Tuesday, 25 February 2020

चंद्रेश्वर मंदिर ,चांदवड

चंद्रेश्वर, रेणूकामातेच्या कृपाछायेतील, चंद्रहास राजाचे चांदवड ....

खुप वर्षापासून पुणे नाशिक धुळे तसेच मुंबई आग्रा या महामार्गावर सतत प्रवास करण्याचा योग आला परंतु नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या परिसरातील सातमाळा डोंगर रांगेशिवाय काहीच पाहिले नाही. ही पण डोंगर रांग चालत्या गाडीतूनच डोळ्यात साठवायची अन पुढे प्रवास करायचा, जाताना येताना डोंगरावर मंदिर दिसायचे पण कधीच जाणून घेण्याचा पण प्रयत्न केला नाही. बँकेला लागोपाठ तीन सुट्या मिळाल्या होत्या एक दिवस किरण सानप यांच्या शिंगवे गावी जायचे ठरवले अन दोन दिवस शरद पवार माझ्या शब्दात या स्पर्धे विषयी काम करायचे ठरवले..ठरविल्या प्रमाणे सर्व व्यवस्थित पार पडले पण तीन दिवस गेले ते कामातच गेले, असे वाटू लागले. धुळे चे काम उरकले अन मालेगावच्या पुढे आलो होतो. मनात विचार आला आज इथेच कुठे तरी नविन एखादे प्रेक्षणीय स्थळ, किंवा एखाद तीर्थक्षेत्र पाहूनच पुढे जावूयात त्यासाठी मनातल्या मनातच शोधाशोध सुरू झाली तो पर्यंत चांदवड घाटात येऊन पोहचलो, एका चहाच्या टपरीवर चहा घेतला अन त्याच टपरीवाल्याला विचारले? इथे पहाण्यासाठी कोणते धार्मिक किंवा प्रेक्षणीय स्थळ चांगले आहे का? त्याने दूरूनच बोट करून दाखवले इथून एक किलोमीटर अंतरावर गेलात की तीन ठिकाण आहेत. १} चंद्रेश्वर मंदिर, २) रेणूकामाता मंदिर, ३) इच्छापुर्ती गणपती मंदीर ...
एकटाच असल्याने निर्णय सुद्धा मनासारखे घेता येत होते. चांदवडच्या घाटात आलो, डाव्या बाजूलाच चंद्रेश्वर मंदिराचा रस्ता होता. त्यारस्ताने गाडी थेट मंदिरा पर्यंत जात होती. वेडी वाकडी वळणे घेत, गाडीला सुद्धा डोंगरावर चढताना त्रास होत होता. मंदिराच्या पायथ्याशी पोहचलो. भव्यदिव्य कमान प्रत्येकाचे स्वागत करीत होती. तेथून डोंगराच्या कडेला आलो, तेथून चांदवड गाव व तिथली घर खूपच लहान दिसत होती. चंद्रेश्वर मंदिराच्या मागच्या बाजुच्या पाय-याने चढून मंदिरात पोहचलो. गाभा-यात जाऊन महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले आणि बाहेर येऊन बसलो होतो.
तिथे एका खोलीत एक साधू महाराज बसलेले दिसले आता मलाही या मंदिरा बाबत जाणून घ्यायचे होते. थोडीशी तरी माहिती असावी म्हणून खोलीच्या दाराजवळ गेलो. नमो आदेश बाबाजी असे बोललो? बाबांजींनी काहीच न बोलता नजरेने इशारा केला की आत मधे या.

साधू संत भेटता
होई मनोमनी हर्ष
उलगडती कोडी
होई आध्यात्माचा स्पर्श...

