Saturday, 30 January 2021

लक्ष्मी नृसिंह हंम्पी..

 भारताच्या सुवर्ण वैभवाच्या पाऊलखुणा..

"लक्ष्मी नृसिंह, कडलेकालु, सासिवेकालु गणेश मंदिर" हंम्पी कर्नाटक 

संदीप राक्षे ✍🏻


माधव रंगा मंदिर पाहून आम्ही लक्ष्मी नृसिंहाची भव्य मुर्ती पहायला निघालो, आमच्या सोबत गाईड व त्याचीच रिक्षा होती त्यामुळे मनसोक्त या ऐतिहासिक वास्तुं पहाण्याचा आनंद घेत होतो. प्रत्येक वास्तू ही एक, दोन, पाच, सहा, दहा किलोमीटर अंतरावरील आहेत. पुर्वीच्या काळात जगातील सर्वात श्रीमंत शहर आम्ही पहात होतो. हंम्पी इतके नेत्रदीपक शहर इथला इतिहास इथल्या वास्तू सारख्या वास्तू कुठेच नाहीत. अशा विचारातच मी संकेत व सुरज नळगुणे नृसिंह शिल्पा जवळ पोहचलो भव्य कमानीतून आत शिरलो, दूरनच महाकाय नृसिंह भगवंताचे रूद्र दर्शन झाले होते. २२ फुट उंचीचे भव्य शिल्प  मुर्तीकलेचा अद्भुत नमुना दिसत होता. किती आक्रमण, उन, वारा, पाणी झेलत नृसिंहाची ही मुर्ती उघड्यावरच आपले स्थान टिकवून होती. प्रभू नृसिंह हे विष्णूचा अवतार अर्धसिंहाचे तोंड विक्राळ दिसत होते. ही मुर्ती सात तोंडी शेष नागावर विराजमान झालेली आहे. एक मांडीवर देवी लक्ष्मी बसलेल्या दिसत आहेत. नृसिंह मुर्तीची बरीच तोडफोड झालेली आहे काही अवशेष नष्ट करण्यात आलेले आहेत. इतक्या भल्या आक्रमणातून सुद्धा ही मुर्ती सुअवस्थेत दिसत होती. नृसिंह भगवंताचे दर्शन घेऊन आम्ही शेजारीच असलेल्या शंकराची पिंड असलेल्या मंदिरा कडे आलो. मंदिर छोटो होते पण पिंड मात्र खूप मोठी होती. अखंड दगडातील या शिवलिंगाचा तळ कायम पाण्यात असतो. हे पाणी कुठून येते हे एक आश्चर्यच आहे. लक्ष्मी नृसिंह व शंकराची पिंड पाहून आम्ही पंधरा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सासिवेकालु गणपती मंदिराकडे निघालो. हे मंदिर थोडे उंचावर होते, दिवसभर चालण्याने थकवा आला होता. पण वातावरणातील चैतन्य व या उर्जादायी वास्तू पाहून मन व शरीरात उत्साह निर्माण होत होता. सासिवेकालु गणपती मंदिराच्या चारी बाजूला खांब व फक्त छत होते, चारी बाजू ओपन होत्या. १९ फुटाची गणेशाची मुर्ती मोहरीच्या दाण्या सारख्या दगडाची बनवलेली आहे. याच मुर्तीच्या मागे एका नटलेल्या स्त्रीची प्रतिमा दगडात कोरलेली आहे. ती मुर्ती शारदेची असावी असे मला वाटते. मंदिराला प्रदक्षिणा घातली, गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले व आम्ही कडलेकालु गणपती मंदिराकडे निघालो. भव्य सभा मंडप अत्यंत सुंदर गाभारा त्याच सफेद दगडात कोरलेली  गणपती बाप्पाची २२ फुटी मुर्ती पहातानाच भक्ती भाव प्रकट होतो व आपोआप हात जोडले जातात. हात जोडले जातात त्या कलेला, त्या कलाकारांना, इतके सुंदर शहर निर्माण केले त्या राज्याला. दोन वेगवेगळ्या भव्य अशा गणेशाचे दर्शन झाले होते. कडेलकालु गणपतीच्या पायथ्यालाच खाली विजयनगर बाजाराची जागा व दगडात बांधलेली बाजारपेठ दिसत होती. हे विहंगम दृष्य डोळ्यांनी पहातच आम्ही टेकडी उतरलो आणि पुढच्या स्थळाकडे जाण्यासाठी मार्गस्थ झालो..


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


Friday, 29 January 2021

हत्ती महल, कमल महल, रंगा मंदिर

 भारताच्या सुवर्ण वैभवाच्या पाऊलखुणा..

"हत्तीमहल, कमल महल, माधव रंगा मंदिर" हंम्पी कर्नाटक 

संदीप राक्षे ✍🏻


हजार राम मंदिर पाहून आम्ही हत्ती अस्ताबल, कमल महाल व माधव रंगा मंदिर पहावयास आलो होतो. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर प्रथम दिसते ते भव्य हत्ती अस्ताबल, हत्तींना ठेवण्याकरता १२०० फूट लांब उत्तम दगडी महाल, ज्याला ११ मोठी दालने होती. प्रत्येक दालनाचा घुमट वेगळ्या आकाराचा दिसत आहे. नक्षीकामाची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे. घुमटाच्या आतील बाजूने लटकवलेले अजस्र लोखंडी हूक, ज्याच्या आधाराने जाड दोरखंडाने हत्तींना बांधून ठेवत. या वस्तू समोरच भव्य दालनात माहूत व पहारेकरी रहात होते. राणी महाला इतकेच हत्ती महालाचे महत्त्व होते. इथूनच राजघराण्यातील महिलां हत्ती वरील अंबारीत बसून कार्यक्रमाला जात असायच्या. हत्ती महालाच्या समोरच प्रशस्त प्रांगण या प्रांगणात हत्तीना शिक्षण दिले जायचे. इतके फिरलो पण प्राण्यांच्या साठी महाल प्रथमच पाहिला होता. या वरून विजयनगरच्या वैभवाची महती साक्षांकित होते. हत्ती महाल पाहून आम्ही चालतच कमल महाल पहाण्यास निघालो. राजघराण्यातील स्त्रियांना एकत्रित दिवस घालविण्याचा महाल म्हणजे कमल महाल, उंचावरून पाहिले तर पूर्ण कमळाच्या फुलांचा आकार दिसतो. या महालातील १४ कमानी इतक्या सरळ रेषेत आहेत की शेवटच्या कमानीतून दिसणारा उजेड  अवर्णनीय आहे. कमल महाल हा कमळाच्या फुलाच्या आकाराचा म्हणून त्याला कमल महाल हे नाव पडले आहे. एक एक वास्तू पाहून मन थक्क होत होते. संकेत प्रत्येक वास्तूची माहिती गाईडला तंतोतंत विचारीत होता त्यामुळे माझ्या पण ज्ञानात भर पडत होती. कमल महाल पाहून आम्ही टेहळणी बुरूजा जवळ पोहचलो, त्या बुरूजावरून चोहोबाजूंवर कडक नजर ठेवता येईल व कमल महालातील राज घराण्यातील महिलांची हालचाल सेवकांच्या दृष्टीस पडू नये अशी सुविधा केलेली दिसत होती. एक एक वास्तू पहात होतो तिची नवलाई वेग वेगळीच होती. टेहळणी बुरूजाला वळसा घालून आम्ही माधव रंगा मंदिराकडे निघालो..

