Wednesday, 22 January 2020

सोनलपाडा धरण, कर्जत


जेथे मिळे धरेला,आभाळ वाकलेले
अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले
जेथे खुळया ढगांनी जेथे खुळया ढगांनी
रंगीन साज ल्यावा माझ्या मनातला का
तेथे असेल रावा ही वाट दूर जाते…

खोपोली कडून कर्जत कडे टर्न घेतला आणी या सदाबहार गाण्याची आठवण झाली. पं कल्याणजी गायकवाड महागायक कौस्तुभ गायकवाड व कैवल्य गायकवाड आम्ही तिघेजण दुसरे महागायक वैभव थोरवे यांच्या स्वप्नातील गावाकडे निघालो होतो..निसर्गाचे अप्रतिम स्वरूप निर्मळ डोंगर दऱ्या पाठीमागे टाकीत आमचा प्रवास पुढे सुरू होता...अखेर महागायक वैभव थोरवे यांच्या माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या देऊळगाव या गावी पोहचलो तेथुन वैभव थोरवे यांना घेऊन सोनलपाडा धरण पहाण्यासाठी निघालो.. देऊळवाडी पासुन पंचवीस किलोमीटर अंतरावर हे धरण होते.. तिघांचे आता चौघे झालो होतो..जाताना वाटेत लागणाऱ्या निसर्ग रम्य ठिकाणांची माहिती घेत घेत आमचा प्रवास सुरू होता..पेठचा किल्ला,ढाकचा बहिरी, टाटा पॉवर आम्हाला जातानाच हि प्रेक्षणीय स्थळे खुणावत होती..गिलोयच्या वेलींचा जथा प्रत्येक झाडाला लपेटलेला खाण्याच्या पानांसारखा भासत होता. हिरवा साज नेसलेली वनराई एखादया नववधू सारखी सजली होती जणु आमच्या स्वागतासाठीच उभी होती. एरवी काळे ठिक्कूर दिसणाऱ्या सागाच्या झाडाने कात टाकली होती. रस्त्याच्या कडेने मोठ मोठे फार्म हाऊस दिसत होते,ज्याची जशी ऐपत तसे सजविलेले मनात एक स्वप्न निर्माण करीत होती आपलाही असा एखादा असावा मनसोक्त या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पण स्वप्न ही स्वप्नच असतात..असा हा संगीत सम्राटांच्या समवेतचा हा प्रवास अखेर सोनलपाडा या धरणा जवळ येवुन थांबला. सगळे जण गाडीतुन उतरलो गाडीचे सारथ्य कौस्तुभ करीत होता..उतरता उतरता धरणाच्या सरळ रांगेत डोंगरावर एक वेगळीच आकृती लक्ष वेधून घेत होती नीट निरीक्षण केले तर डोंगराच्या कड्याचा एक भाग महादेवाच्या पिंडी सारखा दिसत होता त्याच पिंडी समोर नंदी पण दिसत होता. खरच चराचरात देव निसर्गात कसा चैतन्यमयी देव वसला आहे याचे जीवंत उदाहरण साक्षात दिसत होते. सर्वांनी हात जोडले... वैभवने सांगितले तो भीमाशंकर चा डोंगर आहे. इतक्या वेळ निसर्गाचा चमत्कार समजणारे आम्ही आता साक्षातच भीमाशंकरच दर्शन देत आहे असे वाटु लागले. चहूबाजुने भले मोठे डोंगर आणी त्यावरून पडणारे पाणी (धबधबे)आवाज करीतच धरणात पडत होते. काही धबधबे हवेच्या मा-याने पुन्हा उलटे जात होते ते साक्षात शंकर भगवानांच्या जटे सारखे दिसत होते... निसर्गाचा हा रूद्र अवतार पहाताना मन भेदरून जात होते.. निळेशार पाणी,हिरवे डोंगर,निळे आकाश याचे प्रतिबिंब धरणाच्या पाण्यात आपोआप सप्तरंगाची उधळण करीत होते. हे नयनरम्य दृष्य मनाला चैतन्य देत होते..धरणाच्या जवळ गेलो तर खुप पर्यटक पाण्यात पोहत होती... धरणाच्या थोडे खाली छाती इतके पाणी असेल असे चोहोबाजुने बांधकाम केलेले आणी त्या मधे आलेले पर्यटक भिजण्याचा आनंद घेत होते.. माझे मन काही स्वस्थ बसु देईना खुप दिवसांच्या पासुन स्विमिंग बंद आहे..त्यामुळे शरीर जड पडलेले जरा मोकळे करावे म्हणून कपडे काढली आणी पाण्यात उतरलो मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतला माझ्या सोबत कल्याणजींचा छोटा कैवल्य उतरला होता... आम्हा दोघांना पोहण्याचा आनंद घेताना पाहुन गुरूजींना ही मोह आवरेना ते पण पाण्यात उतरले, खुप वर्षांनी पाण्यात पोहण्याचा आनंद गुरूजी सुद्धा मनसोक्त घेऊ लागले.. धरणातून ओव्हरफुल झालेले पाणी ते धबधब्याच्या रूपात, डोंगर द-यातुन, झाडा वेलीतुन,मातीच्या गंधातुन, पाणी सरळ धरणात पडत होते तेच पाणी आमच्या शरीरावर पडत होते. तिघांनीही खुप आनंद लुटला,आता सुर्य मावळतीला चालल्याने उजेड कमी होत चालला होता..एरवी गार असणारे पाणी गरम वाटत होते त्यामुळे बाहेर निघावेसे वाटेना पण आता सायंकाळ झाली होती..तिघेही बाहेर आलो, काळोख दाटत चालला तसतसे दुधी धबधबे अजुन ठळक दिसत होते.. फोटो शेषण झाले पुन्हा एकदा त्या भीमाशंकराचे दर्शन घेतले आणी परतीचा प्रवास सुरू झाला थोडे अंतरावर आलो पुर्ण अंधार पडला होता. निरव शांतता आणी रात किड्यांचा आवाज फक्त येत होता.. कुठूनतरी दुरवरून कोल्हेकुई ऐकू येत होती. अचानक एका ठिकाणी कौस्तुभ ने गाडी थांबवली इतक्या जंगलात अचानक गाडी थांबली थोडे छातीत धस्स झाले..पण मागे पहा कौस्तुभने सांगितले? तर काय चमत्कार एका झाडावर असंख्य काजवे चमकत होते. निरनिराळे आकार दिसत होते आम्ही गाडीतुन खाली उतरलो तर खरच जिकडे पहावे तिकडे काजवेच दिसत होते.पहाता पहाताच कौस्तुभ "मनमंदिरा तेजाने" हे शंकर महादेवन यांचे गाणे गाऊ लागला.दुग्धशर्करा योगच,निसर्ग आणी संगीताचे अनोखे नाते आज मी स्वता अनुभवत होतो. खरच हा निसर्ग प्रवास संगीतमय साथ अशीच आयुष्यभर हदयात घर करून राहील.....

लेखन: -संदिप राक्षे

पेमगिरी किल्ला(भीमगड)

इतिहासाच्या अस्पष्ट पाऊलखुणा (१)
शहाजी राजे यांनी स्वराज्याची स्वप्न ज्या किल्यावरून पाहिली तो पेमगिरी किल्ला उर्फ भीमगड उर्फ शाहगड.

इतिहासाच्या पुन्हा
खुणावतात पाऊलखुणा!
अस्पष्ट झाल्या तरी
स्पष्ट जाणवतात मना!

डाॅ अमोल कोल्हे सरांनी अस्पष्ट असलेला इतिहास आज स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून संपूर्ण भारतदेशाला स्पष्ट करून दाखविला आहे. आज आपण पवित्र अशा शिवशंभूच्या महाराष्ट्र भूमीत जन्माला आलो हेच भाग्य थोर, म्हणूनच पुन्हा इतिहासाकडे एक एक पाऊल ओढत आहे.
सुट्टी असल्यावर मन काही स्वस्थ बसू देत नाही. आता मनालाही सवय लागली त्याच्या गुणधर्माप्रमाणे भटकायची, मनसोक्त हुंदडायची, निसर्गात रमायची, गड दगड मातीशी मैत्री करण्याची, त्यांच्या कडून इतिहास ऐकण्याची.
आयुष्यात निर्व्यसनी राहण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्यात यशस्वी झालो पण भटकंतीच्या या व्यसनाने पछाडलेच. चार पाच दिवस अगोदरच पेमगिरीची आठवण झाली होती या वेळी नक्कीच जायचे ठरविले
नाशिकला एक महत्त्वाचे लग्न होते पण ते रात्री उशीरा सात वाजता होते. मी तर सकाळी नऊ वाजताच घरातून बाहेर पडलो होतो. आज सोबतीला कोणीच नव्हते, पेमगिरी सारखी डोळ्यासमोर दिसायची, मनात विचार यायचा आपण तर एकटेच चाललो आहोत उगीच कशाला जोखीम घ्यायची. गाडी चालवत असतानाच दोन मनांचे भयंकर व्दंद सुरू झाले होते. कोणीच माघार घेत नव्हते. गाडीचे टायर सुद्धा उगाळलेले होते त्यातील तारा सुद्धा दिसत होत्या. नको जायला असे सांगणारे मन नवनवीन संकट पुढे करीत होतं. पण काही झाले तरी जायचेच, कितीही संकट आली तरी तू स्वता खंबीर आहेस या सर्व परस्थितीला नक्कीच सामोरा जाशील हे सांगणा-या मनाचे मी ऐकले आणि निश्चय केला.
नाशिक पुणे हायवे लगतच दौलत हाॅटेल आहे तिथे नास्ता करायला थांबलो. मोबाईलच्या मॅप या अॅपसवर पेमगिरी सर्च केले पन्नास किलोमीटरचे अंतर दाखविले तेथूनच आमचे मित्र थोरात सर व अनिल गडाख यांना या स्थळाची रितसर माहिती मिळवली.
संगमनेरच्या अलिकडे खांडगावहून डावीकडे वळण घेतले. हायवे पासून पेमगिरी बावीस किलोमीटरच्या अंतरावर होते. रस्ता थोडा खराब असल्याने मनात धाकधुकी होती. आजूबाजूचा हिरवा परिसर पाहून, प्रवरा नदीचा प्रवाह पाहून मन आनंदी होत होते.
जस जसे अंतर कापत होतो तशा सह्याद्रीच्या डोंगररांगा स्पष्ट दिसत होत्या, पुसट, गडद दिसणा-या सह्याद्रीचा रांगा पाहिल्या की निधड्या छातीच्या मावळ्यांचा इतिहास आठवतो. या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळलेला मावळी गडी दिसतो. उन, पाऊस, वादळ, वारा युगे न युगे अंगावर झेलून सुद्धा त्याच तडफेने उभ्या असलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा या महाराष्ट्राचे खरे वैभवच दिसते.

एकट्याने चालताना सोसती जे यातना
चालत्या त्या पावलांसाठीच माझी प्रार्थना!

बंधने तोडून ज्यांनी मार्ग हा चोखाळला
हा यशाचा सूर्य त्यांच्या कल्पनेला भाळला!

वाकले अस्मान आहे या क्षितीजाच्या पुढे
चालतो जो जो पुढे हा मार्ग त्याला सापडे!

संत कोणी होत नाही यातनांना टाळुनी
लोभ त्यांनी टाकले ध्येयापुढे ओवाळुनी!

कष्टदायी वाट आहे पर्वतांना घाट आहे
या किनारे शोधणारी सोबतीला लाट आहे!