आत गेलो बाबांजीचे दर्शन घेतले अन तिथेच बसलो. थोड्यावेळाने बाबांनी मराठीतूनच विचारले कुठून आलात? मी सांगितले भोसरी पुणे येथून आलो. काय कामानिमित्त आलो आहे ते पण सविस्तर सांगितले. आता उत्सुकता लागली होती मंदिराचा इतिहास जाणून घेण्याची, पण बाबांजीकडे पाहिल्यावर धाडसच होईना काही विचारायचे. मनकवडे असल्या सारखे बाबांनीच मंदिराची आख्यायिका  सांगण्यास सुरुवात केली.
चंद्रसेन राज्याचे साम्राज्य असणारी ही चांदवड नगरी याच चंद्रसेन राज्याने या चंद्रेश्वर मंदिराची निर्मिती केली होती. प्राचीन काळी चंद्राला गौतम ऋषींनी शाप दिला होता त्या शापाचे निवारण होण्यासाठी चंद्राने शंकराची पिंड स्थापना करून उपासना केली. या उपासनेमुळे शंकर भगवान प्रसन्न झाले व चंद्रदेव शाप मुक्त झाले. चंद्रामध्ये जी महान शीतलता आहे शांत प्रकाशमय शक्ती आहे त्यामुळेच या क्षेत्राला चंद्रेश्वर हे नाव पडले आहे. ही भूमी पूर्वीच्या काळी मोठी तपोभूमी होती. मोठ मोठया दिव्य ऋषीमुनींनी येथे वास्तव्य केले इथे तपश्चर्या केली. इ. स १६०० ते १७०० साली मोगल सम्राट औरंगजेबाच्या साम्राज्यात तोफांच्या सहाय्याने या भुमी उध्वस्त केली. येथे असलेल्या विविध देवतांची ५२ मंदिरे नष्ट करण्यात आली. या वेळी तपाला बसलेल्या सप्त ऋषींची हत्या करण्यात आली. त्यांच्या समाधी पण तुम्ही पाहून आलात मी हो म्हणालो. पुढे एक दिवस भ्रमंती करीत करीत स्वामी १०८ श्री दयानंद महाराज चांदवड या ठिकाणी आले, त्यांना या पवित्र भुमीचा दुष्टांत झाला त्यावेळी त्यांनी चंद्रेश्वरची पिंड शेणाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढली. जीर्ण असलेल्या देवालयात त्यांनी मुक्काम केला. त्याच रात्री भगवान शंकराने श्री दयानंद स्वामींना साक्षात दुष्टांत दिला. महाराज श्री दयानंद स्वामींनी या पुरातन स्थानाचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला. शंकराचे कट्टर उपासक व सिद्धयोगी असलेल्या स्वामीं दयानंद महाराजांनी काशीहून शिष्य विद्यानंदजीना बोलवुन सर्व घटना कथन केली. संस्कृतचे अध्ययन अर्धवट सोडून आलेल्या विद्यानंद महाराजांनी होकार दिला. गुरु व शिष्य दोघांनी अपार कष्ट घेऊन या भुमीला नावारूपाला आणले. स्वातंत्र पुर्व काळात प्राचीन चंद्रेश्वरावर परत कळस चढविला. प्रथम चंद्रेश्वर बाबा महाराज दयानंद स्वामींनी चंद्रेश्वराची सेवा केली. या निसर्गाच्या कुशीत बसलेल्या व रमणीय परिसराने नटलेल्या या मनोहर देवालयाला पूर्वीचे वैभव दोघा स्वामींनी प्राप्त करून दिले. तसेच इथे प्रभु रामचंद्रांचे पण पवित्र पावन पाऊल या भुमीला लागले आहेत. त्रेतायुगात प्रभू रामचंद्र वनवासात असताना या नगरीवरून चालले होते. प्रभू रामचंद्र ही एकदा या चंद्रेश्वर मंदिराच्या डोंगरावर वास्तव्यास होते, सीतामाईने इच्छा प्रकट केली की रोडगे करून त्याचा नैव्यद्य चंद्रेश्वराला द्यावा. तेव्हा डोंगरावर पाणी नव्हते म्हणून प्रभू रामचंद्राने बाण मारून पाणी उत्पन्न केले . पुढे लोकांनी ते कुंड व्यवस्थित बांधून घेतले. तेच आज गणेश टाका म्हणून प्रसिद्ध आहे. या गणेश टाक्याचे वैशिष्ट्य म्हणजे या टाक्यातील पाणी कधीच आटत नाही व पाणी अतिशय गोड, थंड व आरोग्यास लाभदायक आहे. चमत्कार म्हणजे जमिनीच्या सपाटीपासून ४०० फुट उंचीवर असूनही तेथे डोंगरावर पाणी कोठून व कसे येते याचा मात्र शोध लागत नाही. बाबाजी सांगत होते अन मी मंत्रमुग्ध होऊन सारं ऐकत होतो. क्षणभर मलाही समाधी लागल्या सारखे झाले. तितक्यात तिथे बाबांजींचे दोन शिष्य आले जेवणाची वेळ झाली आहे बाबाजी आपण चलावं. बाबाजी निघून गेले, मी पुन्हा जाऊन सर्व समाधींचे व चंद्रेश्वराचे दर्शन घेतले.
आजूबाजूचा परिसर पाहिला अन पुन्हा डोंगर उतरून तांबडका नावाच्या डोंगरकड्यावर आलो तिथे रेणुका मातेचे पुरातन मंदिर दिसले. मंदिराच्या   बाहेरच दोन दिपमाळ होत्या भव्य असा पुरातन दरवाजा व शेजारीच एक महाल होता तो महाल अहिल्यादेवी होळकर यांचा होता तो पाहून मंदिरात शिरलो एका कड्याच्या आतमधे हे मंदीर बांधलेले होते. दगडी कमानी व त्यावर सुबक नक्षीकाम इतिहासाची आठवण करून देत होती. मंदिराच्या दोन्ही बाजूने दर्शनाची सुविधा केलेली होती. कड्याच्या एका कपारीत रेणूकादेवीचे मुख असणारी सुंदर घडवलेली मुर्ती होती तिचे दर्शन घेतले अन दुस-या बाजूने बाहेर पडलो या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी १७४० मध्ये केला होता. ही रेणुका माता ही चांदवडची ग्रामदेवता आहे तसेच पंचक्रोशीचे श्रद्धास्थान आहे.
तेथूनच हायवेच्या पलिकडे अर्धा किलोमीटरवर ३०० वर्षापूर्वीचे इच्छापुर्ती गणेशाचे मंदीर आहे. तिथे पोहचलो सुंदर एका टेकडीच्या कुशीत हे मंदिर उभारलेले आहे. मंदिरात खुपच गर्दी होती. मंदिराच्या सभामंडपात उभा राहून थोडावेळ थांबलो, प्रत्येक भक्तगण आपल्या इच्छा गणेशाला सांगताना दिसत होते. मी मुख्य मंदिरात गेलो तर एक वेगळीच गणपतीची मुर्ती दृष्टीस पडली या अगोदर कधीच अशी मुर्ती मी पाहिली नव्हती. दर्शन घेतले प्रदक्षिणा घातली. अनेक भक्त तिथे नवस फेडायला आलेले पण दिसत होते. विघ्नहर्त्याचे हे वेगळं रूप पाहून मन आनंदी झाले. क्षणभर विसावा घेतला, अन पुढच्या प्रवासाला निघालो....

