Sunday, 27 December 2020

कातळाचे नंदनवन पितळखोरे लेणी


कातळांचे नंदनवन, बौद्धलेणी पितळखोरे...
संदीप राक्षे ✍🏻

महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठे जंगल असलेले आणि कन्नड तालुक्यात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले गौताळा अभयारण्य, इथे निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेली भूमी म्हणजे गौताळा अभयारण्य. गौताळा अभयारण्यात फेरफटका मारताना रस्त्याच्या बाजूने आपल्याला अंगत-पंगत घातलेल्या सह्याद्रीच्या उतुंग व अथांग पर्वतरांगा दिसतात. ढगांशी स्पर्धा करणारे उंच उंच वृक्ष दिसतात, पावसाळ्यात निखळ खळखळून वाहणारे पाण्याचे झरे, ओसंडून वाहणारे धबधबे आणि डोंगराने हिरवीगार दुलई पांघरावी असे नयनरम्य हिरवेगार जंगल नजरेस पडते. प्रत्येकाला या निसर्गाचे सौंदर्य भुरळ घालणारच यात शंकाच नाही. निसर्गा सोबत औरंगाबादचा इतिहासही तेवढाच विरश्रीने नटलेला, अद्भुत कलाकृतीने सुप्रसिद्ध असलेला.
        मागच्या वेळी मी या रांगेतील अंतुर हा किल्ला पाहिला होता वेळे अभावी मला पितळखोरे लेणी पहाता आली नाही. कामानिमित्त औरंगाबादला जायचे होते आज कोणतेही नवीन ऐतिहासिक ठिकाण पहायचेच हा मनाने बांधलेला चंग स्वस्थ बसून देत नव्हता. मला आमचे कवी मित्र ज्ञानेश्वर गायके यांनी पितळखोरा लेणीची आठवण करून दिली, मी व माझे मित्र सिनेमॅटोग्राफर मारूती तायनाथ पितळखोरा लेणी पहायला निघालो. लेणी म्हणजे डोंगर, टेकडी, पर्वत, खडक कोरून तयार केलेल्या गुहा होत. ज्यांच्या उपयोग संन्यासी भिक्खूंना तपस्या, साधना, विश्रांती करण्यासाठी केला जाई, निसर्गाच्या सान्निध्यात, घनदाट जंगलात द-या खो-यात अनेक लेणी आपल्याला पहायला मिळतात.
      कन्नड या तालुक्याच्या गावावरून पितळखोरा ही लेणी अठरा किलोमीटरवर आहे. कन्नडचा अवघड घाट चढून आम्ही कन्नड मधे पोहचलो चहा नास्ता केला. कालिका मातेचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आल्याची हिरवीगार शेती, पाण्याची शेततळी मनाला प्रसन्न करीत होती. पितळखो-या लेणीच्या प्रवेशद्वारा जवळ पोहचलो तेथून गौताळा अभयारण्य सुरू झाले तीन चार किलोमीटरचा प्रवास करून लेणीच्या कडेला आलो. गाडी पार्किंगला लावली, आमच्या दोघांच्या शिवाय तिथे रानाची पाखर व त्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. तेथून आम्हाला खोल दरीत उतरायचे होते. महाराष्ट्र शासनाने तिथपर्यंत जाण्यासाठी छान पाय-यांची सुविधा केलेली होती. एक एक पायरी आम्हाला दरीच्या खोल गर्भात घेऊन जात होती. मोकळा वारा आता काहीसा शांत झाला होता. शे दोनशे पाय-या उतरून आम्ही लेणी जवळ आलो होतो. सहज आकाशाकडे नजर गेली अन हबकलोच दोन्ही बाजूला घनदाट जंगल  उंच कातळकडे जणू काही आम्ही एखाद्या भेगेत अडकलो आहोत असे वाटत होते. पण लेणीचा परिसर पाहिला आणि भिती कुठच्या कुठ पळून गेली, कातळांचे हे नंदनवन याची देही याची डोळा अनुभवत होतो. वातावरण शांत नीरव मनाला अद्भुतेचा स्पर्श जाणवत होता. जगापासून किती तरी दूर मन शून्यावर येऊन पोहचले होते. आपला प्राचीन इतिहास बघितला तर लाखो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून फेकल्या गेलेल्या लाव्हाचे एकावर एक थर