचे दर्शन झाले होते. ज्वालादेवीचे दर्शन घेऊन गोरक्षनाथ मंदिराचे दर्शन घेतले तिथे पण असाच एक चमत्कार आहे, एक खोल खड्डा आहे त्या खड्याच्या वरती एक ज्वाला आहे ती पण सतत पेटलेली असते. त्या खड्यातील पाणी सतत उकळत असते. अशा दैवी शक्तीचे दर्शन घेऊन खाली आलो. ज्वालादेवीच्या मंदिराच्या बाजूला बादशाह अकबराने अर्पण केलेले सोन्याचे छत्र एका पेटीत ठेवलेले दिसते. त्याविषयी जरा कुतुहल होते कारण त्यावेळेसच्या मुस्लीम आक्रमकांनी भारतातील मंदिर संपूर्ण उध्वस्त केलेली आज आपल्याला संपूर्ण भारतात पहावयास मिळतात.. अशाच प्रकारे या मंदिरावर पण बादशाह अकबराने अतिक्रमण केले होते या दिव्य ज्योतीला विझविण्याचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केला. कधी संपूर्ण नदीच या ज्योतीच्या बाजूने फिरवली परंतु ही ज्वाला विझली नाही. सैनिकांच्या व्दारे तिला गाडण्याचा प्रयत्न केला तरी ती विझली नाही.. नानाप्रकारे प्रयत्न करूनही ज्वालामाता विझली नाही. तेथील मधमाशांनी मोगली सैन्यावर हल्ला चढवून सैन्याला नामोहराम केले. अखेर अकबर बादशाह ज्वालादेवीला शरण आला व त्याने हे सोन्याचे छत्र देवीला अर्पण केले. अशा अनेक कहाण्या या ज्वालादेवीशी निगडित आहेत. विज्ञानच काय पण पुर्वीच्या काळातील महासत्तेला सुद्धा गुडघे टेकायला लावणारी माता "ज्वालादेवी".. खरतर माझे खूप दिवसांचे स्वप्न पूर्ण झाले होते. ज्वालादेवीला समस्त जनांच्या कल्याणाचे दान मागितले, पुन्हा एकदा कळसाचे दर्शन घेतले, योग आलातर पुन्हा दर्शनास येईल अशी इच्छा प्रकट केली अन जड अंतःकरणाने मंदिराच्या पाय-या उतरू लागलो..


जगी तुझ्या लेकराला तुच सुखी ठेव!

जगी तुझा महिमा तुझी किर्ती मोठी! 

दु:खामध्ये हाक मारीता तुच रक्षणा धाव!


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१

११/०२/२०२१


2 comments:

  1. खूपच छान लेख

    ReplyDelete
  2. खूप छान लेख सरजी :-👍😊 दत्ता खुळे जालना

    ReplyDelete

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...