माधव रंगा मंदिर हे १५४५ साली नृत्य, गायन, वादन या साठी बांधलेले होते. या मंदिरातील प्रत्येक खांबावर गरूड, श्री विठ्ठल, सूर्य, कृष्ण, हनुमान अशा विविध देवतांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. शेजारी देवी मंदिर गर्भ गृह रिकामे पण मंदिराच्या बाहेरच बारा फुटाची हनुमानाची कोरीव मुर्ती प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते, त्या मुर्तीचे दर्शन घेण्याचा व तिच्या सोबत फोटो काढण्याचा मोह अजिबात आवरत नाही. प्रत्येक मंदिर निरिक्षण पूर्वक पाहून त्याची खासियत समजून घेताना साक्षात चौदाव्या शतकात असल्याचा भास वेळोवेळी होत होता. किती परंपरा, संस्कृती कला, अनमोल, अप्रतिम, अद्भुत, चैतन्यदायी, चमत्कारिक अशा वास्तू हा आपल्या पुर्वजांचा हा ठेवा पाहून आपला भारतदेश हाच खरा स्वर्ग असा साक्षात्कार होतो..


संदीप राक्षे✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


Thursday, 28 January 2021

हजार राम मंदिर हंपी

 भारताच्या सुवर्ण वैभवाच्या पाऊलखुणा..

"हजार राम मंदिर" हंम्पी कर्नाटक 

संदीप राक्षे ✍🏻


महानवमी दिब्बा पाहून पूर्ण शरीरात वेगळीच शक्ती संचारली होती. गाडी प्रत्येक ऐतिहासिक स्थळावर दूरच लावावी लागत होती आणि पायी जाव लागत असे त्यामुळे चालण्याचा व्यायाम पण होत होता. गाईड आम्हाला हजार राम मंदिराकडे घेऊन आला. 

हंम्पी हे प्राचीन काळातील किष्किंदा क्षेत्र म्हणूनही सुपरिचित होते. रामायणातील वाली आणि सुग्रीव यांची किष्किंदा नगरी ही हम्पीच्या जवळच आहे. या मंदिरातील अभिलेखात कृष्णदेवराय या मंदिराचा निर्माण केल्याचा उल्लेख आहे. या अभिलेखात अन्नलादेवी किंवा अम्नोलादेवी या राणीने दान दिल्याचाही उल्लेख आहे. या मंदिराची निर्मिती इ.स. १५१३ झाली. हजार राम म्हणजे इथे श्री रामाच्या हजार शिल्पांचे दर्शन होते म्हणून या मंदिराला हजार राम मंदिर म्हणतात. आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत शिरलो, प्रवेश व्दारावरील अभिषेक लक्ष्मीचे दर्शन घेतले. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर पाच थरांमधली शिल्प पाहतच राहीलो तिथे फोटो काढण्याचा मोह आवरेना. या सर्वांत खाली हत्ती आणि त्यावर स्वार त्यांचे माहूत यांची शिल्प कोरलेली होती, दुसऱ्या थरामध्ये घोडे आणि त्यांचे स्वार, तर तिसऱ्या थरामध्ये सैन्य कोरलेल आहे. सोबतच उंटाची शिल्पही दिसतात याच थरामध्ये वाद्य वाजवणाऱ्या लोकांची शिल्पे आहेत. चौथ्या आणि पाचव्या थरामध्ये स्त्रिया नर्तन करताना शिल्पांकित केलेल्या दिसतात. तसेच कृष्णलीलेतील काही प्रसंग या थरा मधे कोरलेली दिसतात..

मंदिर परिसरात प्रवेश केला. राम मंदिर हे पूर्वाभिमुख असून गर्भगृह, अंतराळ, मुखमंडप, दक्षिण आणि उत्तर दिशेला दोन अर्धमंडप अशी एकूण रचना केलेली दिसली. मंदिराच्या पूर्व दिशेला महामंडप तो खास विजयनगर शैलीतील स्तंभांनी सुशोभित केलेला आहे. या मंदिरांसाठी ग्रॅनाईट या दगडाचा वापर केला असून असून मंदिराचे शिखर विटामधे बांधलेले आहे. मंदिराच्या आतून बाहेरून प्रत्येक ठिकाणी रामायणातील प्रत्येक प्रसंग कोरलेला आहे. ही शिल्प पहाताना रामायण आपल्या डोळ्यासमोर उभे राहते..

या प्रसंगातील मला समजलेली काही शिल्प चित्र, दशरथ आपल्या चार पुत्रांसोबत म्हणजेच राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या समवेत बसलेले दाखवले आहे. सीता माता लक्ष्मणाला हरिण दाखवत आहे. रामाला वनवासाला पाठवून भरताचा राज्याभिषेक करावा यावर दोघी भाष्य करताना शिल्पांकित आहे. भरत भावाच्या वियोगाने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेऊन हात जोडून त्यांची पूजा करीत आहे. सीता माता अशोकवनात बसलेली आहे, सीतामाता हनुमानाला तिच्या बोटातील अंगठी देताना. भरतभेट, राम रावण युद्ध, शबरीची बोरे, राम हनुमान भेट, सीता स्वयंवर, असे अनेक प्रसंग सुंदर शिल्पांकित केलेले आहेत. प्रत्येक प्रसंग मी, संकेत व सुरज नळगुणे डोळे भरून पहात होतो. मंदिराच्या गर्भगृहात मुर्ती नसली तरी हजार राम शिल्पांनी मंदिर चैतन्यमयी दिसत होते. मंदिरातील खांब चिकन्या काळ्या रंगातील होते त्यावरही अनेक शिल्प कोरलेली दिसत होती. संपूर्ण मंदिर पहाताना रामायणातील प्रत्येक प्रसंग नजरेसमोर दिसत होता. लहानपणी दूरदर्शन वरील रामायण पहाताना जो भाव निर्माण व्हायचा आज तोच भाव प्रकट झाला होता. मंदिरातून बाहेर पडताना तुकोबारायांचा एक अभंग डोक्यात चमकून गेला..


राम म्हणे ग्रासोग्रासी! तोची जेविला उपवासी!!

धन्य धन्य ते शरीर! तीर्थाव्रंताचे माहेर!! 


राम म्हणे करिता धंदा! सुख समाधी त्या सदा!!

धन्य धन्य ते शरीर! तीर्थाव्रंताचे माहेर!! 


ऐसा राम जपे नित्य! तुका म्हणे जीवन्मुक्त!!

धन्य धन्य ते शरीर! तीर्थाव्रताचे माहेर!!


संदीप राक्षे✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


Wednesday, 27 January 2021

महानवमी दिब्बा हंम्पी

 भारताच्या सुवर्ण वैभवाच्या पाऊलखुणा..