कवी गजानन मुळे यांच्या या कवितेच्या ओळी आठवतच पेमगिरीला पोहचलो होतो. खरतर मी आलो होतो येथील विराट असा महावटवृक्ष पहायला पण जवळच पेमगिरी गड आहे कळले आणि पहिला मोर्चा गडाकडे वळविला. कारण पुढचा पायी प्रवास एकट्याचा होता आणि पेमगिरी गड चढायचा होता. या कवितांच्या ओळींनी मनाला काहीसे बळ दिले होते. गडाच्या पायथ्याला पेमगिरी हे गाव वसलेले शंभर दोनशे घरांचा उंबरा असलेले गाव, तेथे एका टपरी वाल्याला गडाकडे जाण्याचा मार्ग विचारला, गाडीत मला एकट्याला पाहून तो जरा माझ्याकडे विचित्र नजरेनेच पहात होता. नक्कीच त्याच्या मनात एकच विचार आला असणार "खरच हा खूप वेडा माणूस दिसतो आहे" हे मी जाणले मी पण थोडा हसलो. त्याने हातानेच इशारा करून मला सांगितले या रोडने सरळ गडावर गाडी जाते. मी थोड्या अंतरावर गेलो अन मनात विचार आला आपण जर गडावर गाडी घेऊन गेलो आणि टायर ने दगा दिला तर ? गाडी तिथेच एका झाडाखाली लावली अन पायी गडावर जायचे ठरविले.
नास्ता चहा पाणी झाल्याने शरीर उत्साही होते. अवघड चढण पार करता करता दम लागत होता. ऊन असूनही कडक पणा न जाणवता वातावरणातील थंडीचा प्रवाह अधिक जाणवत होता. गुलाबी हवा शरिराला गारवा प्रदान करीत होती. गाडी रोडने चढाई केल्याने थकवा जाणवला नाही. पण अंतर खुप वाढले होते. अखेर गडावर पोहोचलो, मंदिरात जाऊन ज्या देवीच्या नावावरून पेमगिरी नाव पडले त्या पेमादेवीचे मनोभावे दर्शन घेतले. गडावर काहीच नव्हते. तटबंदीच्या खुणा तेवढ्या दिसत होत्या. काही ठिकाणी पाण्याचे टाके दिसत होते. पेमगिरी च्या इतिहासाबद्दल काहीच माहीत नव्हते, गडावर चिटपाखरूही दिसत नव्हते शक्य तितका गडावरचा परिसर पाहिला आणि गडाच्या दुस-या बाजूने उतरायला सुरुवात केली. तहानेने घशाला कोरड पडली होती. खाली उतरताना दूरूनच पायथ्याशी लाकडी वाड्याची प्रतिकृती दिसत होती. काहितरी ऐतिहासिक असणार म्हणून मी त्या वाड्याकडे गेलो तर ते मारूतीरायाचे मंदीर होते. पण ते बाहेरून एखाद्या सरदाराच्या वाड्यासारखे दिसत होते. बाहेरून कुलूप असल्याने आत मधे जाता आले नाही. तिथेच एका झाडाखाली बसलो होतो. माझ्या शेजारीच साधारण साठीच्या घरात असणारे गृहस्थ बसले होते. त्यांनी मला विचारले कोठून आलात? मी सांगितले भोसरी पुणे येथून. एकटेच का? मी हो म्हणालो, जरा गावचा आणि गडाचा इतिहास विचारावा म्हणून त्या दादांना बोलते केले. पहिल्यांदा त्यांनी मला वरवर उत्तर दिली. पण नंतर ते इतिहास सांगू लागले.
हा पेमगिरीचा किल्ला हा भीमगड व शाहगड या नावाने इतिहासात ओळखला जातो. इ.स. २०० मध्ये यादव राजांनी बांधला होता. मुघल सम्राट शाहजहान आणि विजापुराची आदिलशाही या दोन सत्तांनी १७ जुन १६६३ रोजी निजामशाही बुडविली. शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मुर्तिजा निजाम याला जीवधनच्या कैदेतून सोडवुन याच पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणुन घोषित केले."शहाजीराज्यांनी याच किल्यावर सर्वप्रथम स्वराज्याचे स्वप्न पाहिले व तसा तीन वर्षे कारभारही केला. हे वाक्य ऐकले आणि आपण ज्या गडावरून जाऊन आलो तिथे स्वराज्याच्या संकल्पनेचे बीज रोवले गेले याचा माझा मलाच अभिमान वाटला. अनभिज्ञ असलेल्या इतिहासाची माहिती पायथ्याशी आल्यावर मिळत आहे याचे सर्वात मोठे दु:ख झाले. दादा पुढील इतिहास सांगत होते. १७३८ ते १७४० या दरम्यान पहिला बाजीराव पेशवे व मस्तानी यांचे वास्तव्य सुद्धा याच शाहगडावर होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी १६४२ साली बांधलेली बारव म्हणजे विहीर जवळच आहे ती पण पहा, थोडक्यात हा इतिहास ऐकून या गडावर पुन्हा चढून जावं अस वाटत होते. इतक्या घडामोडी या गडावर घडल्या हे ऐकूनच आश्चर्याचा धक्काच बसला. या गडाचा इतिहास सांगितल्यावर त्यांनी आशिया खंडातील सर्वात मोठा वटवृक्ष येथूनच दिड किलोमीटरवर आहे असे सांगितले पण जाण्यापूर्वी त्या वडाच्या विषयी थोडी माहिती सांगाल का अशी विनंती केली.
जिथे हा महाकाय वटवृक्ष आहे त्या भागाला मोरदरा असे म्हणतात. कित्येक शतके हा वड वादळ- वा-याला नैसर्गिक आपत्तींना तोंड देत तो तेथे खंबीरपणे उभा आहे. सुमारे दीड ते दोन एकरावर हा महाकाय वृक्ष पसरलेला आहे. त्याच्या मुख्य खोडाचा घेर ५८ फूट आहे. त्याच्या एकूण पारंब्या ९० च्या जवळपास आहेत. झाडाचा उत्तर-दक्षिण व्यास ३०० फूटांपर्यंत तर पूर्व-पश्चिम व्यास २८० फूट इतका मोठा आहे. हा वटवृक्ष पहाण्यासाठी परदेशातून पण अनेक पर्यटक येतात. या वडाच्या झाडाखाली भिल्ल-रामोशांची 'जाखाई-जाकमतबाबा' ही दैवते आहेत. या दैवतांची दंतकथाही फार मोठी रोमांचकारी आहे. आता कथा ऐकत बसलो तर पुढे नाशिकला जाणे होणार नाही, म्हणून दादांचे आभार मानले. निरोप घेतला, आज खरच त्यांच्या मुळे खूप मोठी माहिती मला मिळाली होती. जाता जाता सहज मी त्यांना त्यांचे नाव विचारले? ते म्हणाले मी बबन कानवडे येथून जवळच माझे गाव आहे, मी रिटायर्ड शिक्षक आहे. तरी मी पण विचार करीत होतो. यांना इतका इतिहास कसा माहीती. पुन्हा एकदा त्यांचा निरोप घेतला आणि जवळ असणा-या मोरद-याचे दिशेने निघालो.

उभा महाकाय वटवृक्ष
देतसे इतिहासाची साक्ष!
पाहून त्याचे विराट रूप
भासे मायेचा तो कक्ष!

महाकाय वटवृक्षाला पाहून सहजच माझ्या मुखातून हे शब्द बाहेर पडले.
या वडाला पाहूनच माझी नजर फिरू लागली. नीरव शांतता, या झाडावरील पक्षांचा किलबिलाट जणू काही येथे जत्राच भरलेली. आजूबाजूला कोणीच नव्हते मी एकटाच त्या भल्या मोठ्या वडाच्या सानिध्यात उभा होतो. जिकडे पहावे तिकडे त्या वडाच्या पारंब्या त्याच पारब्यांचे झालेले झाड पाहून हा निसर्गाचा चमत्कारच वाटत होता. वडाला आयुर्वेदात मोठे स्थान आहे. वडाच्या झाडाच्या जवळ पास ऑक्सीजनचे प्रमाण खूप जास्त असते, त्याच मुळे ज्यावेळी मी दुरून हे झाड पाहिले, तेव्हा त्या वडाच्या झाडाच्या भोवतीने निळाईची झालर पसरलेली दिसत होती. एकटा असल्याने नको त्या विचारांनी मनात थैमान घातले होते. वडाच्या झाडाच्या बुंध्याजवळ आलो तिथे सिंदूर लावलेल्या काही मुर्ती दिसत होत्या. येथील लोकांचे श्रद्धास्थान म्हणून मी पण दर्शन घेतले आणि परतीच्या प्रवासाला निघालो...

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

नांदुर मधमेश्वर पक्षीतिर्थ

नांदूर मध्यमेश्वर पक्षीतिर्थ
विहंगाची भरते मांदियाळी!
विदेशी पक्ष्यांचा कुंभमेळा
भरतो इथे हेमंताच्या वेळी!

भटकंती मधे अनेक गड किल्ले, तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळ पाहिली पण इच्छा होती ती काहीतरी आगळ वेगळं पाहण्याची जे कधी पाहिले नाही, अनुभवले नाही अशा चमत्कारीत स्थळाची! "पक्षीतीर्थ" हे नाव वाचनात अनेक वेळा आलेले पण त्याचा उलगडा होत नव्हता.
फेसबुकला मुकूंद थोरात सरांची नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य ही पोस्ट पाहिली आणि डोक्यात ट्यूब पेटली, हेच ते पक्षीतीर्थ जे मला पहायचं होतं. सरांना मी फोन लावला हे पक्षी अभयारण्य कुठे आहे? सरांनी सांगितले नाशिक जिल्ह्यात, निफाड तालुक्यात सिन्नर जवळच नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य आहे तुम्ही नक्कीच जा. काखेत कळसा आणि गावाला वळसा तसेच माझे पण झाले, कारण आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते अनिलजी गडाख सर याच परिसरातील मांजरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गडाख सरांना मी फोन केला सर मी येत आहे तुमच्या कडे, सरांनी काहीच न विचारता नक्कीच या असे म्हणाले. सकाळीच दहा वाजता दुसरे मित्र गजाननदादा साप्ते यांना सोबत घेतले आणि भोसरीहून निघालो. निवांत प्रवास असल्याने सायंकाळी सहा वाजता मांजरगाव ता. निफाड येथे पोहचलो गडाख सर आमच्या स्वागतासाठी मेन रोडवरच येऊन उभे होते.
चहापाणी झाला सरांनी विचारले आज आमच्याकडे भटकंती, पण तुम्ही आलात छान वाटले, सरांना मी सांगितले आज आम्ही पक्षी अभयारण्य पहाण्यासाठी आलो आहोत. सरांनी क्षणाचाही विचार न करता त्यांचे मांजरगावातील मित्र चेअरमन सुभाषराव नागरे यांना फोन केला ते पण पाचच मिनिटांत आले. गडाख सरांनी आमची ओळख करून दिली. सुभाषराव नागरे यांनी निसर्ग निर्वचन केंद्र खानगाव थडी येथे फोन केला आणि सांगितले पुण्यावरून आमचे मित्र आले आहेत गेस्ट हाऊस मधील एक रूम बुक करा. आम्ही सर्वजण खानगाव थडी कडे निघालो.
निसर्गाच्या सानिध्यात, गोदावरीच्या तटी हे निर्वचन केंद्र असल्याने वातावरण खुपच छान होते. रात्री जेवणाचा बेत सुभाषराव नागरे व अनिलजी गडाख सरांनी खुपच चविष्ट केला होता, यथेच्छ भोजन झाले. एकमेकांना निरोप दिला आणि आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी आलो.
उदया वेगवेगळ्या पक्ष्यांच्या दुनियेत जायचे असल्याने लवकरच झोपलो.
जाग आली ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने, प्रातःविधी उरकला, नास्त्याची व्यवस्था सुभाषरावांच्या घरी होती.
मांजरगाव हून आम्हाला चापडगाव पक्षी निरीक्षण मनो-याकडे जायचे होते. सकाळचे आठ वाजले होते. थंडीचे दिवस असल्याने खुपच थंडी वाजत होती. हुडहुडी भरली होती पण आज एका वेगळ्याच दुनियेत जाणार होतो त्यामुळे हुडहुडीची परवा केली नाही. रोड पासून ८०० मीटरवर पक्षी अभयारण्याची हद्द सुरू झाली. वन्यजीव विभागाकडून गेटपास घेतला, सोबत दोन दुर्बिणी व गाईड घेतला. पाण कणसांच्या मधून वाट काढीत पुढे गाईड व आम्ही त्याच्या मागे चालत होतो. आमच्या पायाच्या आवाजाने काही पक्षी विचित्र आवाज काढून आम्ही आलोय याची सुचना इतर पक्ष्यांना देत होते. टिटवीने तर कहरच केला संपूर्ण शांततेचा भंगच करून टाकाला किना-यावर असलेले पक्षी पंखांची फडफड करीत खोल पाण्यात जावू लागले. दलदलीच्या रस्त्याने मनो-याची वाट मी व गजाननदादा चालत होतो. मनात थोडी भिती पण वाटायची एखाद्या सरपटणा-या प्राण्याने हल्ला केला तर पाणी पण मागून देणार नाही. पण गाईड स्थानिक असल्याने त्याला सर्व माहिती होती. अखेर आम्ही शेवटच्या मनो-या जवळ आलो सिडी चढून वरती गेलो..आजूबाजूला पाहिले तर एक विलक्षण नजारा दिसत होता. हजारो परदेशी पाहुणे मनसोक्त आनंदाने बागडत होते. जो पर्यंत नजर जात होती तिथपर्यंत संपूर्ण परिसर या परदेशी पाहुण्यांनी व्यापलेला दिसत होता..
इतके वेळ शांत असलेला गाईड आता बोलू लागला होता. माझे नाव संतोष, माझे गाव हेच, शिक्षण घेत आम्ही गाईडचे काम करतो. गेली कित्येक वर्ष अभ्यास करून आम्हाला या पक्ष्यांची माहीती झाली..
तसेच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे तत्कालीन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे महाराष्ट्रातील तीन पाणथळ जागांचे अनुमोदन रामसार जागांच्या साठी पाठविले होते. जेणेकरून समृद्ध पाणथळ म्हणून नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य विकसीत होईल, हाच ठराव इराण येथे आंतरराष्ट्रीय पातळीवर मंजूर झाला त्यातीन ठरावांच्या पैकी नांदूरमधमेश्वर पक्षी प्रकल्पाचा समावेश झाला. रामसार ठराव हा जगातील विविध जैवविविधतेने समृद्ध अशा पाणथळ जागांचे संरक्षण करणे, तसेच पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी या पक्ष्यांचा पण महत्वाचा वाटा असतो. उगमस्त्रोत्रांचे संरक्षण करणे हे निसर्गाच्या व मानवाच्या दृष्टीने विकासाचे ठरणार आहे. म्हणून या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून या अभयारण्याची जगात ओळख आहे...
गंगापूर आणि दारणा पाणवठयाच्या विसर्गातून वाहत येणाऱ्या मातीने, वनोपजामुळे नांदूर मध्यमेश्वर परिसरात अनेक नैसर्गिक बेटसदृश भाग बनले, त्या परिसरात बहुतांश पाणवनस्पती आणि जलचर वास्तव्यास आल्याने समृद्ध जल अन्नसाखळी या परिसरात नांदते आहे. हीच समृद्ध अन्नसाखळी अनेक पक्ष्यांना इथे आकर्षित करते. त्या मुळे परदेशातून शेकडो पक्षी येथे वास्तव्यास येत आहेत. विविध रंगी बेरंगी प्रकारच्या पक्ष्यांनी गजबजणारा हा परिसर १९८६ साली अभयारण्याचा दर्जा देऊन संरक्षित केला गेला. सुमारे १०१ किलोमीटरचा परिसर महाराष्ट्र वन विभागाने संरक्षित करून नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्याची निर्मिती केली.
आमच्या कार्यालयातील नोंदीनुसार येथे युरोप, रशिया, सायबेरिया, चीन, तिबेट असा दहा हजार किलोमीटरचा प्रवास करून २३० हून जास्त प्रकारचे पक्षी या परिसरात आढळतात. यामधे टिल्स, पोचार्ड, विजन, गडवाल, शाॅवलर, पिनटेल, क्रेन, गारगनी, टर्नस, गूस, पेलकिन, क्रेन, गॉडवीट, हॅरियर, प्रिटेनकोल, फ्लेमिंगो, स्पूनबिल्स, विव्हर्स हे पक्षी आहेत. तर इथेच राहणाऱ्या स्थानिक पक्ष्यांची यादी भरपूर मोठी आहे. यात चक्रवाक, तलवार बदक, लालसरी, चतुरंग, सुरय, कादंब, झोळीवाला, करकोचे, शराटी, तुतारी, क्रौंच, गल, चिलखे, कुरल, हरीण, चमचा बदक, बगळे, चांदवा, कमळपक्षी, पाणकोंबडी, मुग्धबलाक, खंडय़ा, ससाणा, पाणबुडी हे स्थानिक पक्षी बघायला मिळतात. नांदूर मध्यमेश्वर परिसरातल्या उत्तम नैसर्गिक अधिवासामुळे, इथे आढळणाऱ्या पक्ष्यांच्या वास्तव्यामुळे या परिसराला महत्त्व आले आहे. या अभयारण्याची निर्मितीच पक्ष्यांच्या अधिवासासाठी केलेली असली तरी अभयारण्याच्या परिसरात अनेक वन्यजीव वास्तव्याला आहेत. इथल्या पाणवठया मध्ये पाणमांजरं, मासेमार मांजरं, उदमांजरं नियमित दिसतात. परिसरातल्या ऊस शेतीमध्ये येऊन जाऊन असणारे कोल्हे आणि लांडगेही मधूनच इथे दर्शन देऊन जातात. नांदूर परिसरात सरडे, सुरळ्या, साप, मुंगूस यांची रेलचेल असून अनेकदा हे जीव उन्हात शेकताना किंवा नदीच्या काठावर दिसून येतात. या सगळ्यांची एकमेकांवर अवलंबलेली समृद्ध जीवनसाखळी या परिसरात नांदते आहे. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याच्या परिसरात राहाणाऱ्या हजारो पक्ष्यांसाठी मुबलक खाण उपलब्ध आहे. कारण इथल्या पाणवठय़ांमध्ये २४ हून जास्त प्रकारचे मासे सापडतात. तसेच पक्ष्यांना घरटी करायला उत्तम अशी झाडं परिसरात असून सुमारे ४६० प्रकारची झाडं, झुडपं आणि वनस्पती यांची नोंद आहे. अशी परिपूर्ण माहीती मी व गजाननदादा एकरूप होऊन ऐकत होतो इतके माहीतीचे भांडार पहिल्यांदाच अनुभवत होतो. थंडी सरून उन्हाचा तडाखा जानवत होता तसंतसे विविध पक्षी पाण्यात जात होते. काही क्षण असे वाटत होते पक्ष्यांची येथे ब्युटी क्वीन स्पर्धाच सुरू आहे. जोडीने पक्षी यायचे उथळ पाण्याच्या रॅम्मवाॅकवर इकडून तिकडून डोलायचे आणि निघून जायचे. हा खेळ खुप वेळचा सुरू होता. अचानक समोरून बगळ्यांची रांग दिसली सफेद रंगाचे बगळे एकसंघ उडत खाण्याच्या शोधात निघाले होते..

बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात
भेट आपुली स्मरशी काय तू मनात?

हे गाणे सहजच त्या बगळ्यांना पाहून मनपटलावर तरारले,
गाईड दादाने एक मोठी दुर्बिण आणली होती त्यातून दुरवरचा पक्षी सुद्धा स्पष्ट दिसत होता. अशाच एका दिशेने दुर्बिण रोखली आणि मला पहायला सांगितले. दादा हा पांढरा बलाक युरोपहून आला आहे याची लांबी १०० से.मी हा रंगाने संपूर्ण पांढरा असतो याचे अन्न मासे, बेडूक, खेकडा, शंख, शिंपले. ही माहिती ऐकता ऐकता या परदेशी पाहुण्याला मी प्रत्यक्ष पहात होतो. त्यानंतर हा अग्निपंखी/ रोहीत यांची लांबी १४० से. मी हा पक्षी मी तर पहिल्यांदा पहात होतो त्याची मान S आकाराची होती गुलाबी पांढ-या रंगाची पिसे कडेला लाल शेंदरी पिसे, भले उंच गुलाबी रंगाचे पाय, जाड गुलाबी चोच मध्यावर वाकलेली, पिवळे डोळे हा रोहित पक्षी पाहूनच सारखे पहात रहावे असे वाटत होते.
गाईड दादाची दुर्बिण विविध पक्षी हेरत होती आणि मला साक्षात दर्शन घडवित होती.
पट्ट कादंब:- लांबी ७५ से.मी रंग राखी, तपकिरी व पांढरा, डोके व मान यांच्या मध्ये दोन मोठे आडवे काळे पट्टे, पिवळी चोच हा पक्षी तिबेट हून भारतात येतो.
शाम कादंब::- लांबी ८१ से. मी, रंग करडा, मातकट, गुलाबी मातकट चोच हा पक्षी हंसाचा मुळ पुरूष समजला जातो...
शाही चक्रवाक:- लांबी ६६ से.मी पांढ- या रंगाचे अंग, पोटावर तपकिरी रंगाचा पट्टा, पंखावर काळा पट्टा, काळी मान, लाल चोच इतका सुंदर पक्षी कधीच पाहिला नव्हता..
हळदी कूंकू:- या पक्ष्याचे नाव मला जरा विचित्रच वाटले, याची लांबी ६१ से.मी, पांढरट राखाडी मान, पंखावरती गडद तपकिरी रंग, पंखाखाली हिरवट पट्टा, काळ्या चोचीच्या टोकावर पिवळा ठिपका,
शेंडी बदक:- लांबी ४६ से.मी, शेंडी असलेले काळ्या जांभळ्या रंगाचे डोके, पाठ मान पोटाकडील भाग पांढरा..
चिमणशेंद्रया:- लांबी ४८ से. मी, शेंदरी तपकिरी डोके, काळसर करडी चोच, काळा गळा, करडी पाठ, काळी शेपटी, लालसर पिवळे डोळे, हा पक्षी सैवेरिया या देशातून आलेला.
तरंग:- लांबी ४९ से.मी, निळी करडी चोच, फिकट पिवळ्या रंगाचा डोक्यावर पट्टा, लालसर तपकिरी डोकं, करडी पाठ, हा पक्षी उ युरोप हून या पक्षी अभयारण्यात आलेला.
जांभळी पाण कोंबडी:- ही नांदूर मधमेश्वरची राणी म्हणून ओळखली जाते. लांबी ४३ से.मी संपूर्ण जांभळा रंग, लालचुटूक चोच, उंच लाल पाय, शेपटी खाली पांढरा रंग ही अशी पाण कोंबडी फक्त मध्यमेश्वर येथेच आढळते..
चमचा पक्षी:- लांबी ७५ से.मी, लांब चमच्याच्या आकाराची काळी चोच, डोक्यावर पांढरा तुरा..
असे भरपूर पक्षी दुर्बिणीतून गाईड दादाने दाखविले त्यांची माहिती तंतोतंत दिली. पक्ष्यांच्या या सानिध्यात मी पण पक्षी झालो होतो. तीन तास हे जगच विसरून गेलो. खरच साक्षात पक्षीतीर्थ पाहिल्याची अनुभूती मला मिळाली होती. खुपच अप्रतिम अविस्मरणीय ही पक्ष्यांची दुनिया डोळ्यात साठवली, आता पोटात पण भुकेचे कावळे ओरडायला लागले होते. पुन्हा एकदा दूरवर नजर फिरवून, मनोरा उतरलो. दुर्बिणी ऑफीस मधे जमा केल्या आणि गाईड दादाचे आभार मानून निरोप घेतला...

पशू, पक्षी, वनस्पती
हेच खरे निसर्गाचे धन
संरक्षण, संवर्धन तयांचे
करण्या घेवुया प्रण!

संदीप राक्षे
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

कोपेश्वरमंदिर, खिद्रापूर

याचि देही याचि डोळा अनुभवली
कोपेश्वर मंदिराची शिल्पकला...

फेसबुक ला एक पोस्ट पाहिली आणि डोळे खिळून राहिले, एका मंदिराचा फोटो होता. अलौकिक अशी कलाकृती पाहून मंत्रमुग्ध झालो, पुन्हा पुन्हा ते मंदीर फोटोत पाहून मन काही भरेना, उत्सुकता लागली त्या मंदिराची माहीती घेण्याची, ती पोस्ट केली होती किरण मगदूम यांनी मी त्यांना मेसेंजर वर मेसेज केला आणि त्या मंदिराची माहीती विचारली ते म्हणाले हे मंदिर कोपेश्वर महादेवाचे आहे कोल्हापूर मध्ये नृसिंहवाडीच्या जवळ आहे. आता मला पत्ता मिळाला होता. मनात आता तीव्र इच्छा झाली कोपेश्वराचे मंदीर पहाण्याची रोज तेच मंदीर आठवू लागले, पण तो दिवस काही येईना.

अचानक एक दिवस मला कोल्हापूरहून छ. शिवराय विचार नवरंग कला यांच्या अध्यक्षाचा फोन आला ते मला म्हणाले शनिवार दि. २३ मार्च २०१९ रोजी तुम्हाला जेष्ठ समाजसेविका सिंधूताई सकपाळ यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र शिवसन्मान हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. मी लगेच होकार दिला. कोपेश्वर महादेव पावन झाले असे थोडा वेळ वाटले आणी खुप आनंद झाला. जी मंदिर पहाण्याची इच्छा होती ती पूर्ण होणार होती.

२१ तारखेला धुलीवंदनच्या दिवशी कोल्हापूरला जायचे ठरले पण यावेळी सह कुटूंब सह परिवार सोबत घेऊन निघालो, खुप दिवस झाले त्यांना पण कुठे घेऊन गेलो नव्हतो एकदा कुठे तरी फिरवून आणले की एक दोन वर्षे मनसोक्त एकट्याला भटकायला मिळते, आमचे बंधू राजेश राक्षे यांनी नविन घेतलेली ब्रेझा अॅटोमॅटिक ही गाडी प्रवासास असल्याने प्रवास अतिशय आनंददायी आणि रिलॅक्स चालला होता. सोबत चि संकेत आणि पुतण्या रितेश पण साथीला होते....

सकाळी आठ वाजता घर सोडले दुपारी दोन वाजता कोल्हापूरला पोहचलो तेथून मॅप बाबा सुरू केले आणि त्यांच्या आधाराने ते सांगतील तसा प्रवास चालला होता. ऐन उन्हाळ्यात इतके हिरवे रितेशचा प्रश्न होता. कारण आजूबाजूला इतकी हिरवीगार शेती पाहून खरच डोळेही कडक उन्हात गार पडले होते. अरूंद पण डांबरी रस्ता, रस्त्याच्या दोन्ही कडेला नारळाची झाडं आणि जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत फक्त ऊसच ऊस दिसत होता. पश्चिम महाराष्ट्र तसा पाण्याची खाणंच हेच पाणी वाया न देऊन जाता त्यासाठी धरण बांधली, छत्रपती शाहू महाराज स्वर्गिय यशवंतराव चव्हाण त्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या दूरदृष्टीचे ते फळ होते. बळिराजा सतत आनंदी असतो येथील स्थानीक पुढा-यांनी गेली कित्येक वर्षे साखर कारखाने सुरू ठेवून त्यांना योग्य भाव देऊन प्रत्येक शेतकरी श्रीमंत केला. रस्त्याच्या कडेला प्रत्येक बळीराजाचा बंगला याची साक्ष देत होता...

खिद्रापूर अवघे दोन किलोमीटर राहीले होते इतक्या दिवसाची मनाची आस पूर्ण होणार होती. महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर हे गाव कोपेश्वर महादेवाच्या अतिप्राचिन मंदिरामुळे संपूर्ण भारत देशात प्रसिद्ध आहे तसेच याच मंदिरात कट्यार काळजात घुसली या चित्रपटाचे चित्रिकरण झाल्याने हे मंदिर लोकांच्या नजरे समोर आले.

पार्किंग मधे गाडी लावली एक दोन गाड्या उभ्या होत्या म्हणजे गर्दी नव्हती, गावातील लहान लहान मुलं धुलवडीसाठी पैसे जमा करीत होते त्यांच्यातील एकाला मंदीर कुठे आहे विचारले समोरच्या वाड्याकडे त्याने बोट केले, पहिल्यांदा मला वाटले आपले काहीतरी चुकत आहे मंदिर इतके मोठे आणि वाडा इतका लहान तरी पण आम्ही सर्वजण वाड्यात गेलो. दरवाज्यातून आत प्रवेश केल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला जे पाहिले तेच मंदीर होते पायरीचे दर्शन घेतले, आत मध्ये महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले, काय सांगू खरच एका विलक्षण दुनियेत आलो आहोत असा भास होत होता.. दगडावरील कलाकुसर नक्षीकाम साक्षात स्वर्गातील इंद्राचा दरबारच जणू...
मनसोक्त फोटो काढले, खुपच बारकाईने मंदीर न्याहाळले, आजूबाजूला कोणीच नव्हते, गाईड नव्हता त्यामुळे मंदिराची काहीच माहिती मिळणार नव्हती, मंदिरात बसल्या बसल्या साठ्याचा महामेरू गुगल बाबावर सर्च केले तर खुपच छान माहिती मिळाली मग मंदिरातून बाहेर पडू नये असे झाले. म्हणून मग गुखलवरच माहीती वाचत बसलो, तिथे मंदीराची खरी माहिती मिळाली ती अशी....

या महादेवाचे नाव कोपेश्वर आहे. कोपेश्वर म्हणजे रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. मग त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे होते ते काम श्री विष्णूनी केले. त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. एक कोपेश्वर दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर. दुसरे एक वैशिष्ट्य असे की येथे इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही.
साधारणत सातव्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारणीची सुरुवात झाली असावी, ११-१२ व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले. देवगिरीच्या यादवांनीसुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारी आहे.
देवळाबाहेर ४८ खांबांवर तोललेला एक मंडप आहे. या मंडपाला पूर्ण छत नाही. एक वर्तुळाकार जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आली आहे. या मंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. त्यामुळे होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे. मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे. गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे. अंतराळ आणि मंडप यांचे मूळ छप्पर अस्तित्वात नाही. मंडपापासून काहीसा विलग असलेला खुल्या मंडपाला स्वर्गमंडप म्हणून ओळखले जाते, त्याला कधीच छत नव्हते. कोपेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून सर्वात पुढच्या बाजूस मुखमंडपाऐवजी त्रिरथ तलविन्यासाचा पूर्णमंडप आहे. मंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार रंगशिळा असून तिच्याभोवती अपूर्ण घुमटाकार छताला पेलणारे बारा स्तंभ आहेत. या स्तंभांच्या आतील भागावर कार्तिकेय आणि अष्टदिक्पाल वाहनांसह दाखविलेले आहेत. या बारा स्तंभांच्या मागे तुलनेने कमी रुंदीचे नऊ स्तंभ आहेत.
स्वर्गमंडपाच्या आत सभामंडप आहे. या सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच एकेक स्तंभ व त्याखालील कोनाड्यात व्याल आहेत. सभामंडपाच्या मधल्या बारा स्तंभांभोवती वीस चौकोनाकृती स्तंभ आहेत. या स्तंभांच्या रांगांपलीकडे सभामंडपाच्या भिंती आहेत. या सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रकाशासाठी गवाक्षे आहेत. मंडपातून अंतराळात जाताना प्रवेशमार्गापाशी दोन्ही बाजूंना द्वारपालाच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाचे द्वार पंचशाख प्रकारचे आहे. गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत.
सभामंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत. त्या जाळ्यांवरचे दगडात कोरलेले हत्ती खूप सुंदर आहेत. दरवाजाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला पाच-पाच द्वारपाल आहेत. मुख्य सभामंडपही खूप सुंदर आहे. पुढे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या पायाशी रांगोळीसारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते. गर्भगृह जरासे अंधारे आहे. परंतु डोळे सरावल्यानंतर आतमध्येही सुंदर मूर्ती आहेत असे लक्षात येते. या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा आकार, प्रमाणबद्धता विशेष उठून दिसतात.
शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव-रेखीव मानवी आकृती सुमारे पाच-सहा फूट उंचीवर आहेत. मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदीवजा आकृती दिसते. त्यावर रथामध्ये एक जोडपे बसले आहे असे लक्षात येते. सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर एक पुरातन शिलालेख आहे. ऊन-पावसाचा मारा खात हा शिलालेख अजून शिल्लक आहे.
कोपेश्वर मंदिराच्या बाह्य बाजूच्या जंघाभाग, देवकोष्ठे आणि अधिष्ठानाच्या थरावर वेगवेगळी आकृतिशिल्पे आहेत. या मंदिरावरील सुरसुंदरी शिल्पे विशेष प्रसिद्ध आहेत. गजथरावर मोठ्या आकाराचे हत्ती असून या हत्तींच्या पाठीवर वेगवेगळ्या देवदेवतांची शिल्पे आहेत. भद्रावरील देवकोष्ठात बैल असून त्यावर शक्तीसह शिव आरूढ झाला आहे. मंडोवरावर नायिका, विष्णूचे अवतार, चामुंडा, गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत. या मंदिराच्या परिसरात काही वीरगळ देखील पहायला मिळतात. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे दोन बाजूच्या महाव्दावारात दगडात रांगोळी काढलेली आहे, ती नक्षी कलाकुसर इतकी अप्रतिम आहे त्यावर पाय ठेवायला सुद्धा नको वाटते. मंदीर पहाता पहाताच देहभान हरपून जाते, किती मोठा विलक्षण अनमोल ठेवा अशा ऐतिहासिक मंदिराची देखभाल ठेवली पाहिजे पिढ्यांन पिढ्या ही प्रतिक, इतिहासाची साक्ष जतन करून ठेवायला हवीत. मंदीर पहाता पहाताच सवसांज झाली होती सुर्य मावळतीला गेला होता. मंदीर आता काळोखाच्या पडदयाआड जाणार होते. पुन्हा एकदा कोपेश्वराचे दर्शन घेतले आणि पुढील प्रवास सुरू केला...