पसरत गेले आणि त्यातून निर्मिती झाली दख्खनच्या पठाराची आणि सह्यद्रीची याच सह्याद्रीच्या उदरात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आढळणाऱ्या १५ ते ६० मीटर उंचीच्या कातळामुळे लेणीनिर्मितीला उत्तम पार्श्वभूमी लाभली. त्याचबरोबर सातवाहन, क्षत्रप, वाकाटक, राष्ट्रकूट अशा विविध राजवटींच्या काळात राजघराण्यातील व्यक्तींनी तसेच व्यापारी, भिक्षू, सामान्य नागरिकांनी दानं दिल्यामुळे महाराष्ट्रात बौद्ध, हिंदु व जैन धर्मीयांच्या लेणींची निर्मिती झाल्याचे पुराव्यांवरून दिसून येते. अशीच दुर्मिळ बौद्ध कालीन लेणी म्हणजे पितळखोरा लेणी, ही लेणी सहाव्या शतकातील म्हणजे अजिंठा वेरूळच्या अगोदरची असे असल्याचे मानले जाते. राजा सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजे पैठण ते नालासोपारा हा अतिप्राचीन रहदारीचा प्रमुख मार्ग पितळखोर्‍याहुन जातो. त्यामुळेच ह्या जागेची निवड बौध्दांनी लेणी कोरण्यासाठी केली होती. महामायुरी ह्या बौध्दधर्मीय ग्रंथामध्ये "शकरीन" हा यक्ष पितलिंगया येथे राहतो. असा उल्लेख आला आहे. वरील ग्रंथाचे संदर्भातुनच पितलिंगया म्हणजे आताचे पितळखोरे आहे. इ.स.पूर्व सहाव्या शतकात भारतात बौद्ध धम्माचा उदय झाला. बौद्ध धम्माच्या प्रचार व विकासासाठी बौद्ध भिक्खूंना गावापासून दूर पावसाळ्यात राहण्यासाठी डोंगरात लेणी खोदण्यास सम्राट अशोकाने सुरुवात केली. अशा लेणींचा उल्लेख बौद्ध ग्रंथात ‘वर्षावास’ या नावाने केला आहे. या लेण्यांना पुढे विहार ही संज्ञा प्राप्त झाली. कालांतराने विहाराबरोबर प्रार्थनागृहे खोदण्यात आली. पितळखोरे ही लेणी खोल अरुंद दरीच्या दोन्ही काठावर दगडात कोरलेली आहे. लेण्यांचे पाण्याच्या प्रवाहामुळे दोन भाग झाले आहेत. या लेण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे लेण्यातील काही गुहा दुमजली आहेत. वरच्या मजल्यावर जाण्यास भुयारातून पायऱ्या खोदलेल्या आहेत. मुख्य गुंफा म्हणजे एक मोठा चैत्य आहे. मधल्या भागात ३५ स्तंभ असून या स्तंभांवर धवल, कृष्ण, रक्त आणि तपकिरी वा पिंगट रंगात रंगवलेली बौद्ध संन्यास्यांची चित्रे अस्पष्ट दिसतात. ब-याच लेणीच्या प्रवेश द्वाराला अकरा पायर्‍या आहेत. मुख्य लेणीच्या खालीच हत्तींची शिल्प रांग आहे. शेजारीच ५ फुटाचे प्रवेशद्वार आहे. दरवाज्याचा वरती अर्धकमळ व त्रिरत्नांच्या नक्षी आहे. या दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन द्वारपाल कोरलेले आहेत. भव्य शिल्पाकडे जाताना इतका छोटा भुयारी मार्ग पाहून आश्चर्यचकित झालो. त्याच दरवाजाच्या वर गजलक्ष्मीचे शिल्प होते. परंतु ते खाली पडले आहे. ब-याच शिल्पांची नासधूस झालेली आहे. उन वारा पाणी आणि उनाड माणसांच्या आक्रमणाने ही ऐतिहासिक वास्तू डौलात उभी आहे. खरतर आपली सर्वांची जबाबदारी आहे असा मौल्यवान ठेवा जीवापाड जतन करायचा आहे. संपूर्ण पितळखो-याचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.  

कातळाच्या नंदववनाचे 
रक्षण आपणच करणार 
मौल्यवान या वास्तूंचे 
महत्व जगाला सांगणार..

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६

No comments:

Post a Comment

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...