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ!
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा!

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
२३/२/२०२०

Thursday, 20 February 2020

वासोटा, व्याघ्रगड. संदीप राक्षे

मोहीम रौद्रसुंदर अनोख्या वनदुर्गाची व्याघ्रगड ,वासोटाची! संदीप राक्षे

निसर्गरम्य खेड तालुका या गृपच्या माध्यमातून दि १५ व १६ फेब्रुवारी २०२० रोजी वासोटा किल्ला मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत अजित आरूडे, अशोक कोरडे, ज्योती राक्षे, दिगंबर शिंदे, उपसरपंच कुलदीप वाळुंज, हर्षद पाटोळे, मयुर गोपाळे, विशाल दरेकर, समीर वाळुंज, स्वप्निल आढारी, अतुल बार्वेकर, महादेव शेळके, ओंकार रौंधळ, सौरभ फदाले, सायली घुले, रेवती कोहिनकर, अभिषेक बनकर, रूपेश भालसिंगे, जोत्स्ना मिंढे, अक्षय वाजे, किरण मांजरे, सागर वायदंडे, आदेश काळे, संतोष भोसले, वैशाली भोसले, गोरे सर, नयन देवकर, सहाणे सर, किराटी, प्रगती गोपाळे, दुर्योधन लवटे, सुरज नालगुणे, वैभव कोकीळ, वैभव बर्गे, अभिनव आरूडे, आदित्य कोरडे यांनी सहभाग घेतला होता. शनिवारी रात्री खेड राजगुरू नगर हून गाडी रात्री अकरा वाजता भोसरीला आली अन तेथून आमचा प्रवास साता-याच्या दिशेने सुरू झाला. यावेळी आयोजक किशोरदादा राक्षे नव्हते त्यांनी सर्व जबाबदारी रोहित बोरूडे व वर्षा चासकर यांच्या कडे सोपवली होती. या दोघांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली आम्ही पहाटे चार वाजता बामणोली या गावात पोहचलो, पहाट गारव्याने गावकरी व मोहिमेवर आलेले अनेक जण शांत झोपी गेलेले होते. दूरवरून कोंबड्याची पहाटेची बांग व पाणवठ्यावर आलेल्या जंगली जनावरांचा आवाज मात्र कानावर पडत होता. एक तास आम्ही गाडीतच बसून काढला. क्षितिजावरील अंधाराची झालर दूर होऊन प्रकाशाची उधळण सुरू झाली होती. जिथे आमच्या नास्त्याची व प्रातःविधी उरकण्यासाठी सोय केलेली होती त्या हाॅटेलवर पोहचलो, प्रात:विधी व नास्ता उरकला सोबत तेथूनच जेवणाचे डबे घेतले कारण वासोटा किल्यावर कसलीच सुविधा नव्हती.
बरोबर आठ वाजता वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी आमची बोट बामणोली येथील शिवसागराच्या किनारी लागली होती. वनअधिकारींनी तिथेच आमची तपासणी केली, प्लॅस्टिक किती व इतर साहित्य किती याचे मोजमाप झाले अन आम्ही बोटीत चढलो. सुर्य देवाचे आगमन होऊन पुर्ण जलाशय सुर्याच्या किरणांनी सुवर्णमयी झाला होता. जस जसा सुर्य वर येत होता तस तसा पाण्याचा रंग बदलत होता. बोट सुरू झाली निळेशार पाणी कापत बोट पुढे पुढे चालू लागली. चारी बाजूला घनदाट व हिरवीगार डोंगराईने जणु काही आपल्या कुशीत या कोयना जलाशयाला घेतले आहे, माता आणि पुत्र या प्रमाणे हे चित्र भासत होते. हवेतील गुलाबी गारवा अन जलाशयातील तुषार अंगावर पडून रोमांचित करीत होते.

निळेगर्द,निळसर शिवसागराचे पाणी
ओठांवर अवतरली मनातली गाणी
चोहोबांजूनी हिरवाईची मोहीनी
भासे हा क्षण जणू स्वर्गाच्या वाणी..