हेच ऐश्वर्य जणू स्वर्गाचा मळा
जळी स्थळी पाषाणी देव भोळा
कृपा करितो अखंड भक्तावरी
कोपेश्वर महादेव धावे वेळोवेळा..

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

जैन मंदिर डिंबे धरण

शंभर वर्षांपूर्वीचे जैन मंदीर, वीस वर्षे पाण्यात राहूनही सुस्थितीत, वास्तुशास्त्राचा अद्भुत चमत्कार,,

डिंभे धरणात गेली वीस वर्षापासून पाण्यात असणारे मंदीर, धरणातील पाणी कमी झाल्याने ते मंदीर दिसू लागले अशी फेसबुकला या मंदिराच्या विषयी पोस्ट वाचली त्या मंदिराचे फोटो पाहिले व त्या मंदिराच्या विषयी आकर्षण वाटू लागले कधी एकदा हे मंदिर स्वता:च्या डोळ्यांनी पहातो असे झाले होते.
शुक्रवारी रात्री झोपण्याचा प्रयत्न करीत होतो पण काही केल्या झोप काही लागेना, सतत त्या मंदीराचा विषय मनात यायचा उशिरा पर्यंत तेच मंदीर नजरे समोर दिसायचे, रात्रीच निश्चिय केला, पहिले हे डिंभे धरणातील मंदिर पहायचे व पुढे भिमाशंकरला पण दर्शनासाठी जायचे या विचारातच झोपी गेलो...
शनिवार दि ११/५/२०१९ रोजी सकाळी १० वाजता माझा चिरंजीव संकेत व पुतण्या रितेश यांना सोबत घेतले व प्रवासासाठी निघालो. सकाळचे दहा वाजल्याने रस्त्यावर गर्दी होती. चाकण पास केले व खेडच्या पुलाजवळ आलो पुलावरच ट्रॅफिक जॅम झालेली दिसली, गाडी वळवली व चासकमान, वाडा मार्ग धरला, नागमोडी रस्ते डोंगराच्या कडेने ओसाड पडलेल्या डोंगर रांगा पहात पहात प्रवास सुरू होता. भोरगिरी डोंगराचा घाट सुरू झाला होता. इतका वेळ मागेच गाडीत डिझेल भरायचे लक्षात आले नाही पिवळी लाईट लागून फक्त एकच कांडी डिझेलची दिसत होती. मनात धडकी भरली इकडे तर पेट्रोल पंप पण नाही अचानक बंद पडली तर या विचाराने गोंधळून गेलो. भिमाशंकर जवळील तळेघर पर्यंत आलो घोडेगाव वरून येणारा रस्ता त्या रस्याला मिळत होता भिमाशंकर तेथून फक्त सतरा किलोमीटर होते व घोडेगाव अठरा किलोमीटर होते. गाडीत डिझेल फारच कमी होते. भिमाशंकर ला जावं तर गाडीतले डिझेल संपणार मग पुन्हा घाट उतरून घोडेगाव गाठले तिथे गाडीत डिझेल भरले दुपारचा एक वाजला होता. तिघांना पण प्रंचंड भूक लागली होती मस्त घरगुती पद्धतीच्या जेवणाचे हाॅटेल दिसले. मासवडी, शेंगुळी, पिठलं भाकरी, लसणाचा ठेचा, लाल मिरचीचा ठेचा, अशा पंचपक्वांनावर ताव मारला,
घोडेगाव पासून डिंभे धरण जवळच होते पहिले जैन मंदीर पाहून मग भिमाशंकर दर्शनाला जायचे ठरले, मग आदल्या रात्री मी ठरवलेला रस्ता आठवला मंचर मार्गे घोडेगाव व तेथून डिंभे धरण मग भिमाशंकर महादेवाचे दर्शन असे ठरवले होते. भिमाशंकर मंदिराच्या इतक्या जवळ जावूनही आपण भिमाशंकराला का जावू शकलो नाही कारण होते डिझेल व रात्री ठरवलेले पहिले दर्शन जैन मंदिराचे व मग भिमाशंकराचे. गर्दी मुळे दुस-या रस्त्याने आलो तेथून भिमाशंकर जवळ होते, तरी जसे रात्री ठरवले तसेच माझ्या कडे ये हीच इच्छा भगवान महादेवाची होती..
भोसरी, चाकण, खेड, मंचर, घोडेगाव, डिंभे असा ८० कि.मी प्रवास करत आपण आंबेगावात पोहचतो. आंबेगाव तालुक्यातील आंबेगाव हे २० वर्षांपूर्वी सर्व संपन्न गाव होतं. उत्तम बाजारपेठ म्हणून नावलौकिक असलेल्या या गावात तालुक्यातील अनेक गावची मंडळी कामा साठी येत होती. कारण आंबेगाव म्हणजे हेच तालुक्याचे एकमेव उत्तम ठिकाण होते. जुन्या पध्दतीच्या विटांमध्ये बांधलेल्या इमारती, विविध मंदिरे व चारही दिशांना पसरलेल्या सह्याद्रीच्या सुंदर रांगानी हे गाव अजुनच वैभवसंपन्न दिसत होते. त्यात भर घातली होती ती गाव किना-यावरून खळखळ वाहणा-या घोडनदीने.
डिंभे धरणाचे बांधकाम इ.स.१९७८ मध्ये सुरु झाले व इ.स. २००० मध्ये पूर्ण झाले. तेव्हा पासून हे धरण कायम भरलेले असायचे पण पुरेसा पाऊस न झाल्याने धरणातील पाणी साठा संपलेला होता कधीकाळी तुडूंब भरलेले धरण कोरडे पडले होते, धरणाच्या बंधा-या जवळच पाणीसाठा दिसत होता. धरणातील जैन मंदीर कुठे दिसते का पहात होतो पण मंदिर कुठेच दिसत नव्हते, धरणावरच दोन महिला एस टी ची वाट पहात बसल्या होत्या त्यांना मी विचारले? धरणात एक जैन मंदीर आहे ते पाणी कमी झाल्याने दिसत आहे. दोघींनी पण एकावेळेस उत्तर दिशेला हात केला तिकडे ते मंदीर आहे..मंदिराची काळी आकृती दिसत होती. संपूर्ण डिंभे धरणाला गोल वेढा घालून त्या मंदिराकडे जायचे होते..

भोरगिरी पर्वताची नैसर्गिक वनराई,
आयुर्वेदाची, रानमेव्यांची, प्राण्यांची
काळ बदलला, वणवा, जंगलतोडीने
डोंगराई भासते जणू दगड खाच खळग्यांची..

मन हेलावून टाकणारे दृष्य दिसत होते, डिंभे धरण कायम पाण्याने भरलेले असायचे तेच आता भेगाळलेल्या स्वरूपात दिसत होते, डोंगर काळे ठिक्कूर पडलेले दिसत होते. आज ही अवस्था तर भविष्यात काय परस्थिती असणार आहे. खरच माणसांचे निसर्गाच्या प्रति असणारे प्रेम, सत्ताधिशांचे दुर्लक्ष या बाबी भविष्यात जीवघेण्या नक्कीच ठरणार आहेत. या विचारातचं जुन्या व धरण बाधित आंबेगावच्या हद्दीत पोहचलो, डांबरी रस्ता सोडून कच्या रस्त्याने, पाणी आटल्याने जैन मंदीरा पर्यंत फोरव्हिलर गाडी सहज जात होती.
डिंभे धरणाच्या बंधा-याहून ठळक दिसणारे मंदिर जवळ आल्यावर पुसटसे दिसत होते खरच हा एक चमत्कारच होता. मंदिराकडे जाताना असंख्य विटांचे, दगडांचे ढिगारे पडले होते, कोरलेले दगड भग्न अवस्थेत पडलेले दिसत होते. मंदिराच्या जवळ गेलो तर विश्वासच बसेना शंभर वर्षांपूर्वीचे हे मंदिर वीस वर्षे पाण्यात राहूनही सुस्थितीत दिसत होते,
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती एकच मुर्ती सरस्वती मातेची दिसत होती, त्या खाली गज लक्ष्मीचे कोरलेले शिल्प डोळ्यांचे पारणे फेडते तर मुख्य प्रवेशद्वाराच्या उंच माथ्यावरील माता सरस्वतीची मूर्ती पाहताच या परीसरात माता सरस्वती अवतरल्याचा भास होतो. खांबावरील कोरीव नक्षी, छताचे गोलाकार सुरेख वर्तुळे, विविध कोरीवकाम व नक्षीकाम पाहण्यासारखे आहे. गाभा-याच्या प्रवेशद्वारावर माता सरस्वती सोबत दोन मोरांना घेऊन विराजमान झाल्या असून जनू त्या सांगत आहे की भक्तांनो पक्षी प्राण्यांवर प्रेम करा असेच सांगत असल्याचा भास होतो. मंदिराच्या काही भागावर पेंटींग केली होती. त्या पेटिंगचे कलर वेरूळ च्या पेंटींगच्या कलरची आठवण करून देणारे होते. कारण वीस वर्षे पाणी सुद्धा त्या कलरला पुसू शकले नाही. या मंदिरातील श्री कल्याण पार्श्वनाथ, श्री विमलनाथ तथा वासुपूज्य स्वामी आदि भगदंतोनी मुर्तिओ नेमज यक्ष यक्षणी आदि मुर्तिंची प्राणप्रतिष्ठा पू. आचार्यदेव श्रीमद विजय लब्धिसूरीश्वरजी यांच्या शुभहस्ते वीर संवत २४८८ विक्रम संवत २०१८ वैशाख शुद्ध ९/५/६२ रोजी करण्यात आली होती. ज्या मुर्तींची प्राणप्रतिष्ठा झाली त्या मुर्ती गाभा-यात नव्हत्या, तरी पण मंदिरातील चैतन्य कमी झाले नव्हते, अजूनही त्या देव देविकांचे अस्तित्व तिथे जाणवत होते. गाभा-यात मुर्ती नव्हती तरी दर्शन घेण्याचा भाव मनी प्रकट झाला. दर्शन घेऊन आजूबाजूचा परिसर पहात होतो. जिथे हे जुने आंबेगाव वसले होते तिथे एक मोठा पार असावा कारण एक वडाचे भले मोठे खोड अजूनही आपली मुळ खोल जमिनीत रूतवून समर्थ पणे उभे आहे. त्या खोडावर फोटो काढण्याचा आनंद काही वेगळाच होता. पण दु:ख होते ते इतके सुंदर मंदिर पाण्याखाली असते म्हणून..
संपूर्ण परिसर डोळ्यांत साठविला, दूरून मंदिराचे पुन्हा दर्शन घेतले आणि भिमाशंकर कडे निघालो....

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

अंकाई टंकाई किल्ला

अतूल्य दुर्गस्थापत्याचा सर्वोत्कृष्ट नमुना अंकाई टंकाई किल्ला...