"महानवमी दिब्बा" हंम्पी कर्नाटक 

संदीप राक्षे ✍🏻


हंम्पी हे नाव ऐकले वाचले की अस वाटत की एखाद पर्यटन निसर्गरम्य स्थळ असाव. परंतू आध्यात्म व इतिहासाचा अनोखा संगम असलेलं हंम्पी हजारो एकर मधे तांबूस अजस्त्र दगडांच्या मधे हे विजयनगर आताचे हंम्पी वसलेलं आहे. ५०० पेक्षा जास्त पुरातन वास्तुंचे अवशेष हे इथले विशेष आहे. आम्ही आधुनिक हाॅस्पेट शहरातून जेव्हा हंम्पी मधे प्रवेश केला तेव्हा मला १४ व्या शतकात आलो असल्याचा भास झाला. वास्तु पुरातन आणि माणसं फक्त आधुनिक दिसत होती इतकाच फरक होता. केळी व नारळाच्या झाडांनी आच्छादलेलं हंम्पी मनाला खूपच भावलं. एक एक रहस्यमयी स्थळ पहात आम्ही महानवमी दिब्बा या अतीभव्य प्रांगणात पोहचलो, हा दिब्बा (व्यासपीठ) ओरिसाच्या गजपती राज्यकर्त्यांच्या विजयाच्या स्मरणार्थ राजा कृष्णदेवराय यांनी बांधला होता. इथे शाही प्राण्यांचे कार्यक्रम, युद्ध खेळ, वाद्य प्रदर्शन, जलचर खेळ असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या महानवमी दिब्बा येथे चालत असत ते पहाण्यासाठी राज परिवार, शाही पाहुणे व विदेशी पर्यटकांना बसण्यासाठी २५ फूट उंच व ८० फुट लांबी व रूंदी असलेला भव्य व्यासपीठ होते दूरनच त्याची भव्यता दिसत होती. आम्ही त्या व्यासपीठाजवळ गेलो, दगडावर पशू पक्षी नृत्य अशा अनेक नक्षीकामांनी चोहोबांजूनी सजवलेले व्यासपीठ पाहिले. व्यासपीठाच्या मागच्या बाजूला राजपरिवारासाठी भव्य पाय-या बनविल्या होत्या, त्या पाय-यांचे कठडे त्यावर कोरीव कामांचा अद्भुत नमुना दिसत होता, हत्ती, घोडे, योद्धा, नर्तक, संगीतकार यांचे कोरीव काम फारच सुंदर दिसत होते. पाय-या चढून आम्ही व्यासपीठावर पोहचलो, उंचावरून आजूबाजूचा परिसर सहज दिसत होता, समोरील प्रांगणातील माणस अगदी लहान दिसत होती. मनसोक्त फोटो काढून आम्ही व्यासपीठाच्या शेजारीच असलेल्या ग्रॅनाईटच्या एका ब्लाॅक मधून १२.५ मीटर लांबीच्या कुंडा जवळ पोहचलो हा कुंड नुकताच उत्खनातून उदयास आला होता. त्यातील पाणी कार्यक्रमाला आलेल्या जनतेसाठी वापरत असे, दगडी पाईप लाईनने ते पाणी जिथे जेवणाच्या पंगती बसत असत तिथपर्यंत ही दगडी लाईन गेलेली होती. आम्ही त्या पाईप लाईन कडेने चालत जिथे जेवणाच्या पंगती बसत होत्या तिथपर्यंत पोहचलो. तिथे गेल्यावर दगडी पत्रावळी पाहून थक्कच झालो, हजारो माणस एकावेळेस जेवायला बसतील असे दगडात कोरीव काम केलेल्या ताट वाटीचा मोठा खांब दिसल्या त्याच्या समोरून या दगडी पाईप लाईनने पाणी वहात जाई, जेवताना पाणी पिण्याची ती सोय पाहून ती कल्पना पाहून खरच त्या इतिहासातील कलाकारांना सलाम करावा वाटला. व्यासपीठाच्या मागच्या बाजूला दगडांचा भलामोठा दरवाजा पाहिला, हजारो टन वजनाचा दरवाजा   त्याचे नक्षीकाम नेत्रदीपक होते. अनेक अशी रहस्यमयी ठिकाण पाहून मी संकेत व सुरज नळगुणे पुढच्या रहस्यमयी ठिकाणाकडे निघालो..


संदीप राक्षे✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


Tuesday, 26 January 2021

श्री विठ्ठल मंदिर हंपी

 भारताच्या सुवर्ण वैभवाच्या पाऊलखुणा..

"विजय श्री विठ्ठल मंदिर" हंम्पी कर्नाटक 

संदीप राक्षे ✍🏻


हरिहर आणि बुक्क या दोन महापराक्रमी भावांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना तुंगभद्रा नदीच्या काठी १४ व्या शतकात आपली भव्य दिव्य अशी राजधानीचे निर्माण केले. (विजयनगर म्हणजेच कर्नाटक राज्यातील बेलारी जिल्ह्यातील होस्पेट तालुक्यातील "हंम्पी") त्यानंतर कृष्णदेवराय यांनी अतिशय सुंदर रस्ते, भव्य मंदिरे, धर्मशाळा, किल्ले, कालवे, हस्तीशाळा, घोड्यांचे बाजार, कोरीव कामांची भव्य नगरीचे निर्माण केले. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या सर्व वस्तू या विजयनगरीत मिळत असत, कस्तुरी हिरे मोती माणकं हत्ती घोडे अशा अनेक वस्तूचीं खरेदी विक्री या साम्राज्यात चालत होती. अजिंक्य असणा-या विजयनगर वैभवाचा विद्ध्वंस कुतुबशाह, आदिलशाह, निजामशाह व बरीदशाह यांनी एकत्रित हल्ला करून केला, आज जर पाहिले तर इथे फक्त भग्न अवस्थेतील अवशेष पहायला मिळतात त्यापैकी हे विजय विठ्ठल मंदिर अजून सुअवस्थेत इतिहासाची साक्ष देत आज ते जागतिक वारसा स्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे.


कानडाऊ विठ्ठलु कर्नाटकु येणे मज लावियेला वेधु! 


या अभंगात संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्री विठ्ठलाच्या उत्पतीचा मागोवा घेतला आहे अभंग तर अर्थपुर्ण सुंदर आहेच पण आशयाच्या दृष्टीने ही बहुअर्थसूचक, शब्दांच्या पलीकडे जाऊन येणाऱ्या अनुभुती चं आकलन करुन देणारा आहे. विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय हे सुद्धा सावळ्या, साजिऱ्या श्री विठ्ठलाचे परम भक्त होते. त्यांनीच अद्भुत असे विठ्ठल मंदिर बांधले होते. एके दिवशी कृष्णदेवराय यांना स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला की मला इतके वैभव नको आहे. मी निर्गुण, निराकार, निर्मोही आहे साध्या भाजी भाकरीवर राजी असणारा, साधी धोटी, चिंधोटी लपेटणाऱ्या भक्तांचा आहे. तू मला पंढरपूरला स्थापन कर, तेव्हापासून कर्नाटक मधील विजय श्री विठ्ठल मंदिरात कोणतीही मुर्ती स्थापन केली नाही अशी आख्यायिका आहे.

                     माझा चिरंजीव संकेत व मित्र सुरज नळगुणे आम्ही तिघेजण ५७१ किलोमीटरचा प्रवास करून रविवार दि २४/१/२०२१ रोजी हंम्पीत पोहचलो रात्री मुक्काम करून सकाळीच सुर्य देवाचे दर्शन घेऊन ही अद्भुत नगरी पहाण्यास निघालो सोबत नेहमी प्रमाणे गाईड घेतला आम्ही सर्व प्रथम विजय विठ्ठल मंदिर पहाण्यास निघालो. मुख्य रस्त्यावरच गाडी पार्क केली तेथून एक किलोमीटर पायी चालत विठ्ठल मंदिराजवळ पोहचलो..