नीलरंगी रंगले अशी अवस्था बोटीतल्या प्रत्येकाचीच झाली होती, बरेचसे अंतर कापीत बोट एखाद्या  गुहेत आल्या सारखे वाटले, अद्भुत निळा प्रकाश चोहीकडे पसरला होता. आभाळ निळेसार झाले होते त्याचे प्रतिबिंब शिवसागर जलाशयाच्या पाण्यावर पडून खाली निळं पाणी अक्षरश: लखलखत होतं. त्या निळाईला एक विलक्षण चंदेरी झळाळी होती. या अद्भुत अंतरंगाचा अनुभव घेऊन थोडा विचार मग्नतेतून बाहेर पडतो ना पडतो तोच
जलाशयाच्या क्षेत्रात सुमिश्रीत विविध रंग संगतीचे चित्ताकर्षक सौंदर्याचे व मनोहरी लयबध्दतेचे नानाविविध जातीचे सुंदर पक्षी सहज नजरेस पडत होते, कदाचित जलाशयातील माशांचा घास घेण्यासाठी यांची तडपड सुरू असावी. इतक्यात एका बाजूला काहीतरी हलचल झाली, म्हणून लक्ष तिकडे वळवले तर एका किंगफिशर पक्ष्याला शिकार सापडली अन तो चोचीत घेऊन आमच्या समोरून मोठ्या तो-यात उडून पण गेला.
५० मिनिटांचा बोटिंगचा प्रवास करून आम्ही आता वासोट्याच्या जवळ पोहचलो होतो. बोटी मधून खाली उतरलो अन समोर पाहिले तर दूर वर उंचावर अस्पष्ट असा वासोटा किल्ला दिसत होता. आम्ही सर्वजण चेक नाक्यावर पोहचलो तिथे वनअधिकारी प्रत्येकाची पुन्हा तपासणी करीत होते. सोबत असलेल्या प्रत्येकाच्या बँग्ज चेक करीत होते, सोबत आणलेल्या प्रत्येक वस्तूंचे टिपण करीत होते. आमच्या गृपची तपासणी पुर्ण झाली अन आम्ही सर्वजण वासोटा किल्लाकडे मार्गस्थ झालो.
जंगलाची सीमाभिंत पार करून आता आलो तर आजूबाजूला फुलपाखरांची शाळाच भरली होती दोन मिनिटं थबकून गेलो त्या फुलपाखरांचा फोटो व व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही. माझ्या अगोदर रोहितदादा बोरूडे हे त्यांच्या कॅमे-याने प्रत्येक बागडणारे फुलपाखरू टिपत होते.
या फुलपाखरांच्या मधे ब्ल्यू मॉर्मन (नीलवंत) या जातीच्या फुलपाखरांची संख्या अधिक दिसत होती. या फुलपाखराचे शास्त्रीय नाव पॅपिलिओ पॉलिम्नेस्टर आहे. हे फुलपाखरू संपूर्ण महाराष्ट्रात व दक्षिण भारतातील वनांत आणि श्रीलंका या ठिकाणी आढळते तसेच मुंबई, नागपूर, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्येही त्यांचा वावर आढळतो. त्याचा पंख विस्तार १५० मिमी. असतो. शरीर आणि पंख काळे असून दोन्ही पंखांवर निळे ठिपके असतात. मागच्या पंखांच्या खालील बाजूस शरीरा कडील टोकावर लाल ठिपका असतो. काळ्या पंखावरती निळी चकाकी दिसून येते. हे फुलपाखरू वेगाने फुलांवर संचार करीत असते. २०१५ मध्ये या फुलपाखराला ‘महाराष्ट्र राज्य फुलपाखरू’ असा दर्जा देण्यात आला आहे. या फुलपाखरांना पासून मला ग.ह.पाटील यांची कविता आठवली..