कवी विचार मंच शेगावं आयोजित ३ -या साहित्य संमेलनाची धावपळ सुरू होती ३ एप्रिलला होणा-या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून सारस्वत बंधू भगिनी आदल्या दिवशी म्हणजे २ तारखेलाच मुक्कामी येत होते. त्यातच आमचे परम मित्र कवी गणेश सांगुनवेढे सर व कवी, निसर्गप्रेमी, पेंटर देशमुख हे पण आले होते. शेगावहून रात्रीचा प्रवास करून पहाटे शिर्डीत पोहचले, शिर्डी मधेच आंघोळी उरकून दोघांनी साईबाबांचे दर्शन घेतले व आत्मा मालिक कोकमठाण येथे कार्यक्रमांसाठी आले. दोघांचे स्वागत केले. आत्मा मालिक च्या गेस्ट हाऊस मधे गझलकार राम गायकवाड व चित्रकार अरविंद शेलार सरांनी सर्वांची राहण्याची सुविधा केली होती. खुप दिवसांनी भेट झाल्याने खूप गप्पा मारल्या पण माझ्या मनात या दोघांना कुठे तरी घेऊन जायचे असा विचार आला क्षणाचाही विचार न करता मी सांगुनवेढे सरांना म्हणालो चला येवल्याला फिरून येऊ त्यांनी सुद्धा कोणतेही आडेवेढे न घेता त्वरीत होकार दिला. आम्ही तिघेजण माझ्या होंडा अॅमेज मधे बसून येवल्या कडे निघालो. कुठे जायचे ठरवले नव्हते जिकडे वेळ घेऊन जाईल तिकडे जायचे ठरले.
येवला हे गाव गेले अन मला अंकाई टंकाई किल्ल्याची आठवण झाली. खुप वर्षापासून या रस्त्यावरून जातो आहे पण किल्यावर जाण्याचा काही योग आला नाही कारण तो दूरून किल्ला दिसत नव्हता तो दिसायचा फक्त भला मोठा डोंगर,
आज विचार केला डोंगर तर डोंगर ही मंडळी पुन्हा कधीच इकडे येणार नाहीत पाहूयात तरी काय आहे अंकाई टंकाई किल्यावर, साहस तर करूयात कारण भर दुपारी बारा वाजता निघालो होतो, सूर्यदेव आग ओकत होता. साहसा व्यतिरिक्त किल्ला पाहायचा आणखी एक उद्देश म्हणजे इतिहासात डोकावून पाहयचं. महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्याला वैभवशाली व बोलका इतिहास आहे. इथे नुसत्याच कडेकपारी नाहीत, बुरूज नाहीत तर प्राचीन काळ जिवंत करणारे हे किल्ले म्हणजे स्वत:च एखाद्या पुराण वास्तु पुरुषासारखे आहेत. हा माझ्या मनात घोळत असलेला विचार अचानक सांगुनवेढे सरांनी विचारले कुठे जायचं? मी म्हणालो किल्यावर ते दोघेही माझ्याकडे कुतूहलाने बघू लागले, कदाचित मनात म्हणाले पण असतील काय विचित्र माणूस आहे हा भर उन्हात किल्यावर जायचे म्हणत आहे. पण माझ्या मुळे दोघेही काहीच बोलले नाहीत, "आलिया भोगाशी असावे सादर" हा विचार कदाचित देशमुख सर व सांगुनवेढे सरांच्या मनात नक्कीच आला असणार. रस्त्यावरील डांबर तप्त उन्हामुळे पाघळू लागले होते. इतकी भयंकर उष्णता होती.
अंधुकसा अंकाई किल्ला गाडीतून समोरच दिसू लागला होता. हळूहळू तो स्पष्ट दिसू लागला होता. दूरून पिंडीच्या आकाराचा दिसणारा किल्ला गावाजवळ आल्यावर वेगळाच दिसत होता. किल्यावर काय असेल काय नसेल यांची पुसटशी पण कल्पना नव्हती. गावापासून या किल्ल्याकडे जाण्यासाठी चांगला सिमेंटचा रस्ता बनवला होता. किल्याच्या पायथ्याशी गाडी लावली, गाडीतून बाहेर पडलो न पडलो तोच हवेतील उष्णता जाणवली तापलेल्या सुर्याची किरणे डोक्यावर पडताच क्षणात डोके तापले, एका सेकंदात इतका अनुभव आला तर संपूर्ण किल्ला चढायचा कसा माझ्या मुळे उगीच या दोघांना त्रास होणार मन कुठे तरी अस्वस्थ झाले. सांगुनवेढे सर गाडीतून उतरून एका मशिदी जवळ गेले त्या मशिदीवर चढवलेली चादर डोक्याला ऊन लागून नये म्हणून गुंडाळली कारण त्यांच्या कडील रुमाल मधेच रसाच्या गु-हाळात राहिला होता. डोक्याला संरक्षण म्हणून गुंडाळलेली ती चादर एखाद्या पीर बाबा सारखी दिसत होती. किल्यावर चढण्यासाठी पाय-या केल्या होत्या. एक एक पायरी चढत होतो तसं तसे किल्ला किती सुस्थितीत आहे ते दिसत होते.
अंकाई किल्ला व गाव नाशिक जिल्हयातील येवला तालुक्यात येते, पुरातन गाव म्हणून या गावची संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे. अंकाई आणि टंकाई हे किल्ले समुद्रसपाटीपासून बत्तीसशे फूट उंचावर व अंकाई गावापासून एक हजार फूट उंचावर आहेत. यादवकालीन एका ताम्रपटात ( इसवी सन ९७४) या किल्ल्यांचा उल्लेख ‘एककाई दुर्ग’ असा केलेला आहे. अंकाई किल्ल्याचा उपयोग यादव काळापूर्वीपासून टेहळणी नाका म्हणून केला जात असे. डोंगरशिखरावरून खानदेश भागातील व गोदावरी खोऱ्यातील विस्तृत प्रदेशावर नजर ठेवली जात होती. यादव काळात या किल्ल्यावर कायमस्वरूपी किल्लेदार व शिबंदी वास्तव्य करून राहत असत. शत्रू सैनिकांच्या हालचालींची माहिती देवगिरी किल्ल्यावर रवाना करण्यासाठी घोडेस्वार तैनात असत. किल्ला मजबूत व अजिंक्य असा होता. रामायण काळात या डोंगरावर अगस्ती मुनींचे वास्तव्य होते अशी कथा आहे. अल्लाउद्दीन खिलजीने महाराष्ट्रावर स्वारी (तेरावे शतक) केली होती तेव्हा किल्ल्याचा विध्वंस झाला होता. जैन लेण्यांची देखील मोडतोड करण्यात आली होती. अंकाई-टंकाई हा किल्ला मोगल सम्राट शहाजहानचा सरदार खान खनान याने स्वारी करून १६६५ मध्ये ताब्यात घेतला. मॅकडॉवेल या इंग्रज सेनापतीने एकही गोळी न झाडता तत्कालीन किल्लेदाराकडून किल्ला खाली करून १८१८ मधे घेतला होता.
किल्ल्याच्या दिडशे ते दोनशे पाय-या चढून आम्ही कोरीव लेण्यांचा समुह आहे तिथे पोहचलो, घामाने अंग ओलेचिंब झाले होते. अंगावरील कपडे ओले झाले होते, एखादी वा-याची गरम झुळूक सुद्धा थोडा गारवा द्यायची आणि निघून जायची. घशाला कोरड पडली होती. श्वास वाढला होता, दम लागला होता. ईश्वर कृपेने या लेणीं जवळ पाणी विकणारा बसला होता. तिघांनी पण मनसोक्त पाणी पिऊन तहान शमविण्याचा प्रयत्न केला पण अंगातून वाहणा-या घामाच्या धारा काही केल्या थांबत नव्हत्या. तहानेने व्याकूळ झाल्याने आजूबाजूला काय आहे ते विसरूनच गेलो होतो. जेव्हा थोडावेळ आराम केला तेव्हा अद्भूत अशा कोरीव लेण्या दिसल्या त्यापाहूनच सर्व शीण क्षणात निघून गेला. वरच्या रांगेत एकूण आठ व त्याखालील रांगेत दोन अशा दहा लेण्या तिथे दिसल्या. लेण्यांच्या समोरच पाण्याचे चार टाके दिसले. दुष्काळात सुद्धा दोन टाक्या मधे पाणी होते हे विशेष, बहुदा या लेणी दहाव्या अकराव्या शतकात कोरलेल्या असाव्यात. लेणी क्रमांक ३ वर एक शिलालेखही आहे. लेणी क्रमांक दोन मध्यभागी असल्याने पहिली ती पहाण्याचे ठरवले, एक महिला तिथे बसलेली होती. थोडा विचार आला इतक्या उंचावर या लेणींत ही महिला काय करीत असेल तो विचार करतो ना करतो तोच माझी नजर उजवीकडे वळली अन मी थोडावेळ अवाक झालो. भली मोठी देवीची कोरलेली मुर्ती पाहून थक्कच झालो. आपोआप आम्ही तिघेही त्या देवीपुढे नतमस्तक झालो. ती देवी होती अनकाई माता, आता लक्षात आले की ही बाई देवीची भक्तीण असावी. देवीचे दर्शन घेऊन आत मधल्या लेणीत गेलो संपूर्ण कोरीव काम असलेली ही लेणी व मध्यभागात असणारी महादेवाची पिंड महाचमत्कारच भासत होता. थोडावेळ आम्ही त्या लेणींत बसलो. बोलताना आवाज घुमत होता. ध्वनी लहरी अनेक लहरीत परावर्तित होत होत्या त्या शांत झाल्या की निरव शांतता निर्मळ गारवा मिळत होता. लेणीतून बाहेरच पडू नये असे वाटत होते. पण पुढची चढाई करायची होती. बाहेर आलो तर लेणीच्या मुख्यव्दारावर बारीक कलाकुसर, प्राण्यांची शिल्प, खिडक्यांची दगडी जाळी, हे सार नक्षीकाम कलेचा जणू सारीपाटच समोर मांडून उभं आहे असं भासत होतं. तीर्थंकरांच्या मूर्ती, द्वारशिल्पे अन् गूढ वाढविणाऱ्या मूर्ती पहायला मिळाल्या, तर काही मूर्तींच्या पायथ्याला शिलालेख कोरले होते. लेण्यांचा हा मुख्य सोहळा अनुभवून पुढे निघालो. लेण्यातील गारव्याने अंगातली उष्णता कमी झाली होती..लेण्यातील उत्कृष्ट कलाकुसर पाहून तिघांच्या पण अंगात उत्साह संचारला होता. ये तो सुरवात है पिक्चर अभी बाकी है या जोशात पुन्हा किल्ला चढायला सुरवात केली..
आता पाय-या संपून कच्चा रस्ता सुरू झाला होता. डबराचा खच जागोजागी पडला होता. त्यावरून चालत असताना काही चिरे बुटातून आरपार होणार नाही याची काळजी घेत होतो. सुर्य आता माथ्यावर आला होता. रस्त्याच्या कडेला आस-यासाठी साधे झुडूप पण नव्हते, फक्त होती ती सुबाभूळ जळालेल्या अवस्थेतील, टनटनीची झाडं पण पाण्याविना सुकून गेलेली, पहिला टप्पा पार करून किल्याच्या मुख्यव्दारा जवळ आलो.
येथूनच अंकाई आणि टंकाईवर जाण्यासाठी हा सामाईक दरवाजा जात होता. यातील डाव्या बाजूने आम्ही मुख्य किल्याकडे निघालो. एकामागून एक असे सुंदर दरवाजे पार करून आम्ही मार्गस्थ होत होतो. कोरीव पाय-या आणि डोळय़ांना खुणावणारी तटबंदी हे सारे नजरेखाली घालत पुढे चालत होतो, जवळच अगस्ती ऋषींची एक गुहा दिसली अत्यंत प्रशस्त होती. हजारो वर्षापूर्वी अगस्ती ऋषींनी येथे साधना केली. हे सारं कळल्यावर या किल्ल्याबद्दल अजूनच गूढ वाटू लागले. अशा गोष्टी समोर यायला लागल्या की मग हे गड-किल्ले आणखीनच वेगळे भासू लागतात. या गुहेत आम्ही मनोभावे माथा टेकवला, तेथील कोरीव लेण्यात इतिहासाच्या पाउलखुणा स्पष्ट दिसत होत्या. आता कच्ची वाट संपून संपूर्ण दगडातून कोरलेल्या पाय-याहून चालत होतो. बरेच चाललो उंचावर आलो होतो. क्षणभर थांबायचे अन पुढे चालायचे, दम अधिकच लागत होता. थोडे पुढे आल्यावर एक भला मोठा चौकोनी तलाव दिसला, कोरडा पडला होता. काही भाग दगड मातीने झाकून गेला होता. उतरायला पाय-या होत्या, आम्ही त्या पाय-या उतरलो अन त्या चौकोनी तलावात आलो अगदी किल्याच्या कडेला हा तलाव होता त्याच्या कडेला दगडांचे बांधकाम केलेले होते. तेथून आम्ही खाली डोकावले तर संपूर्ण गाव दिसत होते, नागमोडी रस्ते अगदी सापासारखे दिसत होते. गावातील गर काडीपेटीच्या आकाराची दिसत होती. ते पहाता पहाता अचानक नजर मागे वळली तर तिथे एक लेणी दिसली आम्ही तिघेही त्या लेणींत शिरलो, त्या लेणीत कोरीव मंदीर होते, आत मधे गाभा-यात शिव पार्वतीची प्रतिमा कोरलेली दिसत होती. जणू काही जिवंत देवाचे दर्शन झाले असे वाटत होते, कारण सगळी कडे अंधार होता पण या शंकर पार्वतीच्या कोरीव दगडावर उजेड दिसत होता. सगळी कडे पाहिले पण पण हा उजेड कोठून पडतो आहे याचे रहस्य काही उलगडेना, खरच चमत्कारिक दुनियेत आलो असे वाटत होते. त्या शिलेचे दर्शन घेतले आजूबाजूचे कोरीव काम बघितले ते डोळ्यात साठविले, शिल्पकलेचा हा अनोखा नजारा पाहून शिल्पकला साकरणा-या हातांची आठवण झाली, त्यांना पण मनातून वंदन केले..
हे सारं पहात असताना उन्हाचा त्रास जाणवतं नव्हता पण अंगातून निघणा-या घामांच्या धारा थांबत नव्हत्या. अशातच एक सरळच चढण चढायची होती. ती इतकी सरळ रेषेत होती की पाय घसरला तर सरळ खाली म्हणून हात टेकवून टेकवून ती टेकडी चढलो, खुपच दम लागला होता. दुस-या महादरवाज्या पर्यंत पोहचलो होतो, दोन बाजूला भले मोठे बुरूंज उभे होते इतके वर्षं होऊनही सुस्थितीत उभे होते, एका बुरूंजाच्या बाजूला एक छोटासा दरवाजा दिसला तेथून भरपूर हवा आत मधे येत होती. आम्ही तिघेही त्या दिशेने गेलो. त्या दरवाज्यातून मनमाड शहर दिसत होते, (शेंडीच्या) अंगठ्याच्या आकाराचा निमुळता होत गेलेला हडबीचा डोंगर अगदी स्पष्ट दिसत होता. हा अनोखा नजारा पहात असतानाच कवी गणेश सांगुनवेढे सरांनी त्यांची कविता म्हणायला सुरवात केली...

आभाळ सारे धुंद झाले
वारा खाली मंद चाले
कशी सांगू,,, कहाणी
पाऊस आणी मी...

शेत शिवारी हिरवा चारा
पाहून नटला गाई वासरा
शीळ घुमविते पाखर दिंडी
कशी सांगू,,,, कहाणी
पाऊस आणी मी...

तुषार गाली शहारे आले
भाव आतुनी ओलसर झाले
अबोल प्रियकर मिठीत येता
कशी सांगू,,, कहाणी...

ही कविता ऐकून मन प्रसन्न झाले. प्रचंड शुद्ध हवा तनाला आणि मनाला तजेला देत होती. बराच वेळ तेथे थांबून पुढे निघालो, २००० हजार फूट वरती आलो होतो इथून पुढचा १२ शे फूटाचा टप्पा अतिशय अवघड होता, पाय-या होत्या पण त्या पण सरळ रेषेत होत्या त्यावरून सरळ चालणे अशक्य होते. तिथून पुढे चालण्यास मन तयार होईना, माझ्या सोबत आलेल्या सांगुनवेढे सरांना व देशमुख सरांना विनाकारण त्रास देतो आहे असे वाटले. कारण ते बिचारे साहित्य संमेलनासाठी आले होते, आरामासाठी आले होते मी त्यांना उगीच इकडे घेऊन आलो असे वाटायला लागले चढताना काही विपरीत घडले तर या विचाराने मन पुन्हा सुन्न झाले. एक पाऊल पण पुढे सरकेना, तेवढ्यात पेंटर देशमुख सर म्हणाले सर तुम्ही नका विचार करू आपण किल्यावर जायचेच त्याला सांगुनवेढे सरांनी दुजोरा दिला.. हारलेले मन पुन्हा खंबीर झाले. एक एक पायरी चढताना पायाला अक्षरशः गोळे येत होते. पण सांगुनवेढे सरांची व देशमुख सरांची हिंमत बघून मला पण काहीच वाटले नाही.. हळूहळू सातशे फुटांचा टप्पा पार केला, खुपच उंचावर आलो होतो. कधी भुयारी मार्ग तर कधी कोरलेल्या दगडांतून हा कठीण मार्ग पार केला. आकाशाला गवसणी घालतो की काय इतके उंचावर आलो होतो, अंतिम दरवाज्यातून पठारावर आलो होतो. समोरच एक देवीचे मंदिर होते त्या मंदिरातच बैठक मारली, आता पुढे चालण्याची अजिबात हिंमत उरली नव्हती. तसेही पुढे काहीच नव्हते चौबाजूने तटबंदी, एक शिवमंदीर होते. पण त्या पेक्षाही भयानक हवा होती. मी अन सांगुनवेढे सर तिथेच बसून राहिलो. देशमुख सरांना सांगितले जर तुम्हाला जमत असेल तर पुढे जावून या ते पण थोडे अंतर चढले आणि पुन्हा माघारी आले हवे मुळे पुढे चालणे कठीण वाटत होते. बराच वेळ आम्ही तिघेही त्यां देवी समोर बसून राहिलो. शेवटचा टप्पा पार करता नाही आला याची रूख रूख मनात होती, पण इतके हे अग्निदिव्य केले हे सोपे नव्हते, निघताना पुन्हा देवीचे दर्शन घेतले अन गड उतार झालो....