भव्य अशी कमान आजूबाजूला दगडी शिल्प कलेची कमाल दिसत होती. मंदिराच्या बाहेरच उजव्या बाजूला एक पुष्करणी आहे त्यात निळेशार पाणी आणि मधोमध कृष्ण मंदीर होते ते पाहून आम्ही मुख्यव्दारा जवळ पोहचलो, भव्य असे व्दार त्यावर सुंदर दगडावर नक्षीकाम केलेले अनेक देव देवतांची शिल्प कोरलेली. तेथून पुढे गेल्यावर श्री विठ्ठल मंदिराच्या समोरच ३० ते ३६  फुट उंचीचा कोरीव काम केलेला, अतिभव्य दगडी रथ उभा केलेला, एकाच दगडातून हा रथ तयार केलेला दिसत होता. बारीक पाहिले तर तो व्यवस्थित सांधलेला दिसत होता. रथाची अजस्त्र दगडी चाक त्यावरील अवर्णनीय कोरीव नक्षीकाम, रथाच्या दोन बाजूस दगडी हत्ती, 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल यांचे मुळ मंदिर हंम्पी येथील विजय विठ्ठल मंदिरच, कारण गरूड रथावरील श्री विठ्ठलाचे कोरीव शिल्प याची साक्ष देते आज तोच दगडी रथ ऐतिहासिक वारसा म्हणून जगप्रसिद्ध आहे. तेथून आम्ही मुख्य मंदिरात शिरलो भव्य मंदिर पाहून डोळे दिपून गेले, सारच अवर्णनीय होते. यासाठी खरच शब्दच नाहीत. आज संपूर्ण महाराष्ट्रात श्री विठ्ठलाची संगीताच्या माध्यमातून भक्ती व आराधना केली जाते तसेच, चौदाव्या शतकातील हंम्पी येथील श्री विठ्ठल मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे या मंदिरात ५६ खांब आहेत ते संगीतस्तंभ म्हणून ओळखले जातात, या स्तंभांना हातांनी वाजविल्या नंतर घट पखवाज या सारख्या तालवाद्यांचा आवाज येतो तसेच समधुर असे सप्तसुर ही या संगीतस्तंभातून वाजतात. प्रत्येक संगीत स्तंभास न वाजवता फक्त हात फिरवला त्यावरील नक्षीकाम डोळ्यांत साठवले व गर्भ मंदिरात गेलो तेथील दृष्य मन सुन्न करणारे होते कारण मुर्ती विना मंदिर अडगळ वाटत होते. गर्भ मंदिराच्या डाव्या बाजुला एक भुयारी बंदिस्त मार्ग दिसला तो प्रदक्षिणा मार्ग होता. संपूर्ण अंधारात मोबाईलच्या लाईनवर चालत राहीलो, प्रचंड गारवा जाणवत होता. खरच आध्यात्माची अनुभूती प्रदक्षिणा घालताना येत होती. उजव्या बाजुला दुसरा भुयारी मार्ग तेथून बाहेर पडलो. सभा मंडपातील कोरीव काम पाहून मंदिराच्या बाहेर पडलो. संपूर्ण मंदिर परिसर पाहिला.. आजूबाजूलाच अतिसुंदर मंदिर पाहिली..

मंदिराला लागूनच कल्याण मंडप आहे ज्याच्या खांबाची गणती करणे कठीण आहे प्रत्येक खांबावर विविध देवता व प्राण्यांची कोरीव अप्रतिम शिल्प, याच मंडपात राजघराण्यातील विवाह संप्पन्न होत असत..

मंदिराच्या मागील बाजूस मोडलेल्या खांबाचा तुटलेल्या मुर्तीचा ढिगारा होता तेथूनच कमलापूर गावाकडे जाण्याचा व्यापारी मार्ग दिसतो, तेथून आम्ही तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर गेलो नदीचे दर्शन घेऊन नदीच्या पाण्याने तोंड हातपाय धुतले उत्साह वर्धक असा निसर्ग पाहून दुस-या स्थळाकडे निघालो...


बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल!

करावा विठ्ठल जीवभाव!!

तुका ह्मणे देह भरिला विठ्ठलें!

कामक्रोधें केलें घर रीतें!!


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१


Sunday, 17 January 2021

मावळातील बऊर गाव

 इतिहासाच्या पाऊलखुणा असलेलं मावळातील बऊर गाव, संदीप राक्षे✍🏻


छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बारा मावळ प्रांत होते त्यात मावळ तालुक्यातील तीन प्रांत होते  १) पवन मावळ २) अंदर मावळ आणि ३) नाणे मावळ, याच पवन मावळातील बऊर हे गाव, मुंबई पुणे एक्स्प्रेसवे च्या शेजारी वसलेलं, कामशेत, पवना धरणाच्या रस्त्यावर, चिखलसे खिडींतून अवघ्या अंतरावर निसर्गाच्या कुशीत असलेलं ऐतिहासिक गाव म्हणजे बऊर हे गाव, फेसबुकवर आशुतोष बापट यांची या गावाविषयी लिहीलेली पोस्ट वाचली अन माझी पाऊले आपोआप या ऐतिहासिक गावातील ऐतिहासिक वास्तू पहाण्यासाठी आपोआपच वळाली.. 

रविवारची सुट्टी, लोणावळ्यातील थोडेसे काम उरकून मी आणि माझा धाकटा चिरंजीव संकेत, आम्ही दोघेही बऊर गावच्या ऐतिहासिक वास्तू पहाण्यासाठी निघालो. चिखलसे खिंडीतून थोडासा घाट उतरून, घाटाच्या पायथ्याला डावीकडून बऊर गावच्या रस्त्याकडे वळालो, एक ते दिड किलोमीटर गेल्यावर गावातील विष्णू मंदिराच्या जवळ पोहचलो, गाडी पार्क केली मंदिरात जाऊन विष्णू लक्ष्मीचे दर्शन घेतले त्याच मंदिराच्या मागे चौकीनी आकाराची ऐतिहासिक विहीर होती ती पहाण्यासाठी आम्ही निघालो खाचरांच्या बांधावरून चालत या विहिरी जवळ पोहोचलो विहिरीतील हिरवे पाणी व त्या विहीरीची दूरवस्था पाहून वाईट वाटले, कारण ऐतिहासिक स्थापत्याचा अद्भुत नमुना साक्षात पहात होतो. या विहिरीत उतरायला पाय-या होत्या, चारी बाजूंनी कोनाडे दिसत होती, समोर मोटेने पाणी काढता यावे यासाठी दगडात उत्कृष्ट बांधकाम केलेले, आज गड किल्ल्यावरील काही ऐतिहासिक वास्तू आपल्याला भग्न अवस्थेत पहायला मिळतात कुठेही अशा चांगल्या अवस्थेतील ऐतिहासिक वास्तू दिसत नाही. परंतू या बऊर गावाती सुअवस्थेतील ही ऐतिहासिक विहीर पाहून आनंदून गेलो होतो. परंतु तिची दूरअवस्था पाहून खरच दु:खी झालो. आजूबाजूला पूर्ण गवतांनी वेढलेली, झाडा झुडपांनी झाकलेली, विहिरीतील पाणी हिरवे केमिकल सारखे दिसत होते. त्यापाण्यात कचरा प्लॅस्टिक खच्चून भरलेले होते. गावचे या वास्तूकडे पूर्ण दुर्लक्ष असल्या सारखे दिसत होते. याच गावात गद्देगळ आहेत, वीरगळ आहेत, ते पण पाहून आम्ही गावच्या मध्यभागी असणा-या चौकोनी तलावा जवळ पोहचलो, भला मोठा तलाव पाहून कोल्हापूरच्या रंकाळा तलावाची आठवण झाली, रंकाळा खूप मोठा तलाव आहे परंतु हा तलाव छोटा  आहे. अष्ट आकाराचा हा तलाव पाहून खरच॔च आश्चर्यचकित झालो. चोहोबांजूनी आठ फुटाच्या भिंती तसेच एका बाजूला तलावात उतरायला पाय-या, तर दुस-या बाजूला भले मोठे जुने बांधकाम त्यावर मोटेची व्यवस्था, तेच बांधकाम दहा ते बारा फूट रुंद व शंभर फूट लांब त्या मधून एक छोटासा दरवाजा तेथून आम्ही तलावाच्या दुस-या बाजूला आलो त्याच बांधकामात एक छोटेसे मंदिर त्यात भगवान शंकराची पिंड, सत्तर ऐंशी फूट उंच दगडी बांधकाम अजून जसच्या तस उभ आहे. तलावाच्या चारी बाजूंनी फेरफटका मारत असताना तलावाच्या एका कडेला एक शिलालेख दिसतो त्यावर बाळाजी कृष्णा ठोसर शके १७१२ हे कोरलेले दिसते, डोळे भरून ही दुर्मिळ वास्तु पाहिली. या तलावाला बामणाचे तळे असे गावकरी म्हणतात. येथील गावकरी या ऐतिहासिक वास्तुबद्दल अनभिज्ञ आहेत हे जाणवले, पहिले या तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करीत असत परंतु दोन तीन माणसांचे बळी गेल्यामुळे या तलावातील पाणी भांडी घासणे, गायी गुरं धुण्यासाठी, शेतीसाठी या पाण्याचा वापर केला जातो. हा तलाव पण इतर वास्तू प्रमाणे दुर्लक्षित आहे. तलाव पाहून याच गावातील अजून दुर्मिळ विहीर पहाण्यासाठी निघालो, तलावा पासून थोड्याच अंतरावर ही विहीर आहे. तिकडे जाताना वाटेतच गावातील एका व्यक्तीने हटकलेच त्याने प्रश्न केला कोणाकडे पाहुणे आलात? मी म्हणालो आम्ही कोणाकडे पाहुणे म्हणून आलो नाही. गावातील या ऐतिहासिक वास्तू पहायला आलो आहे. ते मला म्हणाले विहीरी पहायला आलात होय, मनातल्या मनात हसले अन पुढे निघून गेले. माझ्या मनात पटकन विचार चमकून गेला, नक्कीच तो माणूस आम्हाला वेडे समजला असणार. मी पण मनातल्या मनात हसलो अन पुढे चालू लागलो कच्या रस्त्याच्या कडेलाच झाडा झुडपात झाकलेली दुसरी विहीर दिसली, ही विहीर पण चौकोनी आकाराची परंतु या विहीरीत उतरायला अतिशय सुंदर मार्ग बनविला आहे, थोड्या पाय-या उतरून गेल्यावर एक सुंदर कमान केलेली त्या कमानीवर पण तोच शिलालेख लिहीलेला साक्षात पाहिला.   ही विहीर पाण्याने पूर्ण भरलेली असल्याने आम्हाला जास्त पहाता आली नाही. जेवढी ही वास्तू पहाता आली ते सुद्धा काही कमी नव्हते ३०० वर्षापूर्वी बांधलेल्या या दुर्मिळ वास्तू जशाच्या तशा आज पण पहायला मिळतात हे आपले भाग्य आहे. आजच्या स्थापत्य विभागाने केलेली कामं वर्ष सहा महिने सुध्दा टिकू शकत नाहीत, आपल्या पूर्वजांनी केलेली स्थापत्याची कामं शेकडो वर्षे झाली तरी जशीच्या तशी आपल्याला दिसतात. असा ऐतिहासिक वारसा आपण जतन करायला हवा, गावातील पुढारांनी त्याचं संगोपन करायला हवं तेव्हा कुठं आपल्या पुढच्या पिढीला हा अलौकिक ठेवा पहावयास मिळेल.