छान किती दिसते ! फुलपाखरू
या वेलींवर ! फुलांबरोबर
गोड किती हसते ! फुलपाखरू

पंख चिमुकले ! निळेजांभळे
हलवूनी झुलते ! फुलपाखरू

डोळे बारीक ! करिती लुकलुक
गोल मणी जणु ते ! फुलपाखरू

मी धरू जाता ! येई न हाता
दूरच ते उडते ! फुलपाखरू

वाटेतच भल्या मोठ्या दगड गोट्यांनी सजलेला ओढा दिसला असे वाटत होते मानव निर्मित असेल, इतकी तंतोतंत मांडणी होती. पण तसे नव्हते ही रचना निसर्गनिर्मितच होती. ठिकठिकाणी पाणी होते, अजून झरे सुरूच होते. आजूबाजूला पाण्याचा खळखळाट ऐकू येत होता, त्यामुळे  मन शांत झाले होते.
सकाळचे अकरा वाजले होते त्यामुळे उन्हाचा कडाका जास्त लागल्याने, व थोडे चालून आल्याने डोके तापले होते. मस्त एका झ-या जवळ जावून डोक्यावर व तोंडावर पाण्याचे सपकारे मारले, फ्रेश झालो. पुढचा प्रवास खुप कठीण होता. घनदाट झाडीतून पाऊल वाट होती, त्या पाऊल वाटेची सीमा ओलांडायला पण परवानगी नव्हती कारण हे जंगल हिंस्त्र प्राण्यांनी खच्चून भरलेले होते. या जंगलात वाघ, बिबटे, सांबर, अस्वल, रानडुक्कर, ससा, हरिण, भेकर असे अनेक प्राणी आढळतात त्याच बरोबर असंख्य सरपटणा-या प्राण्यांची संख्या विशेष आहे. तसेच विविध जातीचे पक्षी, दुर्मिळ जातीचे पक्षी या जंगलात आहे. फुलपाखरांच्या सोबत मधमाश्या भरपूर प्रमाणात आहेत. रानमेवा रानफुल असंख्य वृक्षांनी बहरलेले हे वासोटा जंगल निसर्गाची मांदियाळीच जणू,
डोक्यात वासोटा पारायणं सुरू असतानाच आमच्या सोबत चालत असणा-या वाटाड्याने सर्वांना एका झाडा जवळ बोलवले अन एका झाडाकडे बोट केले तर त्या झाडाला असंख्य ओरखडण्याच्या खुणा दिसत होत्या तो म्हणाला? हे अस्वलाच्या नखांचे ओरखडे आहे. खुप खोलवर त्या झाडाला खड्डे पडलेले दिसत होते. शंभरफूट वाढलेल्या वृक्षांची एवढी दाटी होती की ऊन असूनही एक तिरीपही वाटेवर येत नव्हती. आता थोडी भिती वाटत होती कधी हे जंगल पार करतो असे झाले होते. एक तासाचा सपाट पण घनदाट जंगलाचा प्रवास करून आम्ही वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो होतो. इथून सुमारे ४२६७ फुट उंचावर वासोटा किल्ला होता. सुर्यदेव माथ्यावर आले होते, उन्हाची तीव्रता वाढले होती. त्यात आता सपाटी संपून चढाई सुरू झाली होती. किल्यावर चढण्यासाठी कोकणातील जांभ या दगडांचा वापर करून पाय-या बनविण्यात आल्या होत्या. कधी पाय-या तर कधी दगड गोटयांवरून चढाई सुरू होती, संपूर्ण शरीर घामाने चिंब झाले होते. दम लागत होता. पण हळूहळू चालत होतो. वाटेच्या दोन्ही बाजूंनी वडाच्या झाडा सारखी खुप झाडे होती त्या झाडाच्या पारंब्यांनी नैसर्गिक असे झोके तयार झाले होते. दमलो की एखाद्या झाडाच्या झोक्यावर जावून बसायचो, मस्त झोके घ्यायचो. झोके घेता घेता लहानपणीच्या आठवणीत रमायचो.

एक झोका, चुके काळजाचा ठोका
उजवीकडे डावीकडे
डावीकडे उजवीकडे
जरा स्वतःलाच फेका |१|
नाही कुठे थांबायचे
मागेपुढे झुलायचे
हाच धरायचा ठेका |२|
जमिनीला ओढायचें
आकाशाला जोडायचें
खूप मजा, थोडा धोका |३|