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६

माझी परदेश सहल

माझी परदेश सहल...
《श्रीरामाचे वंशज व गौतम बुद्धांच्या
तत्वज्ञानाने बहरलेली सुवर्णभुमी "थायलंड"》

भारतीय संस्कृतीची जाण
आध्यात्माचा होतो बहुमान!
ब्रम्हा,विष्णू,महेश,राम,बुद्ध
हेच "थायलंड" मधे श्रद्धास्थान!

आयुष्यात कोणता क्षण कधी येईल सांगता येत नाही. काही स्वप्न विचार मनाला शिवत पण नाहीत. कारण अशक्य असतात जीवनील काही अनमोल क्षण पण मित्रांच्या साह्याने सहज शक्य होतात.
आठ आॅक्टोंबरला माझे प्रिय मित्र विनोदभाऊंचा फोन आला ते म्हणाले भाऊ आपल्याला एक चांगली संधी मिळते आहे थायलंड या देशात जाण्याची तुम्ही तयारी करा. मी पण त्यांचा शब्द खाली पडून दिला नाही कोणताच विचार केला नाही आणि होकार दिला. फोन ठेवल्यानंतर मात्र दरदरून घाम फुटला कारण परदेशात जायचे म्हटले की खर्च अवाढव्य कसे होईल. पण एक ना एक दिवस परदेशात विशेष करून थायलंड ला तरी जायचेच हा निश्चय मनात केला होताच. पण योगायोगाने संधी आली ती डावलायची नाही. एक दोन मित्रांना सांगितले थायलंड म्हटल्यावर ते माझ्या कडे खालून वरून पाहू लागले. मला क्षणभर कळले नाही. पण नक्कीच या देशाबद्दल गैरसमज असणार हे जाणविले कारण अनेक मित्र जाऊन आले होते त्यांची चर्चा त्या देशाबद्दल वेगळीच असायची. त्यानंतर भरपुर जणांना कळले मी पण मोठ्या अभिमानाने सांगायचो हो मी थायलंड ला चाललो आहे. बरेच जण या देशात जाताना वेगळ्याच देशाचे नाव सांगायचे हे जायचे थायलंड ला पण युरोप सिंगापूर अशी नाव सांगायचे हे कोडे मात्र उलगडेना. मला पण योगायोगाने पहिला देश थायलंड फिरण्याचा योग आला म्हणून उत्सुकता होतीच. तसे पाहिले तर संपूर्ण जगात रेड लाईट एरिया असतातच मग या देशाला का वेगळ्याच दृष्टीने बघतात हे प्रश्न सारखे पडत होते. आपल्याला त्या गावालाच जायचे नाही तर मी कशाला थायलंडचे नाव लपवू, मी बिनधास्त सांगत होतो. फेसबुक वर तर पोस्ट सुद्धा टाकली. कारण मला पहायचा होता तो देश तिथली संस्कृती, डोळे भरून पहायचा होता तो नयनरम्य निसर्ग. निळाशार तो समुद्र, तिथली अद्भुत बेट, तिथली कला, आणि प्रदूषण मुक्त धुळ मुक्त ती स्वच्छ सुंदर शहर, श्रीरामांचे वंशज, बुद्धांची प्रेरणादायी विचारांवर आपले बहुमुल्य जीवन व्यथित करणारी ती शांत स्वभावी माणस.

थायलंडला जाण्याची २० ऑक्टोबर २०१८ ही तारीख फायनल झाली. विनोदभाऊंनी व्हिसा, विमानाची बुकिंग तेथील हाॅटेल व कार्यक्रम फायनल केले. वीस तारीख कधी उजाडते असे मला झाले होते. विदेशात जाण्याचा पहिलाच योग त्यामुळेच आनंदाला भरती आली होती. सर्व जण आपापल्या परीने मुंबई इंटरनॅशनल विमान तळावर संध्याकाळी 8 वाजताच पोहचले होते. या मधे विनोदभाऊ चौधरी, नरेशशेठ गलानी, ललितजी आरूजा, राजेशजी महाले, रमेशजी दुसेजा, गुलाबजी जेठाणी, धुळे अमितजी गायकवाड नाशिक, असा सर्व मित्र परिवार एकमेकांना भेटला. विमानतळावरील सर्व चेकिंग पूर्ण करून जेथून विमानाचे उड्डाण होणार होते त्या ठिकाणी पोहोचलो, रात्री १ वाजताचे विमान होते. ते सकाळी ७ ला बँकाॅक ला पोहचणार होते. तेथून दुसरे विमान बदलून आम्ही सर्व जण फुकेत जाणार होतो. सर्व वेळेनुसार आम्ही थायलंडमधील फुकेत विमानतळावर पोहोचलो होतो. विमानतळाच्या बाहेर नरेशशेठ गलानी यांच्या नावाचा बोर्ड धरून हाॅटेलचा माणूस उभा होता. त्यानी प्रथमता आमचे सर्वांचे एकत्रितपणे फोटो काढले. अलिशान टोयोटोच्या मिनी बस मधून आम्ही पटोंग येथील विंधम रामादा हाॅटेलवर पोहचलो. फाईव्ह स्टार हाॅटेल तेथील सुविधा सुद्धा फाईव्ह स्टार होत्या इतके भव्य दिव्य हाॅटेल पाहून मी तर चकितच झालो होतो. फुकेत पासूनच वीस किलोमीटरच्या अंतरावर पंतोंग या शहरात हे हाॅटेल भव्य डोंगराच्या पायथ्याशी उभे होते. एक दोन तास आराम करून फ्रेश होऊन तयार राहायला सांगितले. आज सहलीचा पहिला दिवस रात्री आठ वाजता फंतासिया शो साठी जायचे होते. सर्वांनी सर्व विधी उरकले आणि ताजेतवाने होऊन हाॅटेलच्या बाहेर पडलो. अलिशान मिनीबस आमची वाट पहात होती. सायंकाळचे सहा वाजले होते. फुकेत येथे फंतासिया शो च्या पार्किंग मधे पोहोचलो दुरूनच लाईटिंगचा झगमगाट दिसत होता. एक जादूई नगरी उभारावी तशी ही नगरी भासत होती. गेट जवळच पंधरा ते वीस मुली प्रत्येकाच्या स्वागतासाठी उभ्या होत्या पारंपारिक वेषातल्या या मुली प्रत्येकाला वाकून नमस्ते नमस्ते करीत होत्या. आम्ही सर्वांनी त्यांना ही नमस्ते केला. प्रवेश करताच तेथील राज्याचा फोटो व त्यावर केलेले डेकोरेशन मनभावन होते. अनेक नेत्रदीपक सजावटी पाहून मन अगदी आनंदी झाले होते. फिरून फिरून आता पोटात कावळे आवाज देत होते. आम्ही लगेच पोहचलो जिथे आम्हाला जेवण होते त्या हाॅल मधे, जणू काही या देशाच्या राजाचे जेवणाचे निमंत्रण आहे असे भासत होते. त्या हाॅलची प्रतिकृती राजवाड्या सारखी होती छतावर असंख्य झुंबर राजवाड्याची साक्ष देत होते. भिंतीवर थायलंड संस्कृतीचे दर्शन घडविणारी शिल्प होती. एका वेळेस चार हजार लोक बुफे पद्धतीने जेवतील असा हा रंग महाल पाहूनच अर्धे पोट भरले. वेगवेगळ्या पदार्थांचे स्टाॅल आम्हाला खुणावत होते. जणू काही शाही मेजवानीचा आस्वाद घेत आहोत. ग्रीन सलाड पासून ते गुलाबजाम, थाई पदार्थ गोड तिखटाचा बेत त्यामुळेच मनमुराद खाण्याचा आस्वाद घेतला. पोट भरले तरी अनेक पदार्थ सारखे खुणावत होते. शंभर च्या वर वेगवेगळे पदार्थ काय खाऊ आणि काय नको असे झाले होते, पण पोटाचा विचार केला अन भोजन थांबविले. शो टाईमची वेळ झाली होती. आम्ही सर्वजण लाईन मधे जाऊन थांबलो, रांगेत शिस्तीत अॅडोटोरिएम मधे पोहचलो चार हजाराच्या वर आसन व्यवस्था असलेले हे भव्य रंगमंदिर पहातच राहिलो. जशी जशी कार्यक्रमाची वेळ जवळ येत होती तस तशी उत्सुकता वाढत होती. निवेदकाने इंग्लीस मधे या शो ची माहिती देण्यास सुरवात केली अन थोड्याच अवधीत साक्षात स्वर्गच अवतरले असे वाटत होते.
अलिकडच्या तंत्रज्ञानाचा विशेष वापर करून प्राचीन थाई परंपरा दाखविण्याचा प्रयत्न मनाला एक ऊर्जा देत होता. यात अॅक्रोबॅटिक्स, भ्रम, पायरोटेक्निक, स्टंट, हवाई प्रदर्शन आणि बरेच काही समाविष्ट करून हा शो यशस्वी करीत होते. ४०० हून अधिक मुल आणि मुली, ४४ हत्ती, तीन वाघ, ४० शेळ्या, ४० कोंबड्या आणि ४०० कबूतरांचा समावेश या कार्यक्रमात होता. थाई संस्कृती आणि पौराणिक कथा दर्शविणारी ७०-मिनिटांचा असाधारण कार्यक्रम पाहून मन प्रफुल्लित झाले होते. रात्रीचे दहा वाजले फिरून फिरून पाय दुखायला लागले होते पण हा कार्यक्रम पाहून सर्वांनाच आनंद झाला होता. हाॅटेलची गाडी आम्हाला घेऊन जाण्यासाठी सज्ज होती.

कालचा दिवस तर खुपच छान गेला आजचा दिवस होता बेटावर जाण्याचा, फुकेत मधील phi phi island जग प्रसिद्ध आहे. सकाळीच उठून सर्व नास्ता करायला गेलो. मनसोक्त नास्त्याचा आनंद घेतला. आज दिवसाची सफर अनुभवायची होती. आज मुद्दामहून गाडीच्या खिडकी जवळ बसलो होतो. गाडी हाॅटेल सोडून काही अंतरावर पोहचली होती, समोर एक भला मोठा फ्लेक्स बोर्ड दिसला त्यावर गौतम बुद्धांचा फोटो होता पण गाडी फास्ट असल्याने त्यावर लिहीलेले शब्द दिसले नाहीत. एक दोन किलोमीटर वर आलो पुन्हा तिथे तोच फ्लेक्स लावलेला दिसला तो पर्यंत सिग्नल पडल्याने गाडी थांबली आणि मी ते शब्द वाचले ते असे होते. Budh is not decoration, Respect is common sense. हे शब्द वाचून मी थक्कच झालो प्रत्येक चार पाच किलोमीटर वर जागोजागी असे फ्लेक्स लावले होते. मी अर्थ जाणण्याचा प्रयत्न केला. बुद्ध हे फक्त डेकोरेशन साठी वापरायचे नसून गौतम बुद्धांच्या विचाराचा सन्मान करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. हे विचार खुप काही सांगून गेले. भारतात जर फ्लेक्स पाहिले तर राजकारणांनी परिपूर्ण भरलेले, कोणाचा वाढदिवस तर कोणाच्या जाहिराती यावर लक्ष केंद्रित करून काय साध्य होणार तर विचार आला शून्य. या देशातील लोक हाच मेसेज दररोज वाचतात त्यांच्यात किती बदल असेल याचा प्रत्यय लगेच आला. गाडीतून जाताना अनेक घर दिसत होती. प्रत्येक घरच्या उजव्या बाजूस दोन छोटी आकर्षक मंदिर दिसायची एका मंदिरात ब्रम्हा विष्णू महेश व राम यांची चर्तुमुख मुर्ती दिसायची तर दुस-या मंदिरात तेथील पंतप्रधान म्हणजेच राजाची मुर्ती दिसायची. किती अफाट ही श्रद्धा होती. दरवाज्यात मंदिर आल्याने आजूबाजूचा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर दिसायचा. जिथपर्यत नजर जाईल तिकडे फक्त स्वच्छता दिसत होती, कुठे कचरा नाही की साधा कागद ही नाही. गाड्यांची गर्दी इतकी पण कुठेही हॉर्न चा आवाज येत नव्हता की गाड्यांचा धुर दिसत नव्हता. जो तो आपापल्या रांगेतच ओव्हरटेक करण्याचे धाडस कोणिच करीत नव्हते, दोन गाड्यांच्या मधे एक गाडी बसेल इतके अंतर, इतक्या गाड्या पाहिल्या पण कुठेच डॅमेज किंवा ओरखडा ओढलेली गाडी दिसली नाही. लांबच लांब रांग पण सगळेच आपल्या लेन मधे कोणीच ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नही करीत नव्हते. किती ही शिस्त खरच बुद्धांच्या विचाराने शांत आणि संयमी नागरिक हेच देशाचे खरे प्रतिक. विशेष म्हणजे रोडवर एकही पोलीस किंवा ट्रॅफिक पोलीस दिसत नव्हता. जणू काही कायदा व्यवस्था नागरीकांच्या हाती, असे दृष्य आयुष्यात पहिल्यांदा पहात होतो. बरेच किलोमीटर दूर आलो पण कुठे हदयरोग तज्ञ, नाक घसा तज्ञ, त्वचा तज्ञ, किंवा हाॅस्पीटल चा बोर्ड सुद्धा कुठे दिसला नाही. खरोखर किती निरोगी जीवन जगत असतील इथली माणसं, ना धूळ प्रदूषण ना धूर प्रदूषण प्रत्येक जण मोकळा श्वास घेत होते. माणस सोडा पण झाडांच्या पानावर पण कुठे धूळ दिसली नाही. पर्यावरणाचा प्रंचड वसाच या देशाने घेतलेला दिसत होता. आता शहर जावून जंगल सुरू झाले होते. आजूबाजूला घनदाट जंगल मधेच खजुराची शेती दिसायची रस्त्याच्या दोन्ही बाजूला खजूराची झाडं पाहून हर्ष व्हायचा. दोन दिवस अगोदरच पाऊस पडल्याने छोटे छोटे धबधबे दिसत होते. वातावरणात एक ताजगी होती. आता आम्ही जेथून बेटावर जाण्यासाठी क्रूझ जहाज जिथे थांबते तिथे पोहचलो.