मरणासन्न अवस्थेत बऊर गावचा हा ऐतिहासिक ठेवा आज खरच अखेरचा श्वास घेत आहे. तरी मावळातील स्थानिक पुढारी व वृत्तपत्रांना माझी नम्र विनंती आहे हा अनमोल वारसा जतन करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा, आपल्या मावळच्या या अलौकिक वैभवासाठी दुर्गप्रेमी, सामाजिक संस्थांनी, युवकांनी आवाज उठवून स्थानिक पुढा-यांना व सरकारी यंत्रणेला जागे करा ही नम्र विनंती आहे..


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६

८६५७४२४२१

१७/०१/२०२१


Wednesday, 13 January 2021

रामशेज किल्ला, नाशिक

 वज्रदेही रामसेज किल्ला नाशिक...

संदीप राक्षे✍🏻


नाशिक शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या नियुक्तीचे पत्र दयायचे होते म्हणून प्रज्ञा तोरसकर यांच्या घरी मी जिल्हाध्यक्ष किरण सानप, व माझे मित्र सिनेमॅटोग्राफर मारूती तायनाथ असे आम्ही तिघेजण गेलो होतो. निवडीचे पत्र दिले त्यानंतर समीर तोरसकर सर आणि आम्ही तिघेजण गप्पा मारीत बसलो होतो. गप्पांच्या ओघांत मारूती तायनाथ आणि समीर तोरसकर यांचा गड किल्ले हा विषय सुरू होता. तोरसकर सर सांगत होते लाॅकडाऊनच्या काळात नाशिक पासून जवळच असलेला रामशेज किल्ला आमच्या बिल्डिंगच्या टेरेसहून अगदी स्पष्ट दिसायचा त्यांची किल्याच्या विषयीची माहिती ऐकूनच मी रामशेच्या पायथ्याशी पोहचलो असे वाटले, भास झाला होता, तोरसकर परिवाराचा निरोप घेतला..