गायिका आशाताई भोसले यांनी गायलेले संगीतकार  आनंद मोडक यांनी संगितबद्ध केलेलं आणि गीतकार सुधीर मोघे यांनी लिहिलेलं चौकट राजा या चित्रपटातील गीत हुबेहुब या वातावरणाला लागू पडलं होत. एव्हाना सोबत आलेले सगळेच जण आता पुढे निघून गेले होते. माझ्या सोबतीला अजित आरूडे, अशोक कोरडे, रोहित बोरूडे, दिगंबर शिंदे, वर्षा चासकर, अभिनव व आदित्य हे होते. दिड ते दोन तासांच्या खड्या चढाईचा प्रवास करून आम्ही किल्यावर पोहचलो, समोरच छप्पर नसलेले पडके मारूतीचे मंदीर होते तिथे जाऊन मारूतीरायाचे मनोभावे दर्शन घेतले खुप दमलो असल्याने मारूतीच्या बाहेर चौथा-यावरच बैठक मारली, आजूबाजूला प्रत्येक जण सोबत आणलेल्या डब्यावर इथेच्छ ताव मारीत होता. कारण वाटेत ना पाणी ना खाण्यासाठी काही त्यात इतकी अवघड चढाई सर्वच भुकलेले होते. थोडावेळ बसलो अंगातील घामाच्या धारा कमी झाल्या होत्या ब-या पैकी छातीचा भाता आता पूर्ववत झाला होता. समोरच किल्याच्या उत्तरेला असणारं हे जुनं पुराणं जीर्ण झालेलं महादेवाचं मंदिर अजुन सुस्थितीत दिसत होते. आम्ही सर्वजण मंदिरात गेलो, भग्न झालेली महादेवाची पिंड दिसत होती तिला नमस्कार केला. त्या मंदिराच्या समोरून पुढे आलो, एका दगडी कमानातून वाकून पुढे सरसावलो, तिथे मोकळी जागा म्हणजे कोठडी होती. तेच अजब अस ओपन जेल होतं. सिद्दी जौहरला मदत करून मराठय़ांना दगा देणाऱ्या टोपीकरास छत्रपती शिवाजी महाराजांनी इथेच डांबून ठेवलं होतं. ते पाहून आम्ही पुढे उत्तर टोकावर आलो होतो. समोरच दिसत असलेला उत्तुंग नागेश्वराचा फणा असलेला सुळका न्याहाळात बसलो, क्षणभर वाटायचे नागेश्वराला जावून यावं पण थकल्याने कुठेच जायची इच्छा होत नव्हती दूरून नमस्कार केला. नागेश्वराची गुहा स्पष्ट दिसत होती. त्यांच्या समोरच अजून एक सुळका दिसत होता त्याला तुळशी वृंदावन किंवा ठेंगा म्हणतात, अनेक कातळकडे पाहून वेगळाच थरार अनुभवत होतो. आता भुकेने व्याकुळ झालो होतो किल्याचा अर्धाभाग पाहून महादेव मंदिराच्या शेजारीच असणा-या तळ्यावर हात धुतले, पाणी बर्फा पेक्षाही थंडगार होते ही सारी निसर्गाची किमया होती. एका झाडाखाली आम्ही सोबत आणलेले डबे सोडले, दरवेळच्या ट्रेक प्रमाणे यावेळी सुनिताताई आरूडे यांनी चपत्या आणि शेंगदाण्याची चटणी दिली होती भुकेच्या तडाख्यात सर्वच जेवण संपवून टाकले. झाडाखाली गारवा मस्त लागत होता त्यामुळे आम्ही निवांत बसलो आजूबाजूला मोहीमेसाठी आलेले तरूण आणि त्यांनी सोबत आणलेले गाईड मुलांना किल्याची सविस्तर माहिती देत होते..
किल्ल्याच्या एका अंगाला अरण्य तर दुसऱ्या अंगाला पातळात खोल गेलेले कडे म्हणूनच या किल्याला छ शिवाजी महाराजांनी व्याघ्र गड असे नाव दिले याला वनदुर्ग सुद्धा म्हणतात. शिलाहार राजांनी या गडाची निर्मिती केली. यानंतर तो शिर्के मोरे घराण्याकडे काही काळ होता. इ.स १६६० मध्ये जावळी बरोबर हा कोयनेचा वाघ स्वराज्यात सामील झाला. बराच काळ या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला गेला. हंटर आणि मॉरिसन या बड्या इंग्रज अधिकाऱ्यांनाही वासोट्याच्या या तुरुंगाची हवा खावी लागली होती. ज्ञानेश्वरीत एका ठिकाणी "वसौटा" असा शब्द आलेला आहे त्याचा अर्थ आश्रयस्थान असा सांगितला जातो. म्हणूनच या कोयनेच्या वाघाला आश्रयस्थान असल्याने वासोटा हे नाव पडले. अशी त्या गाईड कडून पुसटशी माहिती ऐकून आम्ही किल्यावर असणा-या राजवाड्याकडे निघालो. राजवाड्याचा फक्त पाया व्यवस्थित होता बाकीचे काहीच शिल्लक नव्हते.
वाड्याच्या मागेच पश्चिम टोकावर म्हणजेच अद्भुत  कोकणकडय़ावर आम्ही निघालो. काही अंतर चालून आल्यावर वाटेत दगडी चुन्याचा घाणा अजूनही सुस्थितीत होता. पुढे दोन पाण्याचे टाके होते निळेशार पाणी त्या टाक्यात दिसतं होते ते पाहून आम्ही बाबू कड्यावर पोहचलो, निळ्या रंगाच्या अनेक विविध छटा धारण केलेल्या असंख्य डोंगररांगा कोकणभूमीकडे धावत आहेत असे दिसत होते. गडाच्या दक्षिण टोकावर अजस्त्र, महाकाय हे शब्दही खुजे पडावेत असा जुना वासोटा आपला ताशीव कडा मिरवत उभा दिसत होता. गंमत अशी की छातीत धडकी भरवणाऱ्या या कडय़ाचे नाव ‘बाबू कडा’ असे आहे. तिथे एकदा आवाज दिला की त्याचे चारवेळा प्रतिध्वनी उमटत होते. जुन्या वासोटाची सीमाभिंत दिसत होती त्या किल्यावर जाण्यासाठी बंदी आहे म्हणूनच दूरूनच त्याचे विक्राळ रूप पाहिले मनसोक्त फोटो काढले. वासोट्याचे चैतन्यरूप तनामनात साठविले, आता पुन्हा बामणोलीला  परतायचे होते त्यात हा कठिण किल्ला उतरायचा होता. एक एक पायरी उतरताना पोट-यांना गोळे येत होते, कधी कधी दगड गोट्या वरून घसरत होतो, स्वताला सावरत होतो. दुरूवरून एका वेगळ्याच पक्षाच्या शिळेचा आवाज कानावर पडत होता. पण कानावर पडणारा आवाज थकलेल्या जीवाला उर्जा देत होता. घनदाट जंगलात अनेक औषधी वनस्पती होत्या त्यांचा सुगंध दरवळत तसे मन पण उत्साहाने भरून जाई खरच वासोटा हा वेगळा अनुभव होता. कारण इथली शिस्त खूप आवडली होती. अनेक ठिकाणी गड किल्यांचा होत असलेला -हास अशा नियमांनी थांबणारा होता. ना कुठे प्लॅस्टिक दिसले अन ना कुठे कचरा नियमांच्या मुळे लोकांना पण चांगली सवय लागली हे पाहून समाधान वाटले. खरतर गडकिल्ले हे आपले वैभव आपल्या शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या भूमी म्हणजे आपल्यासाठी स्मारकच ते अद्भुत असे मंदीरच या शिवमंदीरांची जपणूक करणे हे महाराष्ट्रातील प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. एक एक किल्ला पूर्ववत करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, मंदीर सप्ताह या खर्चात पडण्यापेक्षा आपल्या शिवशंभूच्या या वास्तू उभ्या करण्यासाठी मदत करायला हवी. आपले हेच गड किल्ले जगासाठी  प्रेरणास्त्रोत्र बनतील यात शंकाच नाही.  आजही प्रत्येक गड किल्यावर वेगळीच उर्जा मिळते कारण आपल्या राजाचा सहवास या गड किल्यांना लाभला आहे. या अभेदय गड किल्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्षण केले आहे. असा हा सह्याद्री टिकला पाहिजे, जपला पाहिजे. किल्ला उतरत होतो पण या विचारांत गर्क झाल्याने कधी वासोटा किल्ला उतरलो याचे भानच राहिले नाही. पुन्हा चेक नाक्यावर जेवढे सोबत घेऊन गेलो होतो तेवढे सोबत आणले हे दाखवले तेव्हाच सर्वांना सोडले पुन्हा दिड तासांचा बोटींगचा प्रवास करून बामणोलीला पोहचलो..घामाने चिंब झालेले शरीर ऊन आणि प्रवासाने तापलेले शरीर, थंडगार तर करायलाच हवे म्हणून मस्त शिवसागरात पोहण्याचा मनसोक्त  आनंद घेतला अन आलेला शीण कुठल्या कुठे पळून गेला.