एक एक करीत सर्वजण क्रूझ मधे बसलो भरपूर प्रवासी बसतील अशी सिस्टिम होती. आमचा बॅडलक आम्हाला तळाला बसायला जागा मिळाली. पहिल्या आणि दुस-या मजलावरून संपूर्ण समुद्र डोळ्यात साठवता येत होता. क्रूझ जहाज सुरू झाले आणि आमची सवारी पाच बेटे असलेल्या फाई फी बेटाकडे निघाली. आजूबाजूला काहीच दिसत नव्हते ऐखादया अंधा-या गोडावून मधे बसावे तसे वाटत होते. तगमग होती ती क्रूझ मधून समुद्राचे विशाल रूप पहाण्याची. ४१ किलोमीटरच्या समुद्र मार्गाने आम्हाला जेम्स बाॅड्ण बेटावर पोहचायचे होते. भरपूर अंतर कापले आणि आमच्या त्या गोडाऊन मधून सुटका झाली. पहिल्या मजल्यावर आलो अन पहातो ते काय निळाशार समुद्र जणू काही शाईच या समुद्रात ओतलेली. जिकडे पहावे तिकडे समुद्रच, पहिला मजला सोडून दुस-या मजल्यावर आलो आणि भान हरपूनच गेलो. सुर्य आता डोक्यावर होता त्याचे प्रतिबिंब समुद्रात खोलवर दिसत होते. त्या समुद्रातील प्रतिबिंबाच्या आजूबाजूला प्रकाशाचे गोल खळे निर्माण झाले होते. ते निलम च्या खड्या सारखे चमकत होते. सागराच्या पाण्याची वाफ सूर्यामुळेच होते. त्या वाफेतूनच पाऊस पडतो आणि सृष्टीचे चक्र चालते म्हणजेच सागर आणि सूर्य हे पूर्ण आहेत आणि या पूर्णातून पूर्ण जन्माला येऊन हे दोघेही पूर्णच राहतात. सुर्य आणि समुद्राच्या मिलनाचा हा खेळ बराच वेळ डोळ्यात साठवत होतो. मनात अनेक कल्पना जन्म घेत होत्या. दूरवर धुरकट अशी बेट दिसू लागली त्या बेटावर ढगांचे आवरण जणू काही कापसांचे पुतळेच भासत होते. हळूहळू बेट जवळ येऊ लागली होती अथांग सागरात ही मध्यभागी बेट कशी तयार झाली असतील याच विचारात होतो. निळा निळा समुद्र, निळ्या पाण्यातून बाहेर आलेली उत्तुंग, शुभ्र बेट, त्या बेटांवर, कपारीत जागा मिळेल तेथे वाढलेली बेटासारखीच उंच उंच हिरवी हिरवी झाडे, त्यांवर घिरट्या घालणारे पांढरेशुभ्र समुद्रपक्षी, बेटांच्या कडेने जाणाऱ्या वळणावळणांच्या आखीव वाटा, खरतर समुद्रातील हा एकांत असाच कायम रहावा. जीवनातील आठवणी, चांगले वाईट अनुभव जीवनरूपी खोल समुद्रातुन लाटांच्या प्रमाणे बाहेर यावेत मनरूपी कड्यावर आदळून डोळ्यांचे किनारे अलगद ओलावून जावेत समुद्राची लाट जाताना नविन स्वच्छ वाळू किना-यावर सोडून जाते तशी वैचारिक लाट जाताना मनातली सल काढून स्वच्छ भावना मनात सोडून जावी मन शांत व्हावे, नवीन उमेद मिळावी, समाधान वाटाव आणि या अथांग सागराने जीवनाच्या प्रत्येक टप्यावर अशीच साद घालावी आणि पुन्हा पुन्हा या बेटावर येण्याचा महायोग यावा असे वाटत होते. आमचे क्रूझ त्या बेटांच्या कडेने जाताना अगदीच छोटे दिसत होते. महाकाय रूप धारण केलेली ही बेटे त्या मधील गुहा समुद्र जीवांची साक्ष देत होते. अनेक छोट्या बोटी त्या बेटांच्या आतमधे जात एक वेगळीच अनुभूती त्या लोकांना येत असणार हे नक्कीच एक एक बेट पार करीत आम्ही आता किना-याला लागलो होतो. फाई फी हे बेट जगविख्यात बेट त्याच बेटाच्या बाजूला जेम्स बाॅण्ड बेट, कोरल बेट, क्रबी बेट, खेई बेट अशी पाच बेटे दिसत होती. ४१ किलोमीटरचा प्रवास केल्याने भुक लागली होती. एका हाॅटेल मधे जेवणाची सोय केली होती. कधी जेवतो आणि कधी जेम्स बाॅण्ड बेटाकडे जातो असे झाले होते. कारण की असंख्य हाॅलीवूड बाॅलीवूड चित्रपटांची निर्मिती याच बेटाच्या आजूबाजूला झाली होती. किना-या पासून समुद्रात पाच किलोमीटर आत मध्ये तीन वेगवेगळी बेट दोन पायावर उभी असलेली दिसतात. निळ्याशार पाण्यात हिरवीगार बेट एक चमत्कारच वाटतो. जेवण केल्यावर जेम्स बाॅण्ड बेटाकडे निघालो. असंख्य देशी विदेशी पर्यटक या समुद्राच्या पाण्यात मनसोक्त डुंबंत होती. पाणी इतके स्वच्छ की पाण्यात उभे राहिले की संपूर्ण पाय क्लेअर दिसत होता. मी पण पाण्यात जावून उभा राहिलो. माझ्या समोर दिसत होते ते जेम्स बाॅण्ड बेट, त्या बेटाकडे पाहून सुखावलो, निसर्गाच्या या देणगीला नमस्कार केला. किती विहंगम दृष्य दिसत होते. अनेक जण छोट्या बोटी घेऊन आत समुद्रात जावून त्या बेटाचे फोटो काढीत होते. मी पण खुप फोटो काढले. आजूबाजूचा परिसर फिरलो, या निळ्याशार बेटावर खुपच रमलो तेथून जाऊच नये असे वाटत होते. पण पुढे क्रूझ जहाज आमची वाट पहात होते. पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला होता. खुप दमल्याने मस्त झोपून गेलो. बरोबर सहा वाजता आम्ही किना-यावर पोहचलो तेथे हाॅटेलची गाडी आम्हाला घेण्यासाठी उभी होती. हाॅटेलवर जाऊन फ्रेश झालो जेवणं करून झोपी गेलो.

सकाळी सहा वाजता तयार झालो अन एअरपोर्ट ला निघालो तेथून पुन्हा बँकाॅक ला उतरलो. तिथेही अवनी हाॅटेलची गाडी आम्हाला घेण्यासाठी आली होती. टोयोटोच्या मिनी बसमधून बँकाॅक च्या दिशेने निघालो. हाॅटेलवर उतरलो आपआपल्या रूमच्या चाव्या घेतल्या ३४२ नंबरची रूम मिळाली. रूम मधे गेलो खिडक्या पडदे उघडले सातव्या मजल्यावर आम्ही होतो तेथून बँकाॅक शहर दिसत होते. मोठ मोठी उंचच्या उंच टाॅवर आकाशाला गवसणी घालीत होती. रूम मधले विहंगम दृष्य पाहून आराम करण्याची गरज वाटली नाही. टँक्सी केली अन सोनेरी बुध्दविहार पाहायला गेलो. या विहारातील बुध्दाची मुर्ती ७०० वर्षापूर्वीची जगात सर्वात मोठी बसलेली सोनेरी मुर्ती आहे. तिची उंची ५ मीटर, चवडी ४ मीटर आणि वजन ५.५ टन आहे. ही मुर्ती सुकोथाय या काळातील असून खुपच सुंदर आहे. सुरुवातीला ब्रम्हदेशाच्या आक्रमनापासून संरक्षण करण्यासाठी प्लॅस्टरने झाकून ठेवली होती. ४० वर्षानंतर या मुर्तीचा शोध लागला बाजूलाच दुसरं बुध्दविहार असून तेथे बुध्दाची निर्वांणपदाची मूर्ती आहे. येथे ९५ पगोडे असून बँकॉकमध्ये सर्वात ऊंच आहे. ह्या विहाराचं आकर्षण म्हणजे यातील मूर्ती १५ मीटर ऊंच, ४६ मीटर लांब आहे. या विहारात अग्रभागी राजाचे तैलचित्र होते. या देशात राजाला फार मानतात तेथील राजा हा प्रभू रामचंद्राचा अवतार समजतात. लव कुश या दोन मुलांच्या पैकी कुश यांचे वंशज आजचे तेथील राजे मानले जातात. बॅकाँक मधील सर्वात उंच इमारत बाययोक स्काय हॉटेल आहे. या हॉटेलला ८८ मजले आहेत. ८४ व्या मजल्यावर फ़िरता मजला आहे. तेथून बॅकाँक शहर पूर्णपणे दिसते. तेथून एकावर एक असलेले अनेक उड्डानपुल (ओव्हरब्रिज) दिसत होते. बॅंकॉक शहरात जिकडे-तिकडे उड्डानपुल असल्याने या शहराला उड्डानपुलचे शहर म्हणून ओळखल्या जाते. एक पूल ५८ किलो मीटरचा असल्याचे कळले. जगाला शांततेचा संदेश देणा-या गौतम बुद्धांना साक्षात दंडवत घातला. खरी शांतता मिळवायची असेल तर थायलंडला कायम यायचे असा मनाचा निश्चय केला.
विचार गौतम बुद्धांचा आणि वंशज प्रभू रामचंद्राचे हे आध्यात्मिक मिश्रण तसेच राष्ट्रीय ग्रंथ म्हणून रामायणाला फार महत्त्व आहे. तसे या देशाचे चिन्हात्मक प्रतिक गरूड पक्षी, हिंदू संस्कृतीचे आचरण इथला प्रत्येक नागरिक करीत आहे. गौतम बुद्धांच्या अनेक विचारांच्या पैकी
(जीवनात तुम्ही कितीही चांगल्या पुस्तकांचं वाचन करा, कितीही चांगले शब्द ऐका. मात्र जोपर्यंत हे सर्व काही तुम्ही आचरणात आणत नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग होत नाही.) हा विचार या देशातील प्रत्येक नागरिकांने अंगिकारला आहे. या देशात दिसते फक्त निरव शांतता, शिस्तता, पारंपारिकता आणि निसर्गाचा अनमोल खजिना. हे सर्व पाहून झाल्यावर दुस-या दिवशी इन्द्रा मार्केट येथे आलो. तेथे आम्ही शॉपींग केले. चाॅकलेट, घड्याळ, टी शर्ट घेतले. या देशात महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत पान दुकाना पासून ते हाॅटेलच्या वेटर पर्यंत महिला कार्यरत आहेत हे विशेष आहे.
खरेदी संपवून हाॅटेल कडे परतलो बॅगा आवरल्या रात्री आठ वाजता सुवर्णभुमी विमानतळावर पोहचायचे होते. रस्त्याने खुप गर्दी तरी पण वेळेवर पोहोचलो. सुवर्णभुमी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चेकिंग झाली आणि आत मध्ये प्रवेश मिळवला. विमानतळाच्या मध्यभागी भव्य समुद्र मंथनाचा अप्रतिम देखावा पाहून थोडा वेळ स्तब्ध उभा राहिलो. गहिवरून आले खरच थायलंड या देशाविषयी अजून आदरभाव तयार झाला. प्रत्येक ठिकाणी भारतीय संस्कृतीचे दर्शन होत होते. त्यामुळेच भारत हमको जान से प्यारा है. आपल्या मातृभूमीची ओढ तर प्रत्येकाला लागलेली असतेच, मनापासून थायलंड देशाला आणि संस्कृतीला अभिवादन केले आणि भारतात येण्यासाठी विमानात जाऊन बसलो.

एक काळ होता प्रभु रामचंद्राचा देश, गौतमबुद्धाचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा देश, संत परंपराचा देश म्हणून आपली भारतीयांची एक वेगळीच ओळख होती, आदर होता. पण थायलंड मधे ब-याच वेळा वेगळेच चित्र दिसायचे, भारतीय व्यक्ती दिसला की त्यांना तेथील साधा ड्रायव्हर सुध्दा विचारायचा "बुम बुम" हा कोड वर्ड शब्द पण तो इतक्या खालच्या धराचा पण यात धन्यता मानणारे आपले भारतीय हे चित्र बदलतील का? तेथील शिस्त, तेथील शांतता, नियमबद्ध जीवन अंगिकारतील का?
थायलंडला जावून वाहनांची शिस्त व स्वच्छतेची शिस्त जरी आपल्या देशात येवून आचरणात आणली तरी आपला भारत देश खरा बुद्धाचा देश म्हणून ओळखला जाईल.
थायलंड हा देश फिरून आलो आपल्या भारतीय संस्कृतीला किती मान सन्मान आहे हे डोळ्याने पाहिले अनुभवले. थायलंडचे राजे "वाजीरालाॅग्कोर्न" हे शून्य प्रदुषण, शिस्त व शांतता या तीन बीज मंत्राच्या आधारावर आपला देश अतिशय व्यवस्थित पणे सांभाळत आहेत. जनतेवर अफाट प्रेम तसेच जनतेची सुद्धा आपल्या राजावर अफाट श्रद्धा यामुळेच हा देश प्रगती पथावर आहे....

नैसर्गिक सौंदर्याने नटलेला,
शांत-सुंदर थायलंड देश,
भारतीय संस्कृतीची इथेच,
ओळख मनांस भावते थेट!

संदीप राक्षे ✍🏻
८६५७४२१४२१

गहिवरल्या व्यथा!