तसाही आजचा दिवस सार्थकी लावायचा होता असं ठरवून नाशिकपासून जवळच असणा-या रामशेज गडावर चढाई करायचं ठरवले, मला चांदवडला जायचे होते परंतु गाडी रामशेजच्या दिशेने फिरवली. नाशिकहून पेठला जाणाऱ्या रोडने मी व मारूती तायनाथ रामशेजला निघालो. नाशिक ते रामशेज हे १५ कि. मी एवढं अंतर आहे. गडाच्या जवळ येताच रामशेज किल्ला रस्त्याच्या मधोमधच उभा आहे की काय असं वाटलं गडाखालच्या आशेवाडी गावात पोहोचलो तेव्हा दुपारचा एक वाजला होता. गडाच्या पायथ्याशी पोहचलो एका मोकळ्या जागी गाडी उभी करून आम्ही गडाकडे निघालो. गावातून निघून गडाला दूरवर अर्धगोलाकार वळसा घालून आम्ही गडाच्या पश्चिम दिशेला पायथ्याशी आलो. गड तसा फार उंच नव्हता पण रस्ता खूपच खराब होता. किल्यावर चढताना खूपच त्रास झाला पाऊण तासातच गड चढून आम्ही वर पोहोचलो. गडावर प्रवेश करण्या अगोदर उजव्या हाताला डोंगराच्या कडय़ात एक गुहा पाहायला मिळते. गुहेच्या खाली गडावर जाणाऱ्या वाटेला लागूनच रामाचं देऊळ आहे तिथे आम्ही शिरलो, मंदिरातील गारवा व तेथील उर्जेने आमचा शीण कुठच्या कुठ पळून गेला, त्या मंदिरातच एक विभूती बसलेली होती आम्हाला पाहिल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरील भाव बदलले, बेटा पुना से आये हो असे त्यांनी विचारले ? मी होकार दिला रामाचे दर्शन घेऊन त्यांच्या आसना जवळच जाऊन बसलो, सत्तर वर्षाचे वय पण अजूनही मनाचे तारुण्य चेहर्‍यावरील आनंद योगपुरूषाची साक्ष देत होता. बाबांनी आमची विचारपूस केली. त्यांची ओळख सांगितली मै दिगंबर नागा आखाडे का साधू हू हनुमान बाबाजी, पंचवीस वर्षापासून येथे राहतो तसेच माझा नाशिकला हनुमान आश्रम आहे त्याचा मी महंत आहे. इतकी मोठी विभूती अन किल्ल्यावरील मंदिरात आम्ही थोडे विचारात पडलो तेव्हा ते म्हणाले इथे प्रभु रामचंद्र विश्रांती साठी येत असत, तसेच छ शिवाजी महाराज, छ संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा पवित्र पावन किल्ला आहे इथे साधना सहज होते. हनुमान बाबांनी स्कंद पुराणात कलयुगा विषयी लिहीलेल्या चार पाच ओळी आम्हाला ऐकवल्या त्या अशा होत्या लोक पैशाच्या मागे लागतील त्याच्या ताणताणवामुळे अनेक आजार जडून अल्प आयुशी बनतील, लोक भोगवादी बनतील, सत्ता संपत्ती साठी एकाच रक्ताचे भाऊ भावांचे खून करतील, पैशासाठी लोक भ्रष्टाचार करतील, सरकार लोकांकडून कर रूपाने जास्त टॅक्स वसुल करतील, अल्पआयुष्य होतील, कष्टाने संपत्ती मिळवण्यापेक्षा मागच्या दाराने पैसा कसा येईल त्यावर भर देतील, घरचे भोजन करण्यापेक्षा बाहेरील चमचमीत जेवणावर भर देतील, एकमेकांचे अहित कसे होईल असे लोक पाहतील, या कलियुगात योग साधना भक्ती दान धर्म करतील हेच लोक या कलियुगात टिकतील.. अशी अनेक वचनं बाबांनी आम्हाला मराठीत ऐकवली, बाबांच्या सानिध्यात थोडावेळ घालवून देवळातील मारुती, दत्तगुरू, दुर्गामाता यांचे दर्शन घेतले अन तेथून बाहेर पडलो, मंदिराच्या बाहेरच थंडगार पाण्याचं टाकं होत. ते पाणी चेहर्‍यावर मारले थोडे फ्रेश झालो, दहा पायऱ्या चढून तटबंदी फोडून केलेल्या वाटेने आम्ही गडप्रवेश केला. उजव्या हाताला दोन भूमिगत उद्ध्वस्त दालनं पाहण्यास मिळाली बहुतेक ही दारूकोठारं असावीत. एक सोंड गडाच्या उत्तर दिशेस पसरली आहे. या सोंडेच्या दोन्ही हाताला तासलेले कडे आहेत. याच दक्षिण दिशेला गडाचा महादरवाजा दिसतो. दरवाजा अखंड काळय़ा कातळात खोदलेला आहे. दरवाज्यासकट सर्व कातळ कडे तासून काढलेले होते. हा मार्ग सध्या वापरात नाही. कारण दरवाजा मोठमोठय़ा दगडांनी व मातीने गाडला गेला आहे. दरवाजा पाहून आम्ही गडाच्या सर्वोच्च माथ्यावर आलो. पूर्व दिशेच्या कडय़ावर दक्षिणमुखी महिषासूरमíदनीचे छोटे पण सुबक मंदिर आहे. देवळाबाहेर सिमेंटची गोलाकार दिपमाळ आहे. या देवळाच्या बरोबर खाली पूर्व दिशेच्या कडय़ावर गडाचा दुसरा दरवाजा आहे. हा दरवाजाही अप्रतिम आहे. पण याच्या पाय-या तोडून टाकल्या आहेत. तिथून खाली पाहताना भीतीच वाटते. पाय घसरला तर स्वर्गवास झालाच म्हणून समजायचे, या ठिकाणी भन्नाट वारा वाहतो. समोरचा निसर्ग पाहण्यात आणि दूरवर दक्षिणेला, रस्त्याच्या पलिकडून दिसणारा देहेरगड व त्याचे सुळके पाहण्यात गुंग झालो. सध्या देहेरगड भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे. त्यावर रडार यंत्रणा बसवल्यामुळे सर्वसामान्यांना गडावर येण्यास बंदी आहे. रामशेज गडावर पाण्याचे टाकही भरपूर आहेत पण वापरात नसल्यामुळे काही टाक बुजून गेले आहेत. रामशेज गड तसा छोटा आहे. मूर्ती लहान पण किर्ती महान, या म्हणीला साजेसा हा किल्ला आहे. रामशेज किल्याची उंची समुद्रसपाटीपासून ३२०० फूट एवढी आहे. हिंदवी स्वराज्य बुडवण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत उतरला तेव्हा त्याने प्रथम रामशेजला मोहरा केला. याचं कारण म्हणजे औरंगजेबचे वडील शहाजान दख्खन जिंकण्यासाठी दक्षिणेत आला होता तेव्हा त्यानेही पहिल्या झटक्यातच रामशेज जिंकून विजेत्याच्या दिमाखात दख्खनमध्ये प्रवेश केला होता. मात्र हिंदवी स्वराज्य गिळंकृत करण्याचं स्वप्न पहात आलेल्या औरंगजेबाला या रामशेज सारख्या सामान्य गडानं तब्बल साडे सहा वर्षे झुंजवल, छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत. रामशेजगड मोघलांच्या विरूद्ध सतत साडे सहा वर्षे लढत होता. रामसेज जिंकण्यासाठी औरंगजेबाने शहाबुद्दीन गाजीउद्दीन फिरोजजंग याला ३५ ते ४० हजार सैन्य व प्रचंड तोफखाना, दारूगोळयासह पाठवलं होतं. सोबत राजस्थानचा राजा राव बुंदेला, पीरगुलाम, कासीमखान, रामसिंह बुंदेला इत्यादी मातब्बर सरदार होते. रामसेजला मोगलांचा वेढा पडला. रामशेजवरील किल्लेदाराने लढाईची जय्यत तयारी केली होती. मोगलांचे सर्व प्रकारचे आक्रमण तो परतावून लावत होता. मराठे पराक्रमाची शिकस्त करत होते. मे १६८२ मध्ये संभाजी महाराजांनी रामशेजचा मोगलांचा वेढा फोडण्यासाठी रूपाजी भोसले व मानाजी मोरे यांना पाच ते सात हजार मराठे मावळे देऊन रामशेजवर पाठवले. मराठयांचे मावळे येत असलेले पाहून शहाबुद्दीन मराठय़ांना अडवण्यासाठी धावला. गडाजवळच्या गणेश गावापाशी मराठे-मोघल एकमेकांवर तुटून पडले. तुंबळ युद्व सुरू झालं. मराठय़ांसमोर मोघलांनी माघार घेतली. पण त्यांनी रामशेजच्या वेढयावर परिणाम होऊ दिला नाही. मराठयांनी हल्ला केल्याचे समजताच औरंगजेबाने बहादूरखानाला ताबडतोब रामशेजला शहाबुद्दीनच्या मदतीला पाठवलं. शहाबुद्दीनने व बहादूरखानने रामशेजवर जोरदार हल्ला चढवला. पण गडावरच्या मावळ्यांनी जोरदार प्रतिकार करत हल्ला परतवून लावला.

या हल्ल्यात मोघलांकडील राजा दलपतराय जबर जखमी झाला. हल्ला नाकाम झालेला पाहून निराश झालेला शहाबुद्दीन वेढा सोडून जुन्नरला निघून गेला. वेढय़ाची सारी जबाबदारी बहादूरखानावर येऊन पडली. रामशेज जिंकण्यासाठी बहादुरखानाने हर त-हेचे उपाय करून पाहिले. तंत्र मंत्र अघोरी उपाय करून पाहिले. पण रामशेजचा टवका उडत नव्हता. खानाने खूप परिश्रम घेतले पण यश आलं नाही. या अपयशाने रामशेजपुढे होत असलेली दुर्दशा पाहून औरंगजेब भयंकर संतापला. त्याने बहादुरखानाला वेढा उठवण्यास फर्मावलं. मोगलांचा तंबू गुंडाळला गेला. खान वेढा उठवून माघारी निघून गेला. बखरकार काफीखान म्हणतो, रामशेजवर मोगलांच्या अमाप संपत्तीचा चुराडा झाला होता. हजारो माणसे मारली गेली. प्रचंड दारूगोळा नष्ट झाला होता. तरीही औरंगजेब सहजासहजी रामशेजचा नाद सोडण्यास तयार नव्हता. औरंगजेबाने मोघल सैनिकातील शूर व तडफदार सरदार कासिमखान किरमाणी याला रामशेज जिंकण्यासाठी पाठवलं, पण त्यालाही यश आलं नाही.