वासोटा दुर्ग दुर्गम जरी!
असला व्याघ्रगड तरी!
वन्यजीवांनी समृद्ध परी!
वनदुर्ग म्हणून किर्ती उरी!

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

Thursday, 6 February 2020

स्वागताध्यक्ष

स्वागताध्यक्ष भाषण
साहित्यकणा साहित्य संमेलन नाशिक

5 व्या साहित्यकणा फाऊंडेशनच्या  साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून या समर्थ मंगल कार्यालय नाशिक येथे उपस्थित असलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचे हार्दिक स्वागत करताना मला मनस्वी आनंद होत आहे. मराठी मायमाऊलीच्या पुढे नतमस्तक होऊन ज्ञानोबा आणि तुकोबाला साष्टांग दंडवत घालून मी या सारस्वताच्या मेळाव्यात आणि एक प्रकारच्या साहित्य पंढरीत आपल्या सर्वाचे अत्यंत मनापासून स्वागत करतो. या साहित्य संमेलनाचे उद्घाटक डाॅ. वेदश्री थिगळे, साहित्य काव्य संमेलनाध्यक्ष शिलाताई गेहलोत, प्रमुख पाहुणे डाॅ शंकरजी बो-हाडे, घनश्याम पाटील, उद्धवजी अहिरे, डाॅ. राहुल पाटील, किरण भावसार, संदीप चव्हाण तसेच या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन करणारे आमचे मित्र रविंद्र मालुंजकर यांचे पण मनःपूर्वक स्वागत करतो.
मराठीची पताका खांद्यावर घेऊन या नाशिक महानगरीत ही जी मांदियाळी इथे जमली आहे, ती गोदावरी काठावरचीच साहित्यगंगा आहे. या साहित्यगंगेत माझ्यासारख्या सामाजिक सांस्कृतिक व कला क्षेत्रातल्या छोटया कार्यकर्त्यांला स्वागताध्यक्ष होण्याचा जो बहुमान आपण मला एकमताने दिलात, याबद्दल मी अध्यक्ष संजयजी गोराडे, सचिव विलासराव पंचभाई, सहसचिव सुरेखाताई बो-हाडे, सल्लागार रावसाहेब जाधव, पुजाताई बागूल यांचा अंत:करणापासून ऋणी आहे.
आयुष्यात यश आणि अपयशाचे अनेक टप्पे असतात, ते सर्व पार करून जाताना कधी यश मिळते, कधी अपयश मिळते, कधी सुखाचे दिवस असतात. कधी अडचणीचे दिवस असतात. आज मी असे मानतो की स्वागताध्यक्ष पदाचा बहुमान करून, माझ्या आयुष्यातील अत्यंत सन्मानाचा असा दिवस मला पाहायला मिळाला. त्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.

इवलेसे रोप लावियेले द्वारी। त्याचा वेलू गेला गंगनावरी

संजयराव गोराडे सरांनी साहित्यकणा फाऊंडेशनचे पाच वर्षापूर्वी लावलेले साहित्यसंस्थेचे हे रोपटे आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. साहित्यकणा फाऊंडेशन आता सर्वच क्षेत्रात भरारी घेत आहे. या संस्थेचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात आहे, हे फक्त संजय गोराडे सरांच्या मुळे, निखळ मनाचा साधा माणूस, षंढरिपूंचा थोडा सुद्धा प्रादूर्भाव या माणसावर जाणवत नाही, पुसटसाही ही दिसत नाही. त्यामुळे निस्वार्थ, सहदयी, मनमोकळा, मनमुराद आनंद लुटणारा अन इतरांनाही आनंद देणारा साहित्याचा पुजारी अन संत माणूस म्हणजेच संजयजी गोराडे सर, परंतु हे सर्व करताना पाठीवर लढ म्हणण्याची ताकद देणारा पण हवा असतो अन तो पाठीवरचा हात तसेच खंबीर साथ देणारे विलासजी पंचभाई..