गहिवरल्या व्यथा!
तू असल्यावर असे गवसले सूर प्रीतगाणे
केळीवरचे फूल मखमल पिवळेजर्द दिवाणे

सुरांचा गंधार पेटला
शब्दात मल्हार दाटला
ओठांवर थरथरले अगणित धुंद मनाचे तराणे
दिव्यापरी फडफडल्या तारा
गवतातून तडफडला वारा
सप्तसुरांचे रंग संपले विरले मंद तराणे
शब्दांचे हुंकार कोपले
विरहिणीचे गुणसार लोपले
गानलतेच्या हरित व्यथेचे गहिवरले नजराणे
संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे २६
८६५७४२१४२१

भामचंद्र डोंगर

तुकोबांच्या अभंगाचे प्रेरणाक्षेत्र भामगिरी पर्वत (भामचंद्र डोंगर)

ज्ञान स्वरूपाची सांगड मिळाली!
अंतरी पाहिली ज्ञानज्योती!!
तुका म्हणे चित्त स्वरूपी राहिले!
देह विसावले तुझे पायी!!
अंतरी ज्ञानज्योती पाहिल्याची, विठ्ठलाचे सगुण रूप दिसले अन विठ्ठलापायी चित्त विसावले ही अनुभूती जगदगुरू संत तुकाराम महाराजांना ज्या ठिकाणी झाली ते ठिकाण म्हणजे पवित्र भामचंद्र डोंगर, देहू आळंदीच्या परिसरातील माझा जन्म परंतु या भामचंद्र डोंगरावर येण्याचे भाग्य व योग आज आला. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले! म्हणुनी विठ्ठले कृपा केली!! या अभंगाच्या ओवी प्रमाणेच घडले काहीतरी पुण्य असणार म्हणूनच या भामचंद्र डोंगरावर जाण्याची सदबुद्धी मिळाली. यावेळी माझा धाकटा चिरंजीव संकेत सोबत होता. पहिले भंडारा डोंगरावर जाऊन आम्ही दर्शन घेतले अन तिथेच दृष्टीस पडला तो पवित्र भामचंद्र डोंगर मन राहवेना मनात इच्छा प्रकट झाली अन आम्ही दोघेही भामचंद्र डोंगराच्या दिशेने निघालो. सुदुंबरे गाव पार करून आम्ही शिंदे वासोली गावात आलो, आता गाव पण जाऊन प्रत्येक गावांचे शहरीकरण झाले होते. मोठ मोठ्या इंडस्ट्रीज इथे उभ्या राहिलेल्या दिसत होत्या. मराठी माणसाची जागा आता भैयांनी घेतली होती. थोडा वेळ मलाच कळेना आपण महाराष्ट्रात आहोत की उत्तर प्रदेश, बिहार मधे आहोत. एक काॅलेज पार करून डोंगराच्या पायथ्याशी एक मंदिर आहे तिथे आम्ही पोहचलो, आजूबाजूला नविन कंपनी उभारणीचे काम सुरू असल्याने जीसीपी वाहतूक गाड्यांनी त्यात दूरवरून ऐकू येणा-या लग्नातील डी जे नी इथली शांतता तर कधीच नष्ट झाली होती.
पायथ्याच्या मंदिराच्या देवळात जाऊन दर्शन घेतले अन दक्षिण दिशेकडून आम्ही भामचंद्र डोंगर चढायला सुरवात केली. हिरवे गवत आता वाळलेले दिसत होते. वृक्षतोडीने झाडांची संख्या बरीच कमी दिसत होती. पायी पाऊल वाटेने चालताना मातीत पाय घसरत होते त्यात बूट जो घातला होता तो निसरडा होता तो गवतावरून मातीवरून चालताना निसटत होता. दोन ते तीन वेळा घसरलो पण सावरलो, शेवटी बूट काढून हातात घेतले अन अनवाणी पायांनी चालू लागलो, अनवाणी पायांनी चालण्याचा आनंद वेगळाच होता पण दगड गोट्यातून चालताना पायाला वेदना होत होत्या पण मनात भाव वेगळाच होता ज्या अनवाणी पायांनी तुकोबाराय याच रस्त्यांनी गेले असतील त्यांच्या पायांचा स्पर्श कित्येक वेळा या मातीला या दगडांना झाला असेल अशा पवित्र पर्वतावर आपण त्याच पाऊलवाटेने चालतो आहोत..

बळीयाचा अंग संग झाला आता!
नाही भय चिंता तुका म्हणे!!

पर्वतावर मी आणि संकेत दोघेच चालत होतो पण कुठेही भितीचा लवलेश जाणवला नाही. जगदगुरू संत तुकाराम महाराजांचा लता मंगेशकर यांनी गायलेला एक एक अभंग मनपटलावर आवाजा सहित उमटत होता..

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा!
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे!!
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा!
अनुभव सरिसा मुखा आला !!

एका एका अभंगाचा अर्थ असा की त्यांचे निरूपण करायचे ठरवले तर एक एक अभ्यासू व्यक्ती एका ओवीवर महिनाभर आपले चिंतन सादर करील. गरूडाच्या पंखावर नाहीतर शब्दांच्या पंखावर बसून घारी सारख्या नजरेने समाज जीवनाचा वेध घेऊन समाज व्यवस्थेवर प्रहार करणारे साहित्यसृष्टीचे जनक म्हणजे जगदगुरू संत तुकाराम महाराज, युक्ती, मुक्ती, शक्ती, भक्ती, बुद्धी, आचार, विचार, विहार, क्रिया, ज्ञान, ध्यान, मान, अभिमान, सदाचार, दुराचार, शांती, सदभावना, माया ममता, प्रेम, दु:ख, वेदना, जाणीव, उणीव, अशा अनेक विषयांवरी तुकोबारायांचे अभंग जिवंत झ-या प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राच्या मुखातून आजही झिरपत आहेत.
अशा विचारानेच निम्मा डोंगर चढून वरती आलो. आता भरपूर ट्रेक झाल्याने दम थोडा कमीच लागला तरी डोंगराच्या निम्यावर असणा-या चौथ-या जवळ घटकाभर विसावा घेतला, सुंदर निळे निळे आभाळ कधीतरी दिसणारा ढगांचा पुंजका विविध आकृतींचा खेळ करीत होता, पर्वतावरून हे नयनरम्य दृष्य अगदी स्पष्ट दिसत होते. आराम करून शेवटचा एक टप्पा गाठण्यासाठी पुन्हा पर्वत चढायला सुरुवात केली. जिथे लेण्या आहेत तिथे पोहचलो आता एका बाजूला खोल दरी अन एका बाजुला काळ्या पाषाणाचा कडा, त्याच कड्याच्या पायथ्याला बरेचसे दगडी टाके दिसले, ते स्वच्छ निळेशार पाण्याने भरले होते.
ते पहातच आम्ही कोरीव लेणीच्या जवळ पोहचलो ही लेणी दक्षिण पश्चिम मुखी होती. बाहेरील चौकटीवर गणपती, कीर्तिमुख, द्वारपाल आणि इतर आकृत्या कोरलेल्या दिसत होत्या, दोन बाजूला दोन देवकोष्ट आहेत कोरलेले अंधुकसे दिसत होते आम्ही दोघेही जिथे पिंड आहे त्या गर्भगृहात प्रवेश केला. संपूर्ण अंधार होता मोबाईलची लाईट लावली अन समोरच भगवान शंकराची पिंड दिसली मनोभावे आम्ही नमस्कार केला अन तिथेच आसन लावले, थोडावेळ शांत बसलो हळूहळू परिसरातील शांतता मनात असलेल्या विचारांना पण शांत करू लागली. आता प्रकृतीमधे असणारे अनेक आवाज सहज कानावर पडू लागले, मन त्या आवाजा कडे केद्रिंत केले. तर एक दयाळ हा गाणारा पक्ष्यांने मधुर आणि लांबलचक शीळ घातल्याचे ऐकले, सकाळी व तिसर्‍या प्रहरी एखाद्या झाडावर उंच ठिकाणी बसून हा दयाळ पक्षी गात असतो व मधूनमधून शेपटी उभारीत असतो. इतर पक्ष्यांच्या आवाजाचीही हा नक्कल करीत असतो. आता त्याच्या गाण्याचा आवाज अधिक स्पष्ट येत होता. तुकोबारायांचा याच ठिकाणी लिहीलेला अभंग सहजच ओठावर आला.
वृक्ष वल्ली आम्ही सोयरे वनचरे!
पक्षी ही सुस्वरे आळवती!!
पुन्हा पिंडीचे दर्शन घेऊन बाहेर आलो त्याच लेणीच्या पुढे एक गुहा दिसली
त्यामधे वारकरी संप्रदायाचे साधक राहतात. येथे पूर्वी एक लहान कोरलेली गुहा होती. आता तेथे मोठी गुहा बनविण्यात आली आहे. अंदाजे १० मीटर लांब आणि ८ मीटर रुंद अशी हि आधुनिक गुहा वारकरी संप्रदायाचे साधक आपली साधना करण्यासाठी वापरतात. ते पाहून आम्ही मुख्य लेणीकडे निघालो तिथ पर्यंत पोहचण्यासाठी खड्या दगडी पाय-या चढून जायचे होते. सत्तर एक पाय-या चढून आम्ही आता उंच अशा मुख्य गुहेकडे आलो. भल्या मोठ्या कड्याच्या कुशीत ही लेणी आहे एक माणूस जावू शकतो इतकीच जागा आहे. एका बाजूला खोल दरी, पाय-या चढून मुख्य लेणीत प्रवेश केला. शिंदे गावाच्या उत्तरेला असलेल्या डोंगरावर कड्यात भामचंद्र लेणीसमूहातील लेणी क्रमांक ३ कोरले आहे. ही पण लेणी दक्षिण-पूर्व मुखी आहे. आत मध्ये वारकरी संप्रदायाचे दैवत विठ्ठल रखुमाईचे मंदीर आहे. तसेच संत तुकारामांचे साधे पण प्रभावी भित्ती शिल्प येथे आहे. भामचंद्र डोंगरावराचा तुकारामांच्या अनुभूतीचा उल्लेल्ख असलेला त्यांचा अभंग येथे वाचावयास मिळतो.

भामगिरी पाठारी वस्ती जाण केली! वृत्ती स्थिरावली परब्रह्मी!!
सर्प, विंचू, व्याघ्र अंगाशी झोंबले! पिडू जे लागले सकळीक!!
पंधरा दिवसामाजी साक्षात्कार झाला! विठोबा भेटला निराकार!!

इथेच तुकोबारायांना विठ्ठल परमात्म्याचे दर्शन झाले, अशा या पवित्र पावन लेणीत बराच वेळ बसून राहीलो. त्याच लेणीत एक साधक गेली पंधरा वर्षे झाली मौन अवस्थेत राहतात. शिजवलेलं अन्न न खाता कच्चे जे असेल ते खाऊन आपली साधना करीत आहेत.

ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी! धरोनी श्रीहरी जपे सदा!!

महाराजांचे दर्शन घेतले त्या लेणीतून बाहेर पडलो त्याच लेणीच्या खाली एका झाडाखाली एक युवा साधक ध्यान अवस्थेत बसलेले मी पाहिले खाली उतरून आम्ही त्यांच्या जवळ गेलो. बराच वेळाने ध्यानातून बाहेर आले. मी नमस्कार केला अन त्यांच्या शेजारी जावून बसलो कुठले महाराज ? मी प्रश्न केला मी यवतमाळचा आहे गेली तीन वर्षापासून इथे वारकरी संप्रदायाचा अभ्यास करतो आहे. भामचंद्र डोंगराची अनेक वैशिष्ट्ये अनेक अनुभव त्यांनी सांगितले पण एक खंत व्यक्त केली. इथे साक्षात पंढरीच्या पांडूरंगाचे दर्शन संत तुकाराम महाराजांना झाले इथल्या सारखी पवित्र भुमी दुर्मिळ आहे. पण अलिकडे याचे पावित्र्य राखले जात नाही. अनेक महाभाग इथे व्यसन करण्यासाठी येतात. पर्यटनाच्या नावाखाली नको ते प्रकार इथे सुरू असतात. अनेक प्रेमी युगलांचा हा अड्डाच बनत चालला आहे स्थानिकांचे दुर्लक्ष आहे. खरतर ही भुमी आध्यात्मिक दृष्टीने खुप अनुभूती देणारी आहे. असे प्रकार वाढत चालल्याने इथले पावित्र्य नष्ट होत चालले आहे. परप्रांतीयांचा वावर खुपच वाढला आहे. जसे अलिकडेच शिवप्रेमींनी अनेक गड किल्ल्यांवर अवैध्य प्रकार बंद केले आहे तसेच या भामचंद्र पर्वतावरील हे वाईट प्रकार थांबले पाहिजेत त्यामुळे इथे राहणा-या साधकांचे मन विचलित होत आहे. आपल्या संस्कृतीचा होत असलेला -हास कोणीतरी थांबवायला हवा हे प्रामाणिक मत त्या युवा साधकाने मांडले. मी पण साक्षात अनुभव घेतला होता मनाला कुठे तरी दु:ख होत होते. आजूबाजूला दारूच्या बाटल्या पडल्या होत्या खाली उतरताना बाटल्यांचा खच आम्ही खाली आणून पायथ्याला फेकून दिला.
                      जगदगुरू तुकोबाराय व भामचंद्र पर्वत या दोन्ही बद्दल वारकरी संप्रदाय आणि एकूणच मराठी जणांमध्ये नितांत आदर आहे. त्यांच्या अभंगवाणीतून सामान्यांना जीवनाचे सार समजते. संत साहित्यातून तुकाराम महाराजांचे जे चरित्र रंगविले आहे, ते त्यांच्या प्रत्यक्ष व्यक्तिमत्वाशी विसंगत आहे. असहाय्य भोळसट, व्यवहारशून्य, सदैव टाळ कुटीत असलेले त्यांचे चित्र नाही. उद्दाम, अहंकारी धर्मसत्तेला आव्हान देणारे लढवय्ये संत, असे त्यांचे खरे व्यक्तिमत्व आहे. तुकोबारायांना सामाजिक न्यायाचा साक्षात्कार याच भामचंद्र पर्वतावर झाला. त्यातून लोकांची कर्जखाती त्यांनी इंद्रायणीच्या डोहात बुडविली. शुद्ध भावना, शुद्ध आचरण, रंजल्या गांजलेल्यांना मदत करणे हीच ईश्वरभक्ती मानून त्यांनी सांगितले. समाजव्यवस्थेला न्यायचे अधिष्ठान देऊन अन्यायाविरुद्ध लढा उभारला.
    ज्ञानदेवांनी ज्याचा पाया रचला त्या भागवत धर्माच्या मंदिराचा कळस तुकोबाराय झाले. मंत्रगीता या नावाने गीतेचा सुबोध अभंगात्मक अनुवाद तुकोबारायांनी केला. त्यामुळे अभंग साहित्यातील सर्वश्रेष्ठ स्थान तुकोबारायांना देण्यात आले. वारकरी पंथाला आलेले तुकोबाराय हे अमृतमधुर फूल होय...

तुकोबाचा छंद लागला मनाशी!
ऐकता पदासी कथेमाजी!!
तुकोबाची भेटी होईल ते क्षण!
वैकुंठ समान होये मज!!
तुकोबाची ऐकेन कानी हरिकथा!
होय तैसे चित्ता समाधान!!
तुकोबाचे ध्यान करोनी अंतरी!
राहे त्याभीतरी देहामाजी!!
बहिणी म्हणे तुका सहोदर!
भेटता अपार सुख होय!!

संदीप राक्षे ✍🏻
भोसरी पुणे
८६५७४२१४२१
१६/१/२०२०

पेडगावचा धर्मवीर गड

शौर्य स्मृती व शिल्पाकृतींचा अविष्कार असलेला पेडगावचा "धर्मवीर गड" संदीप राक्षे✍🏻 प्रवासवर्णनकार असे मी! अपरिचित वास्तूंच्या वाटा...