शेवटी औरंगजेबाने वेढय़ाचे काम तहकूब करून कासिमखानाला दुस-या कामगिरीवर पाठवलं. रामशेजवरील मराठय़ांच्या पराक्रमावर खूश होऊन संभाजी महाराजांनी किल्लेदाराला चिलखती पोशाख, रत्नजडीत कडे व रोख नगद रक्कम पाठवून त्यांचा गौरव केला. रामशेजवरील मराठय़ांच्या पराक्रमाचे वर्णन आपल्याला परकीय साधनामध्येच मिळते. या वेढय़ाच्या वेळी ३० जुलै १६८२ ला कारवारकर इंग्रज सुरतकरांना कळवतात की मराठय़ांचे दहा हजार पायदळ घेऊन हंबीरराव वेढा घालून बसलेल्या सैन्यास पळवुन लावण्यासाठी गेल्याची व नंतर झालेल्या लढाईत जखमी झाल्याचे सांगतात. हंबीरराव व रूपाजी, मानाजीनी शहाबुद्दीनशी दिलेली लढाई एकच का वेगवेगळी हे साधनांच्या अभावी सांगणे कठीण आहे. शेवटी हा अजय गड सन १८१८ मध्ये इंग्रजांनी घेतला. त्रिंबकगड इंग्रजांनी घेतल्याचे पाहून रामशेजवरील लोकांनी हा गड इंग्रजांच्या स्वाधीन केला. यावेळी इंग्रजांना गडावर आठ मोठय़ा तोफा, नऊ लहान तोफा, जंबुरे, २५१ पौंड दारू, तसेच गंधक, चांदी, पितळ, शिसे, ताग, तांबू, गालीचे व एक चिलखत सापडलं. हे चिलखत शिवाजी महाराजांचं होतं, असं कॅप्टन ब्रिज यांनी २० जून १८१८ च्या रिपोर्टमध्ये लिहून ठेवलं आहे. खरतर मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा रामशेज किल्ला खूपच दुर्लक्षित आहे. इतके मोठे इतिहासाचे पान सांगणारा हा किल्ला जीर्ण अवस्थेत उभा आहे. खरतर हे गड किल्ले महाराष्ट्राची शान आहे. ही आपली खरी मंदिर आहेत, इथली उर्जा मंदीरा इतकीच उर्जावान आहे. इतिहासाची इतकी गहन साक्ष देणारा, साक्षात तो किल्ला डोळ्यांनी पहाताना आपण खूप भाग्यवान आहोत हे जाणवले कारण इथला सहवास अनुभवायला मिळाला.. इथे असणारी पराक्रमाची उर्जा आत्म्याला स्पर्श करून जायची कारण तू पण या मातीत जन्माला आलास खरच या जन्मांच सोनं झालं.. आयुष्यात धन संपत्ती पेक्षाही या गड किल्यांच्या सानिध्यातील दिवस खरच खूप श्रीमंत करून जातो.. रामशेज किल्याची माती भाळाला लावून, नतमस्तक झालो.. पुन्हा पुन्हा दर्शन घेऊन परतीचे वाटेला निघालो...


संदीप राक्षे ✍🏻

भोसरी पुणे २६


Tuesday, 12 January 2021

अजिंठा लेणी


 भारताच्या सुवर्ण काळाच्या राजवर्खी खुणा "अजिंठा" बौद्ध लेणी, संदीप राक्षे ✍🏻


सुवर्ण युगाचा वारसा सांगणारा आपला महाराष्ट्र देश, आपल्या या महाराष्ट्र देशात अनेक गूढ व अलौकिक शक्ती लपलेली आहे. जिर्ण झालेले गड किल्ले अजूनही सकारात्मकतेचा उर्जास्त्रोत्र भासतात. या गड किल्यांच्या सहवासातील प्रत्येक क्षण आंतरिक प्रेरणा देऊन जातो. याच महाराष्ट्र देशात काळ्या काताळातील वैभव तर साक्षात पिवळ सोनचं भासते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लेण्या मोठ्या प्रमाणात आढळतात त्यातलीच एक अजिंठा लेणी. औरंगाबाद पासून ९९ किलोमीटर वर असलेली अजिंठा ही लेणी महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारी अप्रतिम अशी शिल्पकला व  भित्ती चित्रांची अनोखी कलाकृती होय. मी व माझे मित्र सिनेमॅटोग्राफर मारूती तायनाथ जळगावला एका कामानिमित्त गेलो असताना पुन्हा एकदा अजिंठा लेणी डोळे भरून पहायची अशी इच्छा झाली. मग काय संपूर्ण नादुरुस्त असलेल्या रस्त्यावरून आमचा प्रवास सुरू झाला. वीस तीस च्या स्पीडने रात्री दहा वाजता आम्ही अजिंठ्याला पोहचलो, रूम केली तिथे मुक्काम केला. सकाळी नऊ वाजता आमचा दिवस सुरू झाला.

कोरीव शिल्पकलेचा व चित्रकलेचा अद्भुत नमुना या अजिंठा लेण्यात पहायला मिळतो..

आज ही अद्भुत कला आम्ही आमच्या डोळ्यांनी पुन्हा एकदा पाहणार होतो. औरंगाबाद जळगाव रोडच्या कडेलाच लेण्यांकडे जाणारा मार्ग लागतो.  शासनाच्या वतीने इथे वाहनांची सोय केलेली आहे. अजिंठा लेणीकडे आपल्या स्वताची वाहने घेऊन जाण्यास मनाई आहे म्हणून आम्ही पाच किलोमीटर दूरच गाडी पार्क केली आणि जिथे बस सुविधा उपलब्ध केलेली आहे तिथे गेलो. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तसेच औरंगाबाद कडून येणा-या खराब रस्त्यामुळे पर्यटकांची संख्या नगण्य होती. पाच सहा जण वातानुकूलित बस मधे बसून आम्ही अजिंठ्याकडे निघालो. आजूबाजूला घनदाट जंगल, पाखरांचा किलबिलाट, उंच उंच कातळ कडे मनाला सुखावत होते. वेडी वाकडी वळणे घेत बस अजिंठ्याच्या पायथ्याशी आली. गाडीतून उतरून आम्ही लेणीच्या प्रवेशद्वाराजवळ आलो थर्मामीटरने आम्हाला चेक केले त्यानंतर आम्हाला प्रवेश दिला. सत्तर ऐंशी खड्या पाय-या चढून आम्ही अजिंठा लेणीच्या प्रथम क्रमांकाच्या लेणीजवळ पोहचलो..


राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा 

प्रणाम माझा हा श्री महाराष्ट्र देशा..

अजिंठा लेणीचे कातळ शिल्प पाहिल्यावर सहजच कवी गोविंदग्रजांच्या या ओळी आठवल्या..


             "वाकाटक नृपती आणि त्यांचा काल" या ग्रंथात असे वाचनास येते की वाकाटकांचे साम्राज्य नर्मदेपासून ते तुंगभद्रे पर्यंत तर इकडे अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत होते. सातवाहनानंतर इ.स २५० मध्ये वाकाटकांचा उदय झाला त्यांनी इ स ५५० पर्यंत या प्रदेशावर राज्य केले. वाकाटक घराण्याची सुवर्णयुग म्हणून ख्याती होती. धर्म संस्कती कला शिल्प कला स्थापत्य कला चित्रकला यांना सुकाळ होता. वाकाटक हे घराणे बौद्धउपासक, शिवोपासक आणि विष्णुउपासक होते. भारतीय संस्कृतीचा प्रसार इतर देशात झाला, भारताची किर्ती दिगतांत गेली याचा आधार म्हणजे वाकाटकांनी कोरलेली अजिंठा लेणी..