खरतर कविता अन लेखन शिकलो ते साहित्यकणा फाऊंडेशन या समुहात सहभागी झाल्यावर ख-या अर्थाने साहित्याचा प्रवास सुरू झाला.
कविता ही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे हे कधीच उमगलं नाही. काव्य हे आपले आंतरिक प्रेरणास्थान आहे हे जाणवलं पण नाही. त्यामुळे या अगोदर कविता म्हणजे काय हा प्रश्न सारखा सतवायचा. अनेक दिग्गज साहित्यिकांच्या कविते बद्दलच्या व्याख्या ऐकल्या, निःशब्दाला शब्दरूप करणारे साधन, मनाचे विविध भावतरंग उमटविणारे काव्य, भावनांचा उस्फूर्त आणि अद्भुत आविष्कार, सृजनशील आत्म्याचा उच्चार' अशा अनेक व्याख्या ऐकल्या परंतु कवितेची हीच ओळख आहे का? आणि लक्षात आले, जी कविता ओळखण्याचा आपण सतत प्रयत्न करत आहोत, ती कविता आपल्याला फार पूर्वीपासून ओळखीची आहे, अगदी कळायला लागण्या आधीपासून  'काऊ ये, चिऊ ये ' म्हणत कवितेनेच पहिला घास भरवला. जात्यावरच्या ओव्यांनी पहाटेची सुरवात झाली, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई हे अंगाई गीत गाऊन निजवले, शाळेत कविता भेटली ती तुकडोजी महाराजांची या झोपडीत माझ्या त्यामुळे जीवनाच्या जाणिवांचे आणि नेणिवांचे पदर उलगडत कळीचे फूल झाले. मनावर संस्काराचे बीज रूजले ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदाने, संत तुकाराम महाराजांच्या मार्गदर्शनपर ओव्यांनी, दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून झुलायचे मंगेश पाडगावकरांची ही रचना अजूनही उर्जा देऊन जाते, किसीकी मुस्कराहटो पे हो निसार किसीका दर्द मिल सके तो ले उधार शैलेंद्र यांनी लिहीलेली ही रचना सामाजिक बांधिलकीचे भान देऊन जायची.
कवितेने शिकवण्यापेक्षाही शहाणे आणि सुजाण केले. कवितेने भारावून जाऊनच आम्ही मित्रांनी कितीतरी मनोरथे रचली. कधी वाटे घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात व्हावे, आकाशी झेप घे रे पाखरा ही रचना ऐकून तर अक्षरशः आकाशात झेप घ्यावी अस वाटायंच,  किती वचने टिकली माहित नाही पण कवितेने स्वप्न बघायला शिकवले. कवितेने आयुष्यातल्या प्रत्येक अवस्थेत साथ दिली. आयुष्याच्या संध्याकाळी “आयुष्य कसे जगायचे, कण्हत कण्हत की गाणे म्हणत या आशादायी दृष्टीकोनाने उभारी दिली. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कविता दीपस्तंभासारखी पाठीशी उभी राहिली. कधी मित्र म्हणून, कधी गुरू म्हणून, कधी पालक म्हणून, कधी मार्गदर्शक म्हणून, त्या मुळे  कवितेशी एक ऋणानुबंध तयार झाले आहे. म्हणूनच कदाचित कविता म्हणजे काय हे सांगता येणे कठीण आहे. कारण नात्याची फक्त अनुभूती घेता येते, शब्दात मांडता येत नाही. चार भिंती, एक छप्पर, दरवाजा, खिडकी घराला असते ते घर या व्याख्येत, मनातले घर बसत नाही. तसंच कविता कुठल्याही व्याख्येत बसवता येत नाही. कवितेच्या अनेक नात्यांप्रमाणे तिची रुपेही अनेक आहेत. कविता हा केवळ आत्म्याचा उच्चार नाही तर एक अविष्कार आहे. एखादा कवी, गझलकार स्वप्नाचे बीज रुजवतो, भावनेच्या ऊबेत जोपासतो, विचारांच्या कोषांचे आवरण घालतो, त्यातून जे सुंदर फुलपाखरू बाहेर येते त्याला कविता असे म्हणतात....

स्वागताध्यक्ष भाषणाच्या शेवटी गुरू ठाकूर यांची एक अप्रतिम रचना सादर करतो आणि माझे भाषण संपवतो...

असे जगावे दुनियेमध्ये,
आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..

पाय असावे जमिनीवरती,
कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती,
काळीज काढुन देताना..

संकटासही ठणकावुन सांगावे,
आता ये बेहत्तर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर..

करुन जावे असेही काही,
दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास सा-या,
निरोप शेवटचा देताना..

स्वर कठोर त्या काळाचाही,
क्षणभर व्हावा कातर कातर,
नजर रोखुनी नजरे मध्ये,
आयुष्याला द्यावे उत्तर...

जय साहित्य जय साहित्यकणा

संदीप राक्षे ✍🏻
स्वागताध्यक्ष
साहित्यकणा साहित्य संमेलन

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...