 स्वातंत्र्य पूर्व काळात या लेण्या दुर्लक्षित होत्या त्या १८३९ साली इंग्रज अधिकारी जाॅन स्मिथ यांनी प्रथम अजिंठा लेणीचा शोध लावला. कोरीव कामांचा व चित्रकलेचा अद्भुत नमुना या अजिंठा लेण्यात पहायला मिळतो. आज ही अद्भुत कला आम्ही आमच्या डोळ्यांनी पुन्हा एकदा पाहणार होतो.

                      पहिल्या लेणीत प्रवेश केल्यावर वीस खांबावर आधारित एक दालन दिसले प्रत्येक खांबावर सुंदर नक्षीकाम केले होते. तसेच गौतम बुद्धांच्या जन्माचे चित्रदर्शन साकारले होते. मध्यभागी गौतम बुद्धांची विशालकाय तपस्या अवस्थेतील कमलपुष्प हातात असलेली मुर्ती होती. राजा नागराज,  दरबार, गौतम बुद्धाच्या विविध पेटींग मन आकर्षून घेत होत्या. छतावर मनमोहक डिझाईन दिसत होत्या त्या आता पैठणी साडीवर तसेच हिमरू शालीवर आपल्याला दिसतात. इथेच अवालोकितेश्वराची सुवर्ण मुर्ती पहायला मिळाली अशा अनेक अद्भुत चित्रकला पाहून आम्ही दुस-या क्रमांकाच्या लेणीत शिरलो. समोरच बुद्धांच्या मुर्तीचे शिल्प व हंस जन्म कथा बुद्धांचे स्वप्न कथा, बुद्धांच्या माता पित्यावरील कथा चित्रीत केलेल्या पाहिल्या. ही सर्व चित्रांची पेटिंग धातुमिश्रीत माती घेऊन त्यात डोंगरातील दगडाचे बारीक कण, वनस्पती पदार्थाचे तंतू, तांदळाचा भुसा, गवत व वाळुचा भिंतींवर किंवा छतावर लेप दिला जायचा त्यानंतर लिंबू पाण्याने धुतल्यानंतर पेंटींग करायचे विविध रंग असेच तयार करीत, प्रत्येक लेणीचे निरिक्षण परिक्षण करीत एक एक लेणी पहात होतो. अद्भुत शिल्प कलेचा व विविध मुर्तीशिल्पाचा अविष्कार पहात होतो. बौद्ध धर्मातील हिनयान व माहियान हे दोन पंथ, हिनयान पंथात अस्थिकलश पुजा करण्याची पद्धत आहे व माहियान पंथात मुर्ती पुजा करण्याची पद्धत आहे त्या प्रमाणे या बौद्ध लेण्या पहाताना हा फरक स्पष्टपणे जानवतो, या लेण्यांच्या मधे बुद्ध भिक्षुकांची साधना करण्याची पद्धत पण वेगळी होती कोणी जमिनीवर बसून तर कोणी कातळात कोरलेल्या दगडावर बसून साधना करीत असतं. ३,४,५,६,७,८,९, अशा लेण्या पाहून झाल्यानंतर १० व्या लेणी मधे हिनयान मंदीर होते. ज्यात जवळपास ४० खांब  त्यावरील दर्जेदार कोरीव काम आकर्षित करते, तिथे एक स्तूप आहे त्यावर पाली भाषेतले लेख दिसतात ११ ते १५ या लेण्यांच्या मधे अर्धवट शिल्पकाम दिसते ते पाहून आम्ही सोळाव्या लेणी जवळ पोहचलो या लेणीत बुद्धांच्या जीवनातील अनेक घटनांची भित्तीचित्र दिसतात. मध्य भागी बुद्धांची मुर्ती परलम्बां मुद्रेत ध्यानस्त दिसते. हत्ती घोडे मगर तसेच छतावर सुंदर चित्रकला दिसते. याच लेणीतील एक थ्री डी चित्र लक्ष वेधून घेते त्यात बुद्धांची आई आपल्या पतीस स्वप्न सांगत आहे व ज्योतीषी त्याचा अर्थ सांगत आहे. या तिघांच्या सोबतच स्वप्नांचे चित्रिकरण, त्याची रंगसंगती मंद उजेडात उठून दिसत होती. 

ते पाहून आम्ही १७ व्या लेणीत शिरलो  या लेणीत अनेक जातक कथा कोरलेल्या दिसल्या पुजा स्थानात वेगळ्याच मुद्रेत गौतम बुद्धांची मुर्ती बाजूला वाकाटक वंशातील राजा हरिसेनची सुंदर पेंटींग त्यांच्या सोबत मंत्री वरहादेव यांच्या हातात दिवा ते गौतम बुद्धांना ओवाळत आहेत असे चित्र हे चित्राचा भावार्थ असा की अखंड जगास गौतम बुद्धांचे विचार प्रकाशमान करतील. येथील छत तर खुपच सुंदर पेंटींग केलेले दिसते. जणू काही लग्न मंडपाच्या वरती झालर व कपडा लावलेला. छतावरून आठवण झाली. बहुतेक लेण्यांच्या छतावर नक्षीदार पेटींग केलेली दिसते त्यामुळे छताकडे सहजच लक्ष जाते पण काही छतांकडे काहीच नसल्याने लक्ष जात नाही पण तिथेही काही ना काही असते हे आपल्या लक्षात येत नाही अशाच एका लेणीत शिरलो वर छताकडे पाहिले तर तर छतावर समुद्र किनारा कोरलेला दिसला असंख्य लाटा समुद्र किनाऱ्यावरील वाळू समुद्रातच एक खडक व एक डाॅल्फीन माशाचा आकार कोरलेला दिसला अन आश्चर्यचकित झालो आजूबाजूला सहज कोरता येते पण चक्क छतावर कोरलेले ही समुद्र शिल्प दर्शन खरच मनाला भावले. प्रत्येक लेणीची अप्रतिम वेगवेगळी शिल्पकृती, चित्रकृती पाहून आम्ही २६ व्या लेणीत शिरलो या लेणीत गौतम बुद्धांची चोहोबाजूंनी मुर्ती कोरलेल्या अन एका कोपर्‍यात गौतम बुद्धांचे महापरी निर्वाण झालेली भव्य मुर्ती पाहिली अन मन हेलावून गेले. मुर्तीच्या खाली शोकाकुल बसलेला जनसमुदाय तर मुर्तीच्या वर्ती देवलोक हार पुष्प घेऊन आनंदी मुद्रेतील ही शिल्प खुपच बोलकी वाटली मनोभावे या मुर्तीचे दर्शन घेतले, आज या अजिंठा लेणीत जिकडे तिकडे गौतम बुद्धच दिसत होते त्यामुळे काही काळ का होईना बुद्ध काळात असल्याचे समाधान आनंद सुख- शांती मिळाली होती. खरतर भारतात गौतम बुद्धाचे विचारांचे आचरण करायला हवं. मी थायलंड गेलो होतो तेव्हा खरच गौतम बुद्धांची विश्वख्याती त्यांच्या विचारांची महती उमगली, तुज आहे तुज पाशी परी जागा चुकलासी अशीगत आपल्या भारतीयांची आहे. अजिंठा लेणीच्या प्रवासाचा सुखद अनुभव तनामनात साठवला आणि पुढच्या प्रवासाचा मार्ग शोधला..


संदीप राक्षे ✍🏻 

भोसरी पुणे २६

८६५७४२१४२१

७/१/२००२